

जळगाव : चोपडा ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून आणल्या जाणाऱ्या अवैध गांजाच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सापळा रचून एका पुरुषासह तीन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून १४ किलो ५१८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची किंमत सुमारे ३ लाख १९ हजार ३९६ रुपये असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपअधीक्षक कविता नेरकर आणि वरिष्ठ अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने संशयितांवर लक्ष ठेवून कार्यवाही केली.
३० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक टाक यांना मिळालेल्या माहितीनुसार सत्रासेन-लासूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. सायंकाळी सुमारे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी नाटेश्वर मंदिराजवळ चार संशयितांना थांबवून त्यांच्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून गांजा मिळून आला.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये जतिन बबन जावळे (२२, कांदिवली-मुंबई), संताबाई मनोहर गवारे (७०), शांताबाई पंडरी सुमरपल्ली (७२) आणि राधाबाई लक्ष्मणराव सोनवणे (७८, सर्व रा. भिमनगर, परभणी). त्यांच्याकडून १४ किलो ५१८ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि १०२० रुपये रोख असा एकूण ३ लाख ३६ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेचे आणि अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाने ही कारवाई पार पाडण्यात आली.