

Bhokardan Hostel Murder Case
भोकरदन : भोकरदन शहरातील जोमाळा परिसरात आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या निवासी वसतीगृहातील एका आठ वर्षीय मुलाचा मंगळवारी (दि.२२) रात्री गळा आवळून दोन मित्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. दोरीच्या सहाय्याने गळा आवळून चिमुकल्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बालवीर अजय पवार (वय आठ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तो गणपती विद्यालयात दुसरी इयत्तेत शिकतो. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी बालवीरच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे दोन गोलाकार काळे व्रण दिसून आले. पोलिसांनी तातडीने त्या दृष्टीने तपास सुरू केला. वसतिसगृहात साध्या वेषात जाऊन चॉकलेट देत मुलांना विश्वासात घेतले. वेगवेगळ्या रूममध्ये विविध पद्धतीने त्यांना गोष्टी सांगून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली व अखेर दोन तासांनंतर या खुनाचा उलगडा झाला.
या वसतिसगृहात साधारण २५० ते ३०० मुले आहेत. तीस मुले एका रूममध्ये आहेत. एकावर एक डबल बेड अशा पद्धतीने मुलांची झोपण्याची व्यवस्था आहे. बालवीर व खून करणाऱ्या एका बालकाचे आदल्या दिवशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. रात्री बारा ते तीन वाजेदरम्यान यातील एका बालकाने बालवीरच्या गादी खालून दोरी काढली व अन्य एका दुसऱ्या रूममधील बालकाने बालवीरच्या बेडजवळ येऊन दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला, असे पोलिसांनी सांगितले.
बालवीर चे पालक परतूर तालुक्यातील पाडळी येथे राहतात. गावोगावी जाऊन खेळणे विक्री करून या परिवाराचा उदरनिर्वाह आहे. बालवीर व मुलगी गौरी यांना पालकांनी श्री गणपती हॉस्टेल येथे सोडले होते. वसतिगृहातील मुलांचे हे दुसरे वर्ष आहे. मंगळवारी सकाळी बालवीरची आई नातेवाइकांसोबत गजानन महाराज पालखीसोबत लहान मुलांचे खेळणे विक्री करण्यासाठी जालन्यात आली असता अचानक वसतिगृहाचे व्यवस्थापक माऊली तोटे यांनी त्यांना बोलावून घेतले. मुलगा आजारी असल्याचे सांगत ग्रामीण रुग्णालयात येण्यास सांगितले. तेथे मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला.
दोरीने फास देताना विधिसंघर्षग्रस्त एका बालकाच्या डोक्याला जखम झाली होती. खुनासाठी वापरलेली दोरी हॉस्टेलच्या खिडकीतून मुलांनी खाली फेकली होती. तीही जप्त करण्यात आली आहे.
आदिवासी प्रकल्प कार्यालय संभाजीनगर येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी उद्धव वायाळ व भगवान कदम यांनी कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दुपारी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी पोलिस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली पवार, पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत, भाऊसाहेब सहाने उपस्थित होते.
ही घटना अतिशय धक्कादायक असून, हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही, मोबाईल व इतर गोष्टी नसल्यामुळे पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास शक्य नव्हता. लहान मुलांना व पालकांना विश्वासात घेऊन तसेच वसतिगृहाच्या कर्मचार्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक बिडवे यांनी सांगितले.