कृषी अर्थ : लसूण लागवडीतून अर्थार्जन

कृषी अर्थ : लसूण लागवडीतून अर्थार्जन
Published on
Updated on

लसूण हे कंदर्प कुलातील एक मसाल्याचे पीक आहे. अन्नपदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. लसणात प्रोपील डायसल्फाईड व लिपीड ही द्रव्ये असतात. चटण्या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्या विकारावर पचनशक्ती, कानदुखी डोळ्यातील विकार, डांग्या खोकला इत्यादीवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत.

महाराष्ट्रात जवळ जवळ 5000 हेक्टर जमीन या पिकाखाली असून नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लागवड केली जाते. समशितोष्ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्त असते; मात्र अति उष्ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीपर्यंत लसणाची लागवड करता येते. पिकाच्या वाढीच्या काळात 75 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडत असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. याकरता ऑक्टोबर महिन्यात केलेली लागवड अधिक उत्पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सें. ग्रे. व रात्रीचे 10 ते 15 अंश सें.ग्रे. तापमानात वाढ चांगली होते. मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रिय खते घातलेल्या रेतीमिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्याप्रकारे घेता येते. हलक्या प्रकारच्या जमिनी, चिकण मातीच्या जमिनी लागवडीस योग्य नसतात.

मध्यम खोलीची नांगरट करून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करते वेळी हेक्टरी 30 गाड्या (15 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्यास सोईस्कर अशा आकाराचे (3×2) अथवा (3.5×2मी) सपाट वाफे तयार करावेत. महाराष्ट्रात पांढर्‍या रंगाच्या जामनगर जातीची तसेच गोदावरी, श्वेता या जातीची लागवड केली जाते. लसणाची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात साध्या वाफ्यात कोरड्या 10×7.5 सेमी वर करतात. गड्डे फोडून पाकळ्या किंवा काड्या सुट्या करून टाकून मातीने झाकतात. त्यासाठी हेक्टरी 500 ते 600 किलो कुड्याच्या स्वरूपात बियाणे लागते. लागण झाल्यानंतर कुड्या निघणार नाहीत, असे पाणी द्यावे.

लसणाच्या गाठ्या एकावर एक अशा गोलाकार पाकळ्यांनी बनलेली असते. गाठ्यातील पाकळ्या सुट्या करण्यासाठी गड्डे पायाखाली तुडवून मग ऊफवून साफ केल्या जातात. लागवडीसाठी मोठ्या निरोगी व परिपक्व पाकळयांच्या उपयोग करावा.

लावणीच्या वेळी लसणास हेक्टरी 50 किलो युरिया 300 किलो सुपर फॉस्फेट व 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून द्यावा म्हणजे पिकांची वाढ जोमदार होते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर एक महिन्याने खुरपणी करून गवत काढून घ्यावे. त्यानंतर तण पाहून 1-2 वेळा निंदणी करावी. लागवडीनंतर अडीच महिन्यांनी लसणाचे गाठे धरण्यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करून माती चांगली मोकळी ठेवावी म्हणजे मोठ्या आकाराचे व चांगले भरदार गाठे धरण्यास मदत होते. त्यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करू नये.

लावणीनंतर पाण्याची पहिली पाळी सावकाश द्यावी. दुसरी पाळी त्यानंतर 3-4 दिवसांनी आणि पुढच्या हवामानानुसार 8 ते 12 दिवसांनी द्याव्यात. गड्डे पक्के होताना वर पाण्याच्या दोन पाळीतील अंतर वाढवावे. काढणीच्या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. त्यानंतर वरपाणी देऊ नये. म्हणजे गडडे काढणे सोपे जाते व गडडे फुटले जात नाही.

लसणाचे शत्रू

बोकड्या : ही कीड पानातील रस शोषून झाडे अशक्त बनवतात.
उपाय : सायपर मेथ्रीन 25 टक्के प्रवाही 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करपा व भुरी : या दोन्ही रोगांमुळे अनुक्रमे पाने गर्द तांबड्या रंगाची व पांढर्‍या रंगाची होतात व अटळ स्थितीत झाडे मरतात.
उपाय : ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा वापर करावा.

काढणी व उत्पादन

लावणीनंतर साडेचार ते पाच महिन्यांनी हे पीक काढणीस योग्य होते. पाने पिवळी पडावयास लागली म्हणजे गाठे काढावयास तयार झाले असे समजावे. लसूण पातीसह तसाच बांधून ठेवावा म्हणजे 8-10 महिने टिकतो. विक्रीसाठी पाती कापून गडडे स्वच्छ करून आकाराप्रमाणे प्रतवारी करुन बाजारात पाठवतात. जमिनीचे पोत, खते व जात यावर लसणाचे उत्पादन अवलंबून असते. दर हेक्टरी 9 ते 10 टन उत्पादन मिळते.

– सतीश जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news