

अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक द़ृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. आज 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने…
भाषाशास्त्र या विषयाची सुरुवात झाली तेव्हा युरोपमधील भाषांच्या इतिहासासंबंधी पुष्कळ काम झाले. त्याचबरोबर संस्कृत, पर्शियन आणि अरेबिक या भाषांवरही बरेच काम झाले. पण त्याचवेळी युरोपमध्ये आर्किऑलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी ही दोन्ही शास्त्रे प्रगत होत असल्याने युरोपमधील भाषांचा नक्की इतिहास ठरवण्यात तेथील भाषाशास्त्रज्ञांना यश आले. उदाहरणार्थ, लॅटिन भाषेची निर्मिती कधी झाली, लॅटिनची चलती कधीपासून सुरू झाली, लॅटिनला अवकळा कधी आली याविषयीचे विवाद शिल्लक राहिले नाहीत. हीच स्थिती ग्रीक भाषेबाबतही दिसून येते. त्याचप्रमाणे ज्यांना आधुनिक युरोपियन भाषा म्हणून शकतो अशा फ्रेंच, जर्मन, इंग्रजी या भाषांच्या इतिहासासंबंधी निश्चिती करण्यात तिथल्या अभ्यासकांना यश मिळाले; पण आपल्याकडे म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये अरेबिक, पर्शियन, संस्कृत, संस्कृतमधून निर्माण झालेली भाषा तमिळ, तमिळमधून निर्माण झालेल्या भाषा यांच्या निश्चित उगमाविषयी जरी भाकिते मांडली गेली तरी त्याची निश्चिती करण्यासाठी आर्किऑलॉजी किंवा इंडॉलॉजी अशा भाषाअभ्यासांची वानवा असल्याने आपल्याकडे भाषांच्या उद्गमाची नक्की तारीख, वेळ ठरवण्यात यश आले नाही.
त्यामुळे तमिळ ही भाषा इसवी सनाच्या 500 वर्षे आधी बोलली जात होती, याचे पुरावे असूनही त्या भाषेची नक्की सुरुवात केव्हा झाली याची आजही माहिती नाही किंवा निश्चिती नाही. हीच स्थिती भारतातील बहुतांश भाषांविषयी दिसून येते. सुमारे 70-80 वर्षांपूर्वी कानडी भाषेची सुरुवात इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून झाली असे मानण्यात आले होते; पण आज कानडीची सुरुवात इसवी सनाच्या पूर्वी दोन किंवा तीन शतके झाली होती, अशी मते अभ्यासकांनी मांडली आहेत. कानडीची जी स्थिती आहे तशीच ओरिया आणि बांगला या भाषांचीही आहे. कारण एकेकाळी ओरिया ही बंगालीची उपभाषा आहे असे मानण्यात आले होते. सुमारे 70-80 वर्षांपूर्वी ओरिया ही स्वतंत्र भाषा असे मत मांडले गेले. पण साधारणतः 10 वर्षांपूर्वी भारत सरकारने ओरियाला अभिजात दर्जा दिला. याचा अर्थ, ओरिया भाषा ही सुमारे 2000 वर्षे जुनी आहे असे मानले गेले. ओरिया, बांगला, कानडी या भाषांसारखीच स्थिती मराठीची आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास मराठी भाषा साधारणतः अकराव्या-बाराव्या शतकापासून सुरू झाली होती. संत ज्ञानदेवांना मराठीचे आद्यकवी मानण्यात आले. त्यानंतरच्या अभ्यासकांनी महानुभव पंथाचाही अभ्यास केला आणि मराठीच्या अन्य बोलींच्या वेगळ्या परंपरांचा अभ्यास करून ही कालसीमा बाराव्या-तेराव्या शतकापासून मागे घेऊन जात नवव्या-दहाव्या शतकापर्यंत नेऊन ठेवली. 'कर्पूरमंजिरी'सारखा ग्रंथ हा नवव्या आणि दहाव्या शतकात लिहिला गेला. गेले काही काळ म्हणजे सुमारे 30-35 वर्षे मराठीचा उगम संस्कृतपेक्षा प्राकृतमधून झाला असेल तर मराठीचा आरंभ थेट इसवी सनाच्या आरंभी झाला, असेही मत मांडण्यात आले आणि त्यातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी पुढे आली. तथापि, गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये मानवी जनुकशास्त्रात जे नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले, त्यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे असेही म्हणता येऊ शकेल, की संस्कृत भारतात येऊन पोहोचण्यापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 1400-1500 च्या आधी मध्य भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये जेथे आता महाराष्ट्र राज्य आहे, तेथे बोलली जाणारी प्राकृत भाषा अस्तित्वात होतीच. महाराष्ट्रीय प्राकृत या नावाने तिला ओळखण्यात येत होते. त्या भाषेची रूपे जरी बदलत गेली तरीही आजच्या मराठीच्या मुळाशी महाराष्ट्रीय प्राकृत आहे. अर्थात, हे विधान करत असताना अतिउत्साहाने याचे गरजेपेक्षा अधिक सुलभीकरण केले तर त्यातून गैरअर्थ निघू शकतो. माझ्या विधानाचा अर्थ इतकाच आहे, की येत्या तीन-चार दशकांत भाषांच्या अभ्यासकांनी भारतातील भाषांचा ऐतिहासिक संगतवार कालक्रम ठरवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा नव्या भाषिक सिद्धांताची गरज आहे.
अठराव्या शतकाच्या अखेरीस कोलकात्यात स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीमध्ये सर विल्यम जोन्स यांनी भारतीय भाषांविषयीचा एक सिद्धांत मांडला होता. त्या सिद्धांताच्या आधारे भाषांची कुटुंबे (लँग्वेज फॅमिलीज) कल्पण्यात आली होती. अशा कुटुंबात एका भाषेतून दुसरी भाषा निर्माण होत असल्याने आणि आसपासच्या कितीतरी भाषा एका भाषा परिवारात असणे हे स्वाभाविक असल्याचे मानले गेले. त्या सिद्धांताच्या आधारे मराठी ही इंडो-आर्यन भाषांपैकी एक म्हणजेच संस्कृतमधून निर्माण झालेल्या अनेक भाषांपैकी एक असे मानण्यात आले होते. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इमेनो या अभ्यासकाने भारतीय भाषांचा अभ्यास भाषा परिवार या संकल्पनेने पूर्णपणे करता येत नसल्याचे स्वीकारले आणि त्याने 'लँग्वेज एरिया' या सिद्धांताने भारतीय भाषांचा अभ्यास करणे अधिक योग्य ठरेल, असे मत मांडले. या सिद्धांताच्या आधारे, भारतीय भाषांची बर्यापैकी निर्मिती किंवा त्यांचा जन्म हा एतद्देशीय आहे, हे मानण्यास जागा निर्माण झाली. त्याही सिद्धांताच्या पुढे जाऊन ह्युमन जेनेटिक्सच्या आधारे नवीन भाषाविषयक सिद्धांत मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दिशेने काही अभ्यासकांनी प्रयत्नही सुरू केलेले आहेत. त्या द़ृष्टिकोनातून पाहिल्यास भारतीय भाषा – ज्यामध्ये मराठीचाही समावेश होतो त्या – भारतीय उपखंडामध्ये 45 हजार वर्षांपूर्वी येऊन स्थिर झालेल्या उत्क्रांतीच्या शास्त्रात ज्याला मॉडर्न ह्युमन किंवा होमोसेपियन म्हटले जाते, त्या छोट्या-छोट्या तांड्यांतून वेगवेगळ्या भाषांची निर्मिती होऊन त्याच्या मिश्रणामुळे मोठ्या भाषा निर्माण होत राहिल्या, असा विचार करता येईल. म्हणजेच एकेकाळी एका भाषेतून अनेक भाषा निर्माण झाल्या, असा सिद्धांत होता; तसा आता अनेक भाषांच्या मिश्रणातून काही भाषा निर्माण झाल्या असे म्हणता येईल. याद़ृष्टीने मराठीकडे पाहिल्यास मराठीची पाळेमुळे कानडीमध्ये, तेलगुमध्ये, गुजरातीमध्ये, ओरियामध्ये आणि संस्कृतमध्ये आहेत असे दिसून येईल. शिवाय गेल्या किमान 400-500 वर्षांमध्ये मराठीच्या आसपास असणार्या छोट्या-छोट्या आदिवासी समूहांच्या भाषांपासूनही महत्त्वाची शब्दसंपदा मिळवलेली आहे. त्यात गोंदी आणि भिल्लांच्या भाषेचा समावेश प्रामुख्याने होते. याखेरीज इंग्रजी, पोर्तुगीज आणि फ्रेंच या भाषांपासूनही मराठीने शब्दसंपदा घेतलेली आहे.
अरेबिक आणि पर्शियन या भाषांनीही मराठीला पुष्कळ समृद्ध केलेले आहे. एकंदरीत, मराठी भाषेची जडणघडण ही फार प्राचीन काळच्या प्राकृतमधून, वर उल्लेख केलेल्या भाषांच्या देवाणघेवाणीतून होत आलेली आहे आणि म्हणून मराठी भाषेच्या जडणघडणीचे अनेक टप्पे करावे लागतात. यामध्ये केवळ प्राकृत स्वरूप, प्राकृत आणि संस्कृत यांच्या संयोगातून निर्माण झालेले स्वरूप, तशाच प्रकारच्या अन्य सहयोगी भाषांबरोबर झालेल्या देवाणघेवाणीतून निर्माण झालेले विस्तृत स्वरूप आणि त्याहीनंतरच्या काळात भारताबाहेरच्या अनेक भाषांमधून शब्दसंपदा घेतल्यामुळे सधन होत गेलेली मराठी अशा रूपात मराठी भाषेच्या उत्क्रांतीची कल्पना करणे योग्य ठरेल. एखाद्या भव्य वृक्षाच्या बुंध्याला ज्याप्रमाणे सालांचे अनेक पदर किंवा स्तर असतात, त्याप्रमाणे मराठी भाषेचे व्यक्तित्व अनेक पदरी आहे आणि या प्रत्येक पदराचा ऐतिहासिक धागा हा वेगवेगळ्या काळाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे मराठीला केवळ अभिजात दर्जा देऊन मराठीचे संपूर्ण वर्णन होणार नाही. त्याहीपलीकडे मराठीला एतद्देशीय भाषा, प्राकृतआधारित निर्माण झालेली भाषा अशा रितीने वर्णन केल्यास मराठीचा इतिहास केवळ अभिजात असण्यापेक्षाही कितीतरी भव्य असू शकेल. कारण अभिजात भाषेचा अर्थ, 'सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा' असा आहे. मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे.
इतकी विशाल परंपरा लाभलेल्या मराठी भाषेची आजची स्थिती काय आहे, याचा धांडोळा घ्यायचा झाल्यास संविधानाच्या आठव्या परिशिष्टात ज्यांचा समावेश झालेला आहे
अशा अन्य भाषांच्या तुलनेतून तो योग्य प्रकारे समजून घेता येईल. 2011 च्या जनगणनेमध्ये संख्येच्या प्रमाणात मराठी बोलणार्यांचे स्थान 2001 च्या जनगणनेतील स्थानापेक्षा एका क्रमाने उंचावले होते. मराठी चौथ्या स्थानावरून तिसर्या स्थानावर आली होती. पण याच जनगणनेमध्ये हिंदी भाषिकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. हिंदीच्या तुलनेने मराठी धिम्या वेगाने वाढत आहे, असे दिसते. याउलट ओरिया, आसामी, गुजराती यांच्या तुलनेने मराठीची वाढ अधिक झपाट्याने होत असल्याचे दिसून आले. या दोन्ही तुलना करता केवळ संख्यात्मक द़ृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहणे योग्य ठरणार नाही. त्यापेक्षा आपली मराठी ही ज्ञानाची भाषा बनली आहे की नाही, याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. किती व्यक्ती मराठी बोलतात यापेक्षा व्यक्ती किती मराठी बोलू शकते, या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याद़ृष्टीने पाहिल्यास आज मराठीमध्ये सिनेमा, नाटक, संगीत, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम घडत असले तरी मराठीत विज्ञान, गणित आणि मराठीतून अन्य देशांबरोबरचे संबंध जोडण्याची स्थिती आलेली नाही. यासाठी मराठीला अत्यंत जोमाने माहिती-तंत्रज्ञानाकडे वळावे लागेल. अनेक प्रकारची मराठी संकेतस्थळे निर्माण करावी लागतील. अनेक अॅप्स विकसित करावे लागतील. या माध्यमांवर मराठी लिहिण्याची, ऐकण्याची, बोलण्याची व्यवस्था सुधारत राहावे लागेल. मराठीतील सर्च इंजिन्स बनवावी लागतील. हे सर्व करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी संस्कृती आणि तंत्रज्ञान यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे. आजही मराठी संस्कृतीसाठी पूर्णपणे वाहून घेतलेले विद्यापीठ नाही.
मराठी माध्यमभाषा म्हणून काही विद्यापीठांत वापरली जाते. मराठी लोकसंस्कृतीचा अभ्यास करणारे काही विभाग विद्यापीठांमध्ये आहेत; परंतु संपूर्ण मराठीच्या विकासाच्या अंगाने एक विद्यापीठ उभारणे हे अत्यंत गरजेचे आहे. इंग्रजांनी ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून इंग्रजीचा प्रसार वेगवेगळ्या देशांत केला, त्याप्रमाणे मराठी कौन्सिल निर्माण करून अन्य प्रांतांमध्ये असणारे मराठी भाषिक आणि अन्य देशांमध्ये असणारे मराठी भाषिक यांना भाषिक पाठबळ मिळेल याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हिंदी प्रसार सभा दक्षिण भारतात हिंदीचा प्रसार करते, त्याप्रमाणे मराठी प्रसार सभा हीदेखील महाराष्ट्राच्या जवळच्या अन्य राज्यांमध्ये कार्य करत असणे गरजेचे आहे. याद़ृष्टीने सरकारने विचार करणे मराठीला पोषक ठरेल. केवळ पारितोषिके देऊन आणि साहित्य संमेलनांना निधी देऊन मराठीचा विकास होईल, अशा भोळसट विश्वासावर आपण थांबलो तर आपली मराठी ही भाषा म्हणून जिवंत राहील; पण ज्ञानभाषा म्हणून तिचा अपेक्षित विकास होऊ शकणार नाही.
डॉ. गणेश देवी,
ज्येष्ठ भाषा व संस्कृती अभ्यासक
(शब्दांकन : हेमचंद्र फडके)