National Cycling Championship : सायकलपटूंसाठी अच्छे दिन! | पुढारी

National Cycling Championship : सायकलपटूंसाठी अच्छे दिन!

सायकलिंग स्पर्धा म्हटले की रेल्वे आणि सेनादल या संघांच्या खेळाडूंचे वर्चस्व असे समीकरण असायचे. मात्र गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आणि शर्यतीमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवीत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केली आहे. (National Cycling Championship)

कुरुक्षेत्र येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद (National Cycling Championship) स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या या यशामध्ये प्रतीक पाटील, सिद्धेश पाटील, प्रणिता सोमण, पूजा दानोळे, स्नेहल माळी, ओम कारंडे, अपूर्वा गोरे आदी खेळाडूंनी महत्त्वाचा वाटा उचलला.

वेगवेगळ्या अंतराच्या मास स्टार्ट, टाईम ट्रायल, वैयक्तिक कौशल्य अशा विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रेल्वे, सेनादल, कर्नाटक आदी बलाढ्य संघांच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर केलेली मात हेच महाराष्ट्राच्या यशाचे वैशिष्ट्य होते. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र सोनी, बीरू भोजने आणि पांडुरंग भोजने यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनीही या खेळाडूंच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे.

महाराष्ट्राचे खेळाडू पूर्वी साध्या सायकलींचा उपयोग करीत. वेगवेगळ्या अखिल भारतीय स्तरावरील आयोजित केल्या जाणार्‍या शर्यतींमध्ये भाग घेत असत आणि जिद्दीच्या जोरावर चांगले यश मिळवीत असत. मुंबई-पुणे सायकल शर्यत, मुंबई-नाशिक शर्यत आदी शर्यतींमध्ये घाटातील सरावाच्या जोरावर ते विजेतेपद मिळवित असत. वेगवेगळ्या गिअरच्या सायकलींचा उपयोग सुरू झाल्यानंतर रेल्वे, सेनादल, हवाई दल आदी संघांमध्ये खेळाडूंनी या शर्यतींमधील महाराष्ट्राच्या खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणली. तेथूनच स्पर्धात्मक सायकलींसाठी अत्याधुनिक सायकलींची आवश्यकता आहे, हे महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही लक्षात आले.

या खेळात सहभागी होणारे महाराष्ट्राचे बरेचसे खेळाडू आर्थिकद़ृष्ट्या मध्यम श्रेणी कुटुंबांतील असल्यामुळे स्पर्धात्मक सायकलिंगमध्ये करिअर करणे हे सोपे नाही. हे महाराष्ट्राच्या सायकलिंग संघटकांच्या लक्षात आले. महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उंचावायची असेल तर या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सायकली, स्पेअर पार्ट, पोषक आहार, फिजिओ आणि अव्वल दर्जाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊनच गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सायकलिंग संघटकांनी त्याद़ृष्टीनेच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि केंद्र शासन यांनी संयुक्तपणे सायकलपटूंच्या विकासासाठी नियोजनबद्ध योजना आखली आणि अमलातही आणली. नवी दिल्ली, पतियाळा, गुवाहाटी आदी ठिकाणी सायकलिंग अकादमी स्थापन करण्यात आल्या आहेत. या अकादमींसाठी आवश्यक असणारी आर्थिक बाजू केंद्र शासनाने स्वीकारली आहे, तर अन्य सर्व तांत्रिक जबाबदारी सायकलिंग संघटनांकडे सोपविली आहे. साधारणपणे स्पर्धात्मक करिअरसाठी लागणार्‍या एका सायकलची किंमत अडीच ते तीन लाख रुपये असते. (National Cycling Championship)

अशा सहाशे सायकली खरेदी करण्यात आल्या असून, त्याचा सर्व खर्च केंद्र शासनाने स्वीकारला आहे. एवढेच नव्हे, तर नवी दिल्ली येथील सायकलिंग वेलोड्रोम खेळाडूंना सरावासाठी मोफत देण्यात आला आहे. अकादमीत प्रशिक्षण घेणार्‍या खेळाडूंचा सर्व खर्च सायकलिंग संघटनेतर्फे केला जात आहे. या अकादमीत महाराष्ट्राच्या पन्नास मुले-मुलींना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करण्यासाठी ही सर्व जिल्ह्यांमधून निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अडीचशेहून अधिक मुले-मुली सहभागी झाली होती.

खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक अनुभव हा प्रत्येक खेळाडूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी करिअर करण्यासाठी उपयुक्त असतो. पूर्वीच्या काळी आर्थिक पाठबळ आणि अव्वल दर्जाच्या सायकलींच्या अभावी भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याबाबत अनेक अडचणी येत असतात. गेल्या पाच-सहा वर्षांत भारताच्या युवा आणि होतकरू खेळाडूंना दरवर्षी किमान सहा-सात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत.

प्रणिता सोमण, सुशीकला आगाशे, ऋतुजा सातपुते, मयूर पवार, प्रियंका कारंडे आदी काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांवर आपले नाव करण्यास सुरुवात केली आहे. तसेच दोन-तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने भारताच्या वीस मुला-मुलींना परदेशात दोन-तीन महिने प्रशिक्षण घेण्याचीही संधी मिळत आहे. या प्रशिक्षणासाठी खेळाडूंना स्वतःचा एकही पैसा खर्च करावा लागत नाही. एवढेच नव्हे, तर संबंधित कंपन्यांतर्फे या खेळाडूंना दैनंदिन भत्ताही दिला जातो.

भारतीय खेळाडूंना जर परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व दररोज प्रशिक्षण दिले तरच ते चांगले यश मिळू शकतात, असे नेहमी म्हटले जाते. तथापि, अनेक वेळेला भारतीय खेळाडू आणि परदेशी प्रशिक्षक यांच्यात सुसंवाद आणि समन्वय नसेल तर परदेशी प्रशिक्षकांवर केला जाणारा खर्च निरुपयोगी ठरतो. तसेच प्रत्येक खेळाडूची देहबोली, मानसिक जडणघडण याबाबत परदेशी प्रशिक्षकाच्या मर्यादा असतात. (National Cycling Championship)

त्यासाठी त्याला स्थानिक प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागते. तसेच काही वेळेला परदेशी प्रशिक्षक हात राखूनच तांत्रिक कौशल्य शिकवत असतात. या गोष्टी लक्षात घेऊनच भारतामधील प्रशिक्षकांनाच वेळोवेळी अद्यावत प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. जेणेकरून हेच प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना चांगल्या रितीने प्रशिक्षण देऊ शकतील. आज-काल ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेण्याचा फंडा वाढला आहे. मात्र अशा प्रशिक्षण पद्धतीत खेळाडूंचा अपेक्षेइतका विकास होत नाही. खेळाडूच्या चुका योग्य रितीने दुरुस्त होऊ शकत नाहीत.

ऑनलाईन पद्धतीने शिकवणार्‍या प्रशिक्षकाला संबंधित खेळाडूची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी अपेक्षेइतक्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा असे प्रशिक्षण घेणार्‍या खेळाडूंचे अपयश लगेचच स्पष्ट दिसून येते. सायकलिंग संघटकांनी प्रत्यक्ष ट्रॅकवरील प्रशिक्षणावरच जास्त भर दिला आहे. मैदानावरील प्रशिक्षणाद्वारे खेळाडूंच्या चुका लगेच दुरुस्त करणे सहज शक्य होते. तसेच सायकलीनुसार त्याने कोणते कौशल्य दाखवले पाहिजे, हेदेखील समजावून सांगणे सोपे होते.

महाराष्ट्राने कुमार गटापर्यंत खेळाडू तयार करायचे आणि रेल्वे, सेनादल, पेट्रोलियम महामंडळ आदी सार्वजनिक संस्थांनी त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायचे, हे नेहमीच दिसून येते. सायकलिंग हा क्रीडा प्रकारही त्यास अपवाद नाही. स्पर्धात्मक सायकलिंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गेल्या पाच-सहा वर्षांत घेतलेली झेप खूपच कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकली, सुविधा आणि अर्थार्जनाची हमी असेल तर महाराष्ट्राचे खेळाडू नजीकच्या काळात आशियाई क्रीडा स्पर्धा यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदकांवर आपली मोहर लावतील तर फारसे आश्चर्य वाटणार नाही.

मिलिंद ढमढेरे

Back to top button