मुलांच्या आत्महत्या : वाद नव्हे, सुसंवाद हवा! | पुढारी

मुलांच्या आत्महत्या : वाद नव्हे, सुसंवाद हवा!

डॉ. ऋतू सारस्वत

अलीकडच्या काळात किशोरवयीन आणि तरुण मुलांच्या मुलांच्या आत्महत्या चे प्रमाण वाढत चालले आहे. पालकांशी विसंवाद, अपेक्षांचे ओझे, वाढता भौतिकवाद, जीवघेणी स्पर्धा या कारणामुळे तरुणांत निराशावाद पसरत आहे. या गोष्टी थांबवण्यासाठी पाल्य-पालक यांच्यात संवाद वाढवणे नितांत गरज आहे.

आजघडीला भारतात दररोज 31 किशोरवयीन मुले आपले आयुष्य संपवत आहेत. ‘एनसीआरबी’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. मागच्या वर्षी 2020 मध्ये देशभरात विविध कारणांनी 11,396 अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या  केल्या. या आत्महत्यांचे प्रमाण मागच्या वर्षीच्या (2019) तुलनेत 18 टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या प्रमुख कारणांपैकी प्रेमभंग हे एक कारण सांगितले जात आहे. दुसरीकडे मानसिक दडपणांमुळेही मुलांच्या आत्महत्या हाेत आहेत. या विविध कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याची भावना विकसित होत आहे.

अर्थात मुलांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कशामुळे कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. अर्थात तारुण्य वय हे कोणासाठीच सोपे राहिलेले नाही. पण गेल्या काही वर्षांपासून बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विचारसरणीमुळे युवकांची किशोरवस्था ही खूपच कठीण होत चालली आहे. कमी वयातच प्रचंड यश मिळवण्याची इच्छा, जीवघेणी स्पर्धा, सहनशीलतेचा अभाव, वाढता मानसिक दबाव आदी कारणांमुळे मुले नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. शेवटी ते आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत.

आत्महत्या ही एक खासगी बाब नाही, हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. समाजशास्त्रज्ञ दुर्खिम यांनी यावर संशोधन करून काही तथ्ये समाजासमोर आणली आहेत. जेव्हा समाजात भावनांचा अतिरेक होतो, तेव्हा संबंधित व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडते. अतिप्रेमामुळे जेव्हा स्वत:चे अस्तित्व कमी होऊ लागते किंवा अतिदबावामुळे आपल्या स्वप्नाला कोणताही थारा मिळत नसल्याचे जाणवू लागते, तेव्हा या दोन्ही परिस्थिती आत्महत्येला कारणीभूत ठरू शकतात. समाजशास्त्रज्ञ दुर्खिम यांनी केलेले संशोधन हे आजच्या काळाला तंतोतंत लागू पडते. किशोरवयातील मुले प्रेमासारख्या गंभीर नात्यात का अडकत आहेत, असाही प्रश्न निर्माण होतो.

गेल्या काही दशकांत समाजाच्या रचनेत व्यापक बदल झाले आहेत. महानगरांतील पालकवर्गात आपल्याच विश्वात मश्गुल राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मुलांचे एकाकीपण वाढत चालले आहे. प्रेम ही एक स्वाभाविक वृत्ती असून किशोरावस्थेतून जाणारा मुलगा जेव्हा प्रेम आणि ममत्वाला पारखा होतो तेव्हा तो प्रेम आणि सहवास घराबाहेर शोधतो. विशेषत: आपल्या मित्रांच्या गटात. किशोरवयात मुलींबद्दलचे आकर्षण वाढणे ही सामान्य बाब आहे. पण काही जण याच आकर्षणाला प्रेम समजू लागतात. पालकांकडून न मिळणारे प्रेम तो मैत्रिणीत शोधतो आणि इथेच सर्व गडबड होते.

अशा स्थितीत पालकांकडून जेव्हा विरोध होतोे तेव्हा पाल्य बंडाच्या पवित्र्यात असतो तर काही वेळा आत्महत्येसारखा भयंकर मार्गही निवडतो. यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की, लहान मुले एवढी तणावाखाली का वावरत आहेत. पालकांचा कमी असणारा संवाद हे मुलांवरील वाढत्या मानसिक ताणाचे प्रमुख कारण आहे. त्याचवेळी मुलांच्या भवितव्याद्दल गरजेपेक्षा अधिक संवेदनशील राहणे देखील मुलांना नैराश्यात लोटणारे आहे.

निराशा, चिंता यासारख्या संवेदनशील गोष्टीवर सतत विचारमंथन करणार्‍या जगाला नैराश्य हे अचानक आणि एकाएकी येत नाही, हे ठाऊक नाही का? असा प्रश्न पडतो. त्याची सुरुवातच लहानपणापासून झालेली असते आणि ती वयपरत्वे वाढत जाते. विविध माध्यमातून मुलांवर प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याची वृत्ती बळावली आहे. या वृत्तीला समाजशास्त्रज्ञ ‘हेलिकॉप्टर पॅरेटिंग’ अशी उपमा देतात. ही स्थिती मुलांना नैराश्याकडे नेणारी ठरते. जे नाते भावनेवर, विश्वासावर आधारलेले आहे, तेथेच यांत्रिकीपणा येऊ लागल्याने मुलांचा आत्मविश्वास ढासळत चालला आहे. सतत अभ्यासाचा ताण हा मुलांत चिंता आणि तणावाची गंभीर स्थिती निर्माण करत आहे.

स्वप्नाचे मनोरे उभे केले जातात. या स्वप्नात मुले अडकली जातात. प्रत्येक मुलगा पालकांची इच्छा पूर्ण करतोच असे नाही. त्यामुळे पालकांची राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा ताण मुलांच्यावर मानसिक आणि भावनिक दबाव टाकतो. अपयशाची भीती पाल्याला आपल्या आयुष्यापेक्षा मोठी वाटू लागते. पालकांच्या अपेक्षेला आपण उतरू शकलो नाहीत, याचे शल्य त्याच्या मनाला टोचत राहते. त्यामुळे जीवन संपवणे हाच त्याला एकमेव मार्ग वाटू लागतो. मुलांच्या आत्महत्या वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे वाढता भौतिकवाद. पाल्यांना सुख आणि सुविधांची सहजासहजी उपलब्धता करून देणे देखील पालकांना अडचणीचे ठरत आहे.

एखाद्या त्रासाचा किंवा अपयशाचा सामना ते सहजासहजी करू शकत नाहीत. एकुणातच स्वप्न आणि वास्तव याचा मध्यममार्ग म्हणजे धैर्य आणि सकारात्मक विचार होय. त्यातही भावनिकदृष्ट्या खंबीर असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला भावी पिढीला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवायचे असेल तर भावनिकदृष्ट्या सक्षम राहण्याबरोबरच पाल्यांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. मुलांत निर्माण केलेला आत्मविश्वास आणि प्रेम हे त्यांना भरकटण्यापासून थांबवते. हा भरकटलेपणा आणि एकाकीपणा रोखणे हाच आत्महत्या थांबवण्याचा एकमेव परिणामकारक उपाय आहे.

Back to top button