समाजभान : डेटिंग अ‍ॅप्सचा भूलभुलैया | पुढारी

समाजभान : डेटिंग अ‍ॅप्सचा भूलभुलैया

योगेश मिश्र

आधुनिक युगात प्रेमाचा बाजार कसा मांडला जात आहे आणि यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर अर्थकारण गुंतले आहे, हे डेटिंग अ‍ॅप्सच्या उलाढालींवरून लक्षात येत आहे. जागतिक पटलावर डेटिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करणार्‍यांची संख्या 1.9 अब्जांवर पोहोचली आहे. तथापि, या डेटिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार लक्षणीयरित्या वाढले आहेत.

दिल्लीतील एका व्यक्तीला स्वित्झर्लंडहून आलेल्या एका मैत्रिणीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. अर्थात, या दोघांची मैत्री ही एका डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून झाली होती. मारेकरी हा युवतीवर एकतर्फी प्रेम करत होता तर युवती त्याला एक मित्र समजत होती. मित्राच्या देशात आणि शहरात फिरण्याच्या आमिषाला ती बळी पडली आणि जे काही घडले ती घृणास्पद होते, त्याची परिणिती निर्घृण हत्येत झाली.

पूर्वी पेनफ्रेंडशिपचा जमाना होता. वर्गमित्र किंवा कार्यालयातील सहकार्‍यांसमवेत मैत्री करण्याचे ते एक माध्यम होते. एकमेकांना पत्र पाठवणे आणि लिहिताना प्रत्येक गोष्टींचाही विचार केला जायचा. चांगले विचार, शेरोशायरीचा शोध घेत ते शब्द पत्रात उतरविले जात असत. ‘चुपके चुपके’ चालणार्‍या प्रेमाचा रंग काही औरच असायचा. प्रियकराने प्रेयसीला किंवा प्रेयसीने प्रियकराला लिहिलेले पत्र पुस्तकात किंवा नोट्समध्ये ठेवून द्यावे लागत होते. पहिले प्रेमपत्र लिहिणे आणि वाचणे म्हणजे चंद्र हातावर घेण्यासारखे होते. निखळ, निर्भेळ प्रेमाचा अनुभव अलौकिक असायचा. आता चिठ्ठी राहिली नाही अन् पेनफे्रंडशिप.

आजचा काळ ऑनलाइनचा आहे. म्हणूनच प्रेम आणि जोडीदाराचा शोध ऑनलाइनने घेतला जात आहे. याचे एक माध्यम समोर आले आणि ते म्हणजे डेटिंग अ‍ॅप. अ‍ॅपचे सदस्य व्हा, प्रोफाईल तयार करा, आवडत्या व्यक्तिबरोबर संवाद वाढवा आणि मैत्रीला चार चांद लावा. खाते सुरू करणे आणि चॅटिंग करणे सोपे असले तरी सायबर विश्व रहस्यमय आहे. कोण कसे आहे? तो प्रत्यक्षात कसा आहे? हे जाणून घेणे कठीण असते. समोरच्या मित्राच्या मनात काय चालले आहे, कोणता व्यक्ती कोणत्या वेशभूषेत कोणत्या रूपातून वावरत आहे, हे सांगता येत नाही. नितळ, निखळ प्रेमाच्या शोधात निघालेली मंडळी भलत्याच मार्गावर येऊन थांबतात आणि तेथून परतणेही शक्य नसते.

जेव्हा ही बाब कळते तेव्हा ती गोष्ट हाताबाहेर गेलेली असते. म्हणूनच दिल्लीची श्रद्धा वालकर असो किंवा स्वित्झर्लंडची नीना या आपल्या मित्रांच्या हातून जीव गमावून बसल्या. ऑनलाइन प्रेमाचे हे दोन बळी आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यग्रता असतानाही प्रचंड एकाकीपणा आहे आणि तेवढेच निर्बंधही. पण स्वच्छंदीपणा अणि स्वैराचार नको एवढा बळावला की, डेटिंग अ‍ॅप्सचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बहुतांश मंडळी डेटिंग अ‍ॅपवर प्रचंड पैसा खर्च करत आहेत. 2022 मध्ये जगभरात प्रेम मिळवणार्‍यांनी डेटिंग अ‍ॅप्सवर दिल्या जाणार्‍या आकर्षक प्रीमियम सुविधेपोटी विक्रमी 5.9 अब्ज डॉलर खर्च केले. 2019 मध्ये ही रक्कम 3.1 अब्ज डॉलर होती. 2020 मध्ये चार अब्ज डॉलर आणि 2021 मध्ये 5.3 अब्ज डॉलर खर्च केले. टिंडर आणि बम्बलसारख्या डेटिंग अ‍ॅप्सवर देण्यात येणार्‍या अतिरिक्त सुविधा या यूजरला प्रत्येक महिन्याला अधिक व्यूज, लाइक, मेसेज आणि मोफत बुस्ट मिळविण्यासाठी मदत करतात.

2021 आणि 2022 दरम्यान डेटिंग अ‍ॅप्सवरील खर्चात 6 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. एक सोपे गणित सांगता येईल. एका डेटिंग अ‍ॅप यूजरने 2022 या आर्थिक वर्षात या अ‍ॅपवर खरेदीपोटी दररोज 16 दशलक्ष डॉलर खर्च केले. ही मंडळी आहेत, प्रेमासाठी आतुर झालेली. केवळ परदेशातच असे घडत आहे, असे जर म्हणत असाल तर आणखी एक गोष्ट जाणून घ्या. 2022 मध्ये डेटिंग अ‍ॅपवरील खर्चात विक्रमी वाढ नोंदली गेली असून, यात भारत हा पाचव्या क्रमांकाचा बाजार म्हणून समोर आला आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे भारतीयांनी 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये डेटिंग अ‍ॅप्सवर 31 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च केले. डेटिंग अ‍ॅप बाजारात पहिल्या स्थानी अमेरिका आहे. त्यानंतर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमांकावर भारत. अमेरिकेने 2022 मध्ये डेटिंग अ‍ॅप्सवर अडीच अब्ज डॉलर खर्च केले. आता आपण गेल्यावर्षी जगभरात डेटिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करणारे आणि वेळ व्यतीत करण्यावर प्रकाश टाकू. जागतिक पातळीवर डेटिंग अ‍ॅप्स डाऊनलोडची संख्या ही 1.9 अब्ज एवढ्या विक्रमी पातळीवर पोचली आणि वार्षिक आधारावर त्याची वाढ 18.8 टक्के आहे. जागतिक पातळीवरदेखील अँड्राईड डेटिंग अ‍ॅप्सवर व्यतीत केलेला वेळ 2022 मध्ये 10 अब्ज तास होता आणि हा उच्चांकी वेळ आहे. त्याचवेळी 2019 मध्ये हा वेळ 7 अब्ज तास होता.

प्रेम आणि जोडीदाराचा शोध घेणार्‍या अमेरिकी मंडळींसाठी डेटिंग अ‍ॅप हा सर्वात आकर्षक बाजार म्हणून सिद्ध झाला आहे. अमेरिकेत डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण 2022 मध्ये वार्षिक आधारावर 10.4 टक्के वाढीसह 148 दशलक्ष झाले. भारतात सध्या नियोजित विवाहाची परंपरा सुरू आहे. मात्र डेटिंग अ‍ॅप्सने प्रेमात क्रांती आणली आहे. तरुणवर्ग प्रेम आणि साथ मिळविण्यासाठी इंटरनेट आणि अ‍ॅप्सचा आधार घेत आहेत. भारतात टिंडर, बम्बल, हिंज, हॅपेन, बदू, ओकेक्यूपिड, टूली मॅडली, क्वॅक क्वॅक, वू, लाइव्ह टॉक, लिवमेंट ब्लिस, यू, बेलासारखे अनेक डेटिंग अ‍ॅप्सचा बोलबाला आहे. त्यांच्या यूजरची संख्या वाढतच चालली आहे. मात्र त्याचे धोकेदेखील अधिक आहेत.

प्यू रिसर्च सेंटरच्या एका अभ्यास अहवालात म्हटले आहे की, अनेक महिला डेटिंग साइट आणि अ‍ॅप्सवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे शोषणाच्या अनुभवाला बळी पडल्या आहेत. 18 ते 34 वयोगटातील ऑनलाइन डेटर्सपैकी 57 टक्के महिलांनी त्यांना अश्लील संदेश किंवा फोटो मिळत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी या फोटाची मागणी केलेली नव्हती. एक गोष्ट लक्षात घ्या, डेटिंग अ‍ॅप्सचे अनेक संकेतस्थळे बनावट प्रोफाइलने भरलेली आहेत. त्याठिकाणी प्रेमाचा केवळ देखावा केला जातो. प्रेमाच्या नावाखाली निर्दोष लोकांना अडकविण्यात येते. त्यांना फसविण्यात येते आणि एवढेच नाही, तर त्यांचा जीवही घेतला जातो. कोरोनाच्या काळात ओडिशातील रमेशकुमार स्वॅन नावाच्या व्यक्तीला पकडले आणि त्याने दहा राज्यांत 27 महिलांंसमवेत विवाह केला होता. त्यांचा पैसाही काढून घेतला होता. त्याने मध्यम वयोगटातील महिलांना जाळ्यात अडकविले आणि विशेष म्हणजे या महिला सुशिक्षित आणि सधन होत्या. दिल्लीतील श्रद्धा वालकरचे प्रकरण आठवा. तिची भेट 2019 रोजी ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप बम्बलमार्फत झाली होती. आफताब पुनावाला हा तिचा प्रियकर बनला. पण नकळतपणे आपण एका लैंगिक शोषणाला बळी पडत आहोत आणि एक दिवस तो एखाद्या जनावराप्रमाणे ठार करेल, असे स्वप्नात तरी वाटले होते का?

पुण्यात एका महिलेने एका व्यक्तीला टिंडर अ‍ॅपच्या माध्यमातून जाळ्यात अडकविले आणि पहिल्याच भेटीत तिने लाखो रुपयांचे सामान लुटले. कर्नाटकात एका महिलेने टिंडरवरच भेटलेल्या एका व्यक्तीला फसविले आणि त्याची लूटमार केली. अशा घटनांत वाढ झाली आहे. दररोज कोणते ना कोणते प्रकरण समोर येत आहे. केवळ डेटिंग अ‍ॅप्सच नाही, तर सायबर गुन्हेगार हे इंटरनेटच्या जगात फेकलेल्या अशा प्रत्येक जाळ्यात अनेक निष्पापांना अडकवत आहेत. गेल्या एक वर्षात सायबर स्कॅमर्सनी लोकांना फसवत सुमारे 1.02 ट्रिलियन डॉलर रकमेवर हात मारला आहे. या आघाडीवर सरकारकडून, बँकांकडून जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत. पण सायबर पोलिसिंग असतानाही या रकमेत दरवर्षी वाढ होताना दिसत आहे कारण सायबर गुन्हेगार दररोज नवनवीन शक्कल लढविताना दिसत आहेत आणि याचा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. जोपर्यंत जग अस्तित्वात आहे तोपर्यंत फसवणूक करणारे राहतील आणि लुटण्याचे नवीन मार्ग तयार करत राहतील. गुन्हेगार दोन पावले पुढे चालतो, अशी म्हण आहे. हे लक्षात घेता, आपल्यालाच स्वतःला वाचवण्याचे मार्ग शोधावे लागतील.

Back to top button