मनोरंजन : बॉलीवूडमधलं राजकारण | पुढारी

मनोरंजन : बॉलीवूडमधलं राजकारण

‘सिटाडेल’ या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने, बॉलीवूडमधल्या तथाकथित लॉबी आणि त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला होता. इतक्या वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतरही प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाचा त्रास होताना दिसतो. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानलाही मागे असाच अनुभव आला होता.

सन 2018 मध्ये प्रियांका चोप्राने निक जोनास या तिच्यापेक्षा 10 वर्षं लहान असलेल्या अमेरिकन गायक-अभिनेत्यासोबत लग्न केलं तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या जोडीतल्या वयाच्या फरकाचं आश्चर्य तर तेव्हा होतंच; पण लग्नानंतर अमेरिकेला स्थायिक होण्याचा तिचा निर्णय मात्र त्याहून जास्त धक्कादायक होता. ‘सिटाडेल’ वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी प्रियांका गेल्या महिन्यात भारतात आली होती. यावेळी तिला तिच्या बॉलीवूडपासून लांब राहण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं होतं. आजवर सूचक मौन पाळणार्‍या, जुजबी उत्तरं देऊन विषयांतर करू पाहणार्‍या प्रियांकाने यावेळी मात्र अगदी बिनधास्तपणे बॉलीवूडमधल्या घराणेशाही, कंपूशाही आणि राजकारणावर ताशेरे ओढले.

2000 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावणार्‍या प्रियांकाला बॉलीवूडमधे आपली बैठक पक्की जमवण्यासाठी 2004 पर्यंत वाट बघावी लागली. 2004 पर्यंत रीलिज झालेल्या सिनेमांमध्ये प्रियांकाची भूमिका ही एका ग्लॅमरस युवतीचीच राहिली होती, ज्यात तिच्यातल्या अभिनेत्रीला फारसा वाव नव्हता. पण 2004 च्या ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘ऐतराज’च्या घवघवीत यशाने हे चित्र पालटलं. त्यानंतर पुढच्या दशकभरात प्रियांकाने अनेक हिट-फ्लॉप सिनेमांची रांगच लावली. शाहरूख खान-सलमान खानसारख्या आघाडीच्या सिनेनायकांपासून ते राजकुमार राव-अर्जुन कपूरसारख्या नवख्या अभिनेत्यांसोबत प्रियांकाने काम केलं. संजय लीला भन्साळी, विशाल भारद्वाज, राकेश रोशन, फरहान अख्तर, अनुराग बसू, आशुतोष गोवारीकरसारख्या प्रख्यात दिग्दर्शकांसोबतच धर्मा, यशराज, युटीवी, इरॉससारख्या तगड्या सिनेनिर्मिती संस्थांसोबत तिने काम केलं.

2014 मधल्या ‘मेरी कोम’ या बायोपिकमधे सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सर मेरी कोमची भूमिका साकारणारी प्रियांका ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’, ‘गोलीयोंकी रासलीला-रामलीला’सारख्या सिनेमांमध्ये आयटम साँगवरही थिरकली होती. ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात प्रियांका बाजीरावांच्या पत्नी काशीबाईंच्या भूमिकेत झळकली होती. बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं, तर हा तिचा शेवटचा हिट सिनेमा ठरला.

त्यानंतर 2019 मध्ये रीलिज झालेल्या ‘द स्काय इज पिंक’ आणि 2021 चा ओटीटी रीलिज असलेल्या ‘द व्हाईट टायगर’चा अपवाद वगळता, प्रियांकाकडून भारतात काही भरीव काम झालं नाही. खरं तर तिला काही कामच दिलं गेलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित निर्मितीसंस्थांशी हातमिळवणी करत असलेल्या प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाने मात्र पुरतं जेरीस आणलं होतं.2006 मध्ये आलेल्या फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन’मधून प्रियांका आणि शाहरूख आमनेसामने आले. पुन्हा 2011 मध्ये त्या दोघांनी एकत्र मिळून ‘डॉन 2’मध्येही काम केलं. त्यानंतर जवळपास सगळ्याच मोठ्या कार्यक्रमांना दोघे एकत्रच हजेरी लावू लागले. 2012 मध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरूखने प्रियांकाशी साधलेली जवळीक मात्र लपून राहिली नव्हती. या पार्टीनंतर प्रियांका ‘बॉलीवूड व्हाईव्ज’च्या निशाण्यावर आली.

शाहरूखची पत्नी गौरी खानच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या ‘बॉलीवूड व्हाईव्ज’ या गु्रपमध्ये हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, संजय कपूरची पत्नी महीप कपूर, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे अशा काहीजणींचा भरणा आहे. करण जोहरला या कंपूत मानाचं स्थान आहे. प्रियांकाला बॉलीवूडबाहेर ढकलण्यात या कंपूचा मोठा वाटा असल्याचा रिपोर्ट ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने केला होता.

शाहरूखशी प्रियांकाचं अफेअर सुरू असल्याच्या अफवांना ऊत येत असताना या ‘बॉलीवूड व्हाईव्ज’नी करणच्या मदतीने प्रियांकाला त्रास दिल्याचं प्रियांकाच्या एका मैत्रिणीने ‘मुंबई मिरर’शी बोलताना सांगितलं. त्यानंतर करणनेही आपल्या ट्विटरवरून या वादात उडी घेतली होती. बॉलीवूडवर बर्‍यापैकी वर्चस्व जमवलेल्या या कंपूपुढे आऊटसायडर ठरलेल्या प्रियांकाचं काहीही चाललं नाही आणि शेवटी तिला ही इंडस्ट्री सोडून परदेशी जावंच लागलं.

सुप्रसिद्ध सिनेसमीक्षक आणि सिनेअभ्यासक अमोल उदगीरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियांकाने बॉलीवूडच्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. मोठमोठ्या निर्मितीसंस्था, दिग्दर्शकांसोबत तिने हिट सिनेमांची रांगच लावली होती. प्रियांकाचं हे यश जितकं खरं आहे, तितकंच हेही खरं आहे की तिला बॉलीवूडमध्ये एका बाजूला ढकलून मुख्य प्रवाहाबाहेर काढण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता. त्यामुळेच तिला बॉलीवूड सोडावं लागलं.’

सिनेपुरस्कारांमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ऑस्कर’ विजेता संगीतकार ए. आर. रेहमानही बॉलीवूडच्या अशाच राजकारणाचा बळी ठरला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या वादग्रस्त मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये इनसायडर विरुद्ध आऊटसायडर असा वाद पेटला. सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा रेहमानने संगीतबद्ध केलेला सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर होता. त्यावेळी रेडियो मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत रेहमानने एक मोठा खुलासा केला होता.

‘दिल बेचारा’चा दिग्दर्शक मुकेश छाब्राने रेहमानला त्याच्याविषयी बॉलीवूडमध्ये पसरत असलेल्या अफवांविषयी सांगितलं होतं. एक ठरावीक कंपू आपली बदनामी करत असून आपल्यापर्यंत चांगला सिनेमा येऊ द्यायचा नाही, हे तो कंपू ठरवत असल्याचं रेहमानने या मुलाखतीत सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांत रेहमानने संगीतबद्ध केलेल्या सिनेमांमधलं संगीत पूर्वीइतकं प्रभावी का वाटत नाही, याचं उत्तर याच मुलाखतीत दडलंय.

अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक अर्जित सिंग, संगीतकार मिथूनही पूर्वी बॉलीवूडच्या अशाच भाईगिरीचे शिकार ठरलेत. या इंडस्ट्रीत कुणी गॉडफादर नसेल, तर इथं टिकणं किती अवघड आहे हे वेळोवेळी अनेक आऊटसायडर सिनेकलाकारांनी सांगितलंय. वरवर आकर्षक वाटणारी ही चंदेरी दुनिया आतून घराणेशाही आणि कंपूशाहीच्या धुराने काळवंडली गेलीय. स्वतःला इनसायडर म्हणवणार्‍यांनाही इथं बर्‍याचदा झगडावं लागलंय.

‘कोईमोई’ आणि ‘स्पॉटबॉय’चे माजी संस्थापक तसंच सिनेमागल्ली या फेसबुक गु्रपचे संस्थापक गुरुदत्त सोनसूरकर बॉलीवूडमधल्या राजकारणाबद्दल म्हणतात, ‘जगात सर्वत्र जसा आणि जितका घराणेशाही, राजकारणाचा बजबजाट असतो तसाच तो बॉलीवूडमधेही आहे. एखादा सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी आपल्या मुलांना आपल्या जागी चिकटवायला बघतो तसा.

‘पण घराणेशाहीबद्दल बोलायचं म्हटलं, तर बॉलीवूडमधे स्टारपुत्रांना फक्त पदार्पण सोपं मिळालंय. संघर्षाचा सुरुवातीचा काळ त्यांना ग्रेस मार्क म्हणून सुटला असला, तरी पुढे स्थान टिकवण्यासाठी सर्वांनाच संघर्ष करायला लागलाय. अमिताभचा मुलगा असो की राकेश रोशनचा. उलट स्टारपुत्र-पुत्रींना सतत तुलनेच्या कसोटीवर उतरावं लागतं. त्यांचं अपयश लागलीच ठळक केलं जातं.’ बाकी राजकारणाबद्दल बोलायचं, तर बॉलीवूडमध्ये तुमचा कॅम्प आर्थिकद़ृष्ट्या किती सबळ आणि देशभरातल्या सिनेवितरकांवर वजन ठेवून आहे, यावर तुम्ही हिटचा फ्लॉप आणि फ्लॉपचा हिट करू शकता. ही ताकद म्हणजे बॉलीवूडच्या राजकारणाचा कणा आहे. पन्नासच्या दशकात काही मोजके स्टुडिओ होते. आता स्टुडिओ जाऊन काही मोजक्या निर्मितीसंस्था आहेत, इतकाच काय तो फरक उरलाय बॉलीवूडचं राजकारण खेळणार्‍यांमध्ये.’

प्रथमेश हळंदे 

Back to top button