प्रासंगिक : कालातीत नाटक | पुढारी

प्रासंगिक : कालातीत नाटक

काळाचं आणि अवकाशाचं एक रंजक गणित नाटकात असतं. रंगमंचावर बगीचाचाही आभास निर्माण करता येतो आणि राजवाड्याचासुद्धा! त्याचप्रमाणं शंभर वर्षांची गोष्ट दोन तासांत सांगता येते. नाटक पाहणारा समूह ज्या काळात आणि ठिकाणी असतो, तिथून त्या समूहाला अलगद उचलून नाटक दुसर्‍या काळात आणि स्थळी घेऊन जातं. रंगमंचाची हीच ताकद अनेकांचा आकर्षणबिंदू ठरते. 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन. त्यानिमित्ताने…

नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण. तिसरी घंटा होताच मखमली पडदा सरकू लागतो, त्या क्षणी टोकाला पोहोचणारी उत्कंठा मराठी माणसाला नवीन नाही. मराठी रंगभूमीच्या या आकर्षणाला पावणेदोनशे वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. 1843 मध्ये पाच नोव्हेंबरला विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. विष्णुदास भावे यांनी केलेल्या प्रयोगाला शंभर वर्षे उलटल्यानंतर म्हणजे 1943 मध्ये या कालावधीत नाट्यक्षेत्रातील नामवंत सांगलीत एकत्र आले आणि त्यांनी या प्रयोगाचा शतक महोत्सव साजरा केला. त्यानिमित्त आयोजित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विनायक दामोदर सावरकर होते.

गेल्या पावणेदोनशे वर्षांत रंगभूमीवर सातत्यानं बदल घडत आले. संगीत नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतली. पौराणिक, ऐतिहासिक विषय मागे पडून कौटुंबिक आणि सामाजिक विषय रंगभूमीवर हाताळले जाऊ लागले. व्यावसायिक आणि समांतर रंगभूमीवर काम करणार्‍या असंख्य संस्था महाराष्ट्रात विकसित झाल्या. नाटकांच्या आणि एकांकिकांच्या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. त्यातून असंख्य संवेदनशील कलावंत, दिग्दर्शक, लेखक निर्माण झाले. दोन घटका करमणूक करणार्‍या नाटकांबरोबरच प्रेक्षकांच्या जाणिवा विकसित करणारी नाटकं रंगमंचित झाली. याच प्रवासात चित्रपटांचं क्षेत्र विकसित होऊन रंगभूमीवरील अनेक कलावंत-तंत्रज्ञांनी त्या क्षेत्रात यश मिळवलं. यथावकाश छोट्या पडद्यावरील मालिकांचं विश्व कलावंतांसाठी खुलं झालं. परंतु चित्रपट-मालिकांमधून काम करणारे अनेक कलावंत रंगभूमीशी कायम जोडलेले राहिले. काही कलावंतांनी रंगभूमी हेच आपलं मुख्य कार्यक्षेत्र मानलं आणि अन्य माध्यमांत तुलनेनं मर्यादित सहभाग घेतला. हा हा म्हणता मनोरंजनाच्या क्षेत्रानं प्रचंड मोठ्या उद्योगाचं स्वरूप धारण केलं. माध्यमं आणखी वाढली. आज हे क्षेत्र मोबाईलच्या रूपानं रसिकांच्या तळहातावर आलंय. ‘वेबसीरिज’चा पर्याय उपलब्ध झालाय. इकडे रंगमंचावरही मोठी आर्थिक गुंतवणूक असलेली नाटकं येऊ लागलीत. या सर्व स्थित्यंतरांच्या अवस्थांमध्ये मराठी रसिकांनी रंगभूमीवरचं आपलं प्रेम अबाधित ठेवलंय. मनोरंजनासाठी नाटकाव्यतिरिक्त अन्य साधनं नसण्याच्या काळापासून सर्व साधनांनी युक्त असण्याच्या काळापर्यंतचा प्रवास आपण केलाय; पण ‘नाटक ते नाटकच’ ही भावना इतक्या पिढ्यांनंतरही कायम आहे.

नाटक म्हणजे सत्याचा आभास, असं म्हटलं गेलंय. रंगमंचाचा चौकोन इतका शक्तिशाली आहे की, संपूर्ण विश्व त्या चौकोनात सामावू शकतं. काळाचं आणि अवकाशाचं एक रंजक गणित नाटकात असतं. रंगमंचावर बगीचाचाही आभास निर्माण करता येतो आणि राजवाड्याचासुद्धा! त्याचप्रमाणं शंभर वर्षांची गोष्ट दोन तासांत सांगता येते. नाटक पाहणारा समूह ज्या काळात आणि ठिकाणी असतो, तिथून त्या समूहाला अलगद उचलून नाटक दुसर्‍या काळात आणि स्थळी घेऊन जातं. रंगमंचाची हीच ताकद अनेकांचा आकर्षणबिंदू ठरते, नाटक पाहणार्‍यांचा आणि करणार्‍यांचाही! ज्या समूहाला नाटक दाखवायचं, त्याच्या मानसिकतेचा आणि मूल्यव्यवस्थांचा अभ्यास करून दिग्दर्शक नाटकाची योजना करतो. कधी मोजकं तर कधी भरगच्च नेपथ्य लावतो. कधी संगीताची जोड देऊन आशय गडद करतो तर कधी प्रकाशाचा खेळ करून प्रेक्षकांना प्रसंगात गुंतवू पाहतो. मात्र, या सर्व तांत्रिक बाबींपेक्षा महत्त्वाचा ठरतो तो अभिनेताच. कारण काळ आणि अवकाशाची चौकट त्याला प्रत्यक्ष जगायची असते. अनुभवायची असते आणि प्रेक्षकांना ती अनुभवायला भाग पाडायची असते. प्रेक्षकांच्या नेहमीच्या वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणात त्यांना न्यायचं असेल, तर सर्वप्रथम नटाला ते वातावरण तयार करावं लागतं. याखेरीज प्रयोगाच्या ठिकाणाचा अंदाज घेऊन त्याला अभिनयाची शैली ठरवावी लागते. कुठे ध्वनिव्यवस्था पुरेशी नसते, तर कुठे प्रेक्षागृह प्रमाणापेक्षा मोठं असतं. अशा वेळी आपला आवाज, आपलं शारीरिक व्यक्तिमत्त्व पणाला लावून त्याला नाटकाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी लागते. शिवाय, टेक-रिटेकचा प्रश्न नसतो. प्रेक्षकांची पोचपावती नटाला जागेवर मिळत असते. या सर्व कारणांमुळं रंगमंचीय अभिनय वेगळा आणि महत्त्वाचा ठरतो.

रंजन हा सर्व कलाप्रकारांप्रमाणं नाटकाचाही आत्मा आहे. अर्थात रंजनमूल्य म्हणजे काय, याची संकल्पना व्यक्तिपरत्वे बदलते. विचारप्रवण नाटकात रंजन नसतंच असं नाही आणि तद्दन करमणूकप्रधान म्हणून रंगमंचित केलेल्या नाटकात रंजन असतंच असंही नाही. आपल्याकडे नाटकांची यावरून वर्गवारीही केली गेली. प्रेक्षकांपर्यंत आशय पोहोचवण्यासाठी वेगवेगळे फॉर्म (घाट) अस्तित्वात आले. काही घाट परदेशी नाटकांमधून घेतले गेले तर काही आपल्याकडील लोककलांचा आधार घेऊन तयार झाले. अभिनयशैलीतही वेळोवेळी बदल होत गेला. परंतु या सगळ्याचा हेतू एकच. तो म्हणजे समोरच्या प्रेक्षकाला नाटकात गुंतवून ठेवणं. विनोदी नाटकांमध्येही वेगवेगळ्या शैली आल्या-गेल्या. कौटुंबिक विषय वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळले गेले. अतिवास्तववादी अभिनयापासून अतिनाट्यापर्यंत (मेलोड्रामा) अभिनयाचेही सगळे प्रकार मराठी रंगभूमीवर येऊन गेले. प्रायोगिक रंगभूमीने प्रचलित चाकोरीबाहेरचे घाट आणि अभिनयशैली हाताळली. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीतील बदलांचं प्रतिबिंब नाटकांमध्ये उमटलं. विषयांमध्ये वैविध्य आलं. वेगवेगळे प्रवाह रंगभूमीवर सक्रिय असले, तरी आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचं, हाच प्रत्येक प्रवाहाचा हेतू राहिला. समाजातल्या व्यंगांवर नाटकांनी अचूक बोट ठेवलं आणि समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं.

सुरुवातीला रंगमंचावरच्या घराला तीनच भिंती आहेत, असं मानलं जात असे. प्रेक्षकांच्या बाजूला भिंत नाही, याचं भान नटांनी बाळगावं असा दंडक होता. कालपरत्वे नाटकातल्या घरालाही चौथी भिंत आहे; फक्त ती पारदर्शक आहे, असं मानलं जाऊ लागलं. रंगमंचावरचा वावर त्यामुळं अधिक सहज झाला. ढोबळ रंगमंचीय चौकटी मोडण्याचा प्रयत्न असंख्य दिग्दर्शकांनी केला. नाटकांमध्ये संकल्पनात्मक म्हणजे विचारात्मक आधुनिकताही प्रत्येक काळात येत राहिली. सरधोपट कथानकांमध्ये प्रेक्षकांना गुंतवून न ठेवता आशयाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न दिग्दर्शकांनी केले. या प्रवासालाच आपण रंगभूमीचा विकास म्हणतो. या प्रवासात काळाचा जराही परिणाम होणार नाही, अशीही अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. मराठी नाटकं अन्य भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये रूपांतरित झाली. त्यांचे प्रयोग झाले. म्हणूनच रंगभूमी दिन साजरा करणं ही केवळ औपचारिकता नसून, हजारो रंगकर्मींनी अपार कष्टातून रंगभूमीला मिळवून दिलेल्या समृद्धीचा हा उत्सव आहे.

आज मराठी नाटक कुठे उभं आहे, त्याचा विस्तार किती आहे, प्रयोगशीलता किती आहे, रंगभूमीवरील विषय कसे बदलत आहेत, याचा विचार रंगकर्मींबरोबरच मायबाप प्रेक्षकांनीही करायचा आहे. नाट्यविश्वात प्रवेश करताना रंगकर्मींनी या परंपरेची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याचा पण करायचा आहे. केवळ करिअरसाठी पायरीचा दगड म्हणून आपण रंगमंचाचा वापर करणार आहोत की या रंगभूमीचे पांग फेडण्यासाठीही काही करणार आहोत, हे रंगकर्मींनी स्वतःच्या मनाला सांगायचं आहे. आपल्या हातात मोबाईल फोन येऊन 25 वर्षे उलटून गेली आहेत. तरीही नाटकाचा प्रत्येक प्रयोग सुरू होण्यापूर्वी ‘कृपया प्रेक्षकांनी आपले मोबाईल फोन बंद करावेत’, अशी सूचना का द्यावी लागते, याचा विचार प्रेक्षकांनी करायचाय. हजारो रंगकर्मींनी सजवलेली ही पालखी आपल्या सर्वांनी मिळून पुढे न्यायची आहे.

राजीव मुळ्ये,
नाट्यलेखक-दिग्दर्शक

Back to top button