पर्यावरण : मुंबईचा श्वास गुदमरतोय!

मुंबईचा श्वास
मुंबईचा श्वास
Published on
Updated on

राजेश नाईक :   

देशातील महानगरांमध्ये आतापर्यंत नवी दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण होत असल्याची नोंद सातत्याने होत होती; पण आता याबाबतीत देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलेे आहे. जी-20 परिषदेच्या बैठकीतही मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचे सावट जाणवले.

रोजगाराच्या शोधात देशभरातून येणार्‍या नागरिकांना सामावून घेणारी आणि कोट्यवधी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी स्वप्ननगरी मुंबई प्रदूषणाच्या विळख्याने जर्जर होताना दिसते आहे. कधी नव्हे इतक्या भयंकर प्रदूषणाचा सामना मुंबईकर करत आहेत. देशातील महानगरांमध्ये आतापर्यंत नवी दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण होत असल्याची नोंद सातत्याने होत होती; पण आता याबाबतीत देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलेे आहे. दोन्ही महानगरांची भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे; तरीही प्रदूषणाची कारणे मात्र काही प्रमाणात सारखीच आहेत. दोन्ही महानगरांमध्ये बेसुमार वाढत असलेली लोकसंख्या, या लोकसंख्येसाठी उभारण्यात येणारी बांधकामे आणि वाहने प्रदूषणामध्ये सातत्याने भर टाकत आहेत.

साधारणपणे 0 ते 51 या मर्यादेत असलेला हवेचा दर्जा उत्तम आणि आरोग्यदायी समजला जातो; तर 100 निर्देशांकांपर्यंतची हवा त्यातल्या त्यात बरी समजली जाते. ही बरी हवा शोषून घेत मुंबईकर अनेक वर्षे धकाधकीचे जीवन जगत आला आहे. हा निर्देशांक 100 च्या वर गेल्यास लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. गेल्या आठवड्यात मुंबईचा निर्देशांक तब्बल 300 पर्यंत गेला होता. यापेक्षाही कहर म्हणजे 13 डिसेंबरला नवी मुंबईतील नेरूळ येथे हवेचा निर्देशांक 410 इतका नोंदवला गेला. गेल्या चार वर्षांमध्ये मुंबई महानगराची नोंदवली गेलेली ही सर्वात वाईट हवा आहे. लोकांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये; अन्यथा श्वसनाचे विकार जडू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, जगण्यासाठीच्या संघर्षात मुंबईकरांचे या इशार्‍याकडे साफ दुर्लक्ष झाले आहेे.

अवघ्या 603 चौरस किलोमीटरच्या भूभागावर वसलेल्या मुंबईत एक कोटीहून अधिक लोक दाटीवाटीने राहतात. महामुंबईची लोकसंख्या तर सुमारे दोन कोटींवर पोहोचली आहे. यापैकी 40 टक्के लोक झोपडपट्टीत, 20 टक्के चाळीमध्ये, 30 टक्के सदनिकांमध्ये, तर 10 टक्के लोक रस्त्यावर राहतात. या सर्वांच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या कचर्‍यामुळे प्रदूषण आणखी वाढले आहे.

मुंबईकरांना वीज आणि पाणी मुबलक आणि अखंडित मिळत असले, तरी निसर्गाने मोफत बहाल केलेली हवा मात्र शुद्ध स्वरूपात मिळत नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहने आणि त्याहीपेक्षा मोठ्या वेगाने सुरू असलेली मुंबईतील बांधकामे हवा प्रदूषित करत आहेत. त्यातच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत काटेकोरपणे अवलंबली जात नाही. ठिकठिकाणच्या कचराभूमीतून उडणारे धूलिकण हवेत प्रचंड मोठे प्रदूषण निर्माण करत आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतींमधून बाहेर पडणारे धुराचे लोट मुंबईकरांच्या फुप्फुसांवर काजळी धरत आहेत.

नुकतीच मुंबईमध्ये जी-20 परिषदेची बैठक पार पडली. मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचे सावट या बैठकीवरही जाणवले. मुंबईच्या प्रदूषणामध्ये तेल शुद्धीकरण कारखान्यांनी मोठी भर टाकल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याचदरम्यान केला. यातील शुद्धीकरण कारखान्यांमधून फेकल्या जाणार्‍या धुरामध्ये सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुंबईची हवा आणखीच बिघडली आहे. याची दखल घेत या परिषदेत भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये या तेलशुद्धीकरण कारखान्यांमधून बाहेर पडणार्‍या सल्फरडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे उपाय योजले जातील असे सांगण्यात आले. या परिषदेमध्ये मुंबईच्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेतली गेली. अर्थात तेलशुद्धीकरणाचे कारखाने काय उपाय योजून प्रदूषण कमी करण्यात हातभार लावतात हे पाहावे लागेल. अन्यथा मागच्या पानावरून पुढे अशीच स्थिती राहण्याची शक्यता अधिक. याशिवाय मुंबईतील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमुळे हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे ते वेगळेच.

मुंबईत सध्या सागरी महामार्गासह मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर निवासी आणि व्यावसायिक वापरासाठीच्या इमारतींचेही बांधकाम प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या बांधकामांमुळे मुंबईत दररोज 1400 मे.टन कचरा तयार होतो. या कचर्‍यातील धूलिकण हवेत पसरून हवेचा दर्जा आणखीच खराब होत चालला आहे.

वाहन असणे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब असली तरी याच वाहनांच्या धुराचा मुंबईतील हवेच्या प्रदूषणात मोठा सहभाग आहे. जवळपास 30 टक्के हवा ही वाहनांच्या धुरामुळे खराब होते. त्यानंतर जैवइंधनाचा वाटा 20 टक्क्यांचा आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे 18 टक्के, तर धुळीमुळे 15 टक्के हवा खराब होते. मुंबईत या घडीला 43 लाख वाहने हवेत धूर सोडत असतात. लवकरात लवकर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे हा मोठा उपाय असल्याचे अमिताभ कांत म्हणतात. मात्र ही प्रक्रिया मोठी आहे. या इलेक्ट्रिक वाहनांसाठीची चार्जिंग व्यवस्था आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा हे मोठे आव्हान आहे. ते कशा रीतीने पेलणार याचा निश्चित असा आराखडा कोणत्याही यंत्रणेकडे नाही.

या खेपेस प्रदूषणात प्रचंड वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे तापमान वाढ. भूमध्य समुद्रात झालेल्या निर्माण झालेल्या तापमानवाढीचा परिणाम देशाच्या पश्चिम भागावर होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबई शहरावरून वाहणार्‍या खार्‍या वार्‍याचा वेग मंदावला आहे. एरव्ही वार्‍याच्या वेगाबरोबर हवेतील धूलिकण शहराबाहेर वाहून नेले जातात. मात्र संथ गतीच्या वार्‍यामुळे हे कण शहरावर असलेल्या हवेच्या आच्छादनात तसेच अडकून राहतात. हवेच्या दर्जावर सातत्याने लक्ष ठेवून असणारी संस्था सफरचे संस्थापक डॉ. गुफ्रान बेग यांच्यामते ही स्थिती आगामी काही वर्षांमध्ये तशीच राहण्याची शक्यता आहे. तर या खालावलेल्या हवेमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः श्वसनाचे विकार जडू शकतात. अशी भीती इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेचे संशोधक डॉ. अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.

विकासाच्या नावाखाली मुंबईत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यातील 125 हेक्टरचे जंगल तोडण्यात येत आहे. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी सुमारे 40,000 कांदळवनांची कत्तल होणार आहे. मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि अनेक ठिकाणी असलेले वनक्षेत्र हे शहराच्या फुप्फुसाप्रमाणे काम करते. मात्र त्यावरच घाला घातला जात आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आरेतील 2100 आणि शहरातील 5000 झाडे तोडली गेली आहेत. या झाडांच्या बदल्यात मोकळ्या आणि दलदलीच्या ठिकाणी वृक्ष लागवड हाती घेण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणांनी जाहीर केले होते. पण ही झाडे तग धरून मोठी होईपर्यंत वर्षानुवर्षे वाट पाहावी लागेल. तोवर होणार्‍या पर्यावरणाच्या र्‍हासाचे काय, असा गंभीर प्रश्न या दरम्यान उभा ठाकणार आहे.

मुंबईतील सर्वच्या सर्व मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर खासगी वाहनांचा वापर कमी होईल अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा वाढवूनदेखील खासगी वाहनांचे प्रमाण कमी झालेले नाही.

मुंबईत सध्या घरांसाठीची बांधकामे प्रचंड मोठ्या वेगाने सुरू आहेत. असे असले तरी मुंबईत गगनचुंबी बांधकामे ठरावीक भागातच आहेत. एका अर्थाने मुंबई आडवी फोफावली आहे. त्यामुळे ती उभी वाढण्यास प्रचंड वाव आहे. भविष्यात गगनचुंबी बांधकामांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू शकते. हे लक्षात घेतले तर बांधकामापासून तयार होणारा कचरा भयंकर पद्धतीने वाढू शकतो. त्यावर कोणतीच उपाययोजना सद्यस्थितीत तरी अस्तित्वात नाही. हा कचरा रोखायचा कसा हाच मुळात मोठा गहन प्रश्न आहे. मुंबईच्या सर्व भागांमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्यास लोकसंख्या तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि लोकसंख्या वाढल्यास प्रदूषणही तितक्याच मोठ्या प्रमाणावर वाढेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एकंदर परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठे आणि त्यावरील उपाय तोकडे अशीच स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news