श्रीलंकेच्या जखमांवर फुंकर | पुढारी

श्रीलंकेच्या जखमांवर फुंकर

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाने सलग पाच सामने जिंकत, ‘आशिया चषका’वर सहाव्यांदा आपले नाव कोरले. भारतासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी नमवले. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवले. श्रीलंकेचे हे यश म्हणजे काही केवळ नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द! येणार्‍या विश्वचषकात श्रीलंकेच्या या कामगिरीचे पडसाद नक्कीच उमटतील.

गेल्या रविवारी जेव्हा दुबईत श्रीलंकेने पाकिस्तानला हरवत, ‘आशिया चषक’ जिंकला तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. हा आनंद दोन कारणांसाठी होता. एक म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवल्याचा. पण, त्याहून जास्त आनंद होता तो, होरपळलेल्या श्रीलंकेला या विजयाने कितीतरी दिवसांनी आनंदाचे क्षण मिळाले, त्याचा! दुबईच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना गेल्या दोन वर्षांत फक्त स्कॉटलंड आणि आयर्लंड हरले आहे, या पार्श्वभूमीवर जेव्हा श्रीलंकेने नाणेफेक गमावली तेव्हा सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. त्याला पुष्टी मिळाली ती पहिल्या पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावत नवव्या षटकात जेव्हा श्रीलंकेची अवस्था 5 बाद 58 झाली तेव्हा. अंतिम सामना अगदीच एकतर्फी होत पाकिस्तानच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे, असे वाटत होते. याचवेळी श्रीलंकेच्या मदतीला धावून आला तो राजपक्षे. प्रथम अष्टपैलू हसरंगा आणि नंतर करुणरत्नेच्या जोडीने त्याने श्रीलंकेला 170 चा टप्पा गाठून दिला.

श्रीलंका संघ आशिया चषक जिंकेल, असे भाकीत कुणी जर स्पर्धेच्या सुरुवातीला केले असते, तर ते स्वप्नरंजन ठरले असते. कारण या वर्षी खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 9 सामने हरून ते दुबईत पोहोचले होते. त्यात पहिल्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानने धूळ चारली. अफगाणिस्तानचा संघ आज नवशिका राहिला नाही. जगातील उत्तम फिरकी मारा त्यांच्याकडे आहे. पण, तरीही अफगाणिस्तानकडून पराभव ही जुन्या संघांना कायम नामुष्कीच वाटते. एखाद्या गोष्टीचा नीचांक गाठला की, पुढे एकच दिशा उरते, ती म्हणजे त्या रसातळाच्या पातळीवरून वर येण्याची. अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव हा श्रीलंकेचा तो नीचांक होता. या पराभवानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकत आशिया चषकावर सहाव्यांदा आपले नाव कोरले.

यात भारतासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी नमवले आणि पाकिस्तानला सलग दोनदा नमवले. श्रीलंकेचे हे विजय म्हणजे काही नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती ती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी मारायची जिद्द!
पन्नास षटकांच्या विश्वचषकातला एके काळचा हा विश्वविजेता संघ गेली काही वर्षे नवीन संघ बांधायच्या संक्रमण अवस्थेतून जात होताच. पण, संकटे एकटी येत नाहीत. तशी या संक्रमणावस्थेला जोड होती, ती श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीची. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ यथार्थ ठरेल, असे हे पाचूचे बेट द़ृष्ट लागावे असे. पण, त्याला खरोखरच द़ृष्ट लागली.

राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांच्या कॅबिनेटमधल्या सर्व 26 सदस्यांनी 3 एप्रिल 2022 रोजी राजीनामे दिले आणि श्रीलंकेत अभूतपूर्व अशी आर्थिक आणीबाणी आली. विविध धोरणांमुळे आणि कोरोनामुळे आधीच खंगलेली श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्ण रसातळाला गेली आणि देशभर आगडोंब उसळला. देशात इंधन मिळणे हे सोन्याइतके मूल्यवान झाले. या राजकीय आणि आर्थिक अवस्थेतून श्रीलंका मार्गक्रमण करत असताना, त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध मालिका मायदेशात खेळल्या. पण, आशिया चषक आयोजित करणे श्रीलंकेच्या आवाक्याबाहेर जात होते.

श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅशली डिसिल्वा यांनी प्रांजळपणे कबूल केले की, दोन देशांमधल्या मालिका आयोजित करणे त्या परिस्थितीत एकवेळ शक्य होते. पण, आशिया चषक म्हणजे पात्रता फेरी जमेस धरली तर 9 संघांचे आयोजन आले. त्या प्रत्येक संघाला प्रवासातही बसची सोय म्हणजे पर्यायाने इंधनाची सोय, त्यांचे सामान वाहून न्यायला वेगळी वाहने, त्याचप्रमाणे आयोजकांचा प्रवास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसरात्र सामन्यासाठी लागणारे प्रकाशझोत ज्या जनरेटर व्हॅनवर असतात, त्यांचे प्रचंड इंधन इतकी तजवीज करणे श्रीलंकेला अशक्य होते.

गॅलन सोडून मिली लिटरमध्ये इंधनाची उलाढाल होत असलेल्या श्रीलंकेला हा आशिया चषक आयोजित करणे शक्य नाही, हे नक्की झाल्यावर तो दुबईला हलवला. भारत किंवा पाकिस्तानातआयोजन शक्य नव्हते. बांगलादेश हा एक पर्याय होता. पण, आजकाल संकटमोचन भूमी ही दुबई झाली आहे. आयपीएल असो वा पाकिस्तान क्रिकेट लीग असो. देशात अडचण असली की,दुबईचे मैदान मदतीला धावून येते. श्रीलंकेला मायभूमीत आशिया चषक खेळायची संधी अशी हातोहात गेली.

या सर्व गदारोळात श्रीलंका संघ बांधला जात होता. मायदेशात त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिका अनिर्णित राखल्या, तर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हरवले. पण, तरीही श्रीलंकेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. या आशिया चषकात पहिला सामना हरल्यानंतर मात्र कर्णधार दसून शनाकाने संघ बैठकीत, संघाशी आपापली बलस्थाने कुठची आणि त्यांचा फायदा कसा उठवायचा याबद्दल चर्चा केली. जयसूर्याच्या काळातल्या श्रीलंकेच्या फलंदाजीच्या दबदब्याचा अस्त झाल्यावर धडकी भरवणारे फलंदाज श्रीलंकेत फारसे निर्माण झाले नाहीत. पण, अनेक गुणवान अष्टपैलू तयार झाले.

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातल्या श्रीलंकेच्या कामगिरीचे प्रेरणास्थान हे, चेन्नई सुपर किंग्जचा 2021 च्या अंतिम सामन्यातील इथला विजय, हे होते. दुबईला पहिली फलंदाजी करणे म्हणजे सामना हरणे, हे समीकरण धोनीच्या चेन्नईच्या संघाने 2021 साली बदलून दाखवले. श्रीलंका संघाचा कर्णधार शनाका सांगतो, 160 आणि 170 मध्ये जरी 10 धावांचा फरक असला तरी 170 हे आव्हानात्मक ठरते आणि आम्हाला ते गाठायचे होते. एका राजपक्षेने देशाच्या राजकारणात धुमाकूळ घातला, तर इथे दुसर्‍या राजपक्षेने दुबईच्या मैदानात धुमाकूळ घातला. डावाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा वसूल करून श्रीलंकेने आपल्या संघात नवसंजीवनी आणली. पाकिस्तानचे ढिसाळ क्षेत्ररक्षण हेही श्रीलंकेच्या मदतीला धावून आले.

पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अडखळत झाल्यावर ज्या बाबर, फकर आणि रिझवान त्रिसूत्रीवर पाकिस्तान अवलंबून आहे; त्यापैकी रिझवानने सामन्याची सूत्रे हातात घेतली. त्यात श्रीलंकेने एक डीआरएस घेतला नाही आणि पाकिस्तानचे पारडे जड होत आहे, असे वाटायला लागले. हंसरंगाने डावातल्या 16 व्या षटकात, श्रीलंकेला धोकादायक ठरत असलेल्या रिझवानच्या बळीसकट तीन बळी घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जोडीला प्रमोदच्या भेदक मारा आणि उत्तम क्षेत्ररक्षणाच्या साथीने पाकिस्तानला नेस्तनाबूत केले.

श्रीलंकेतील जनतेसाठी हा विजय त्यांच्या होरपळलेल्या जखमांवर फुंकर मारणारा आहे. क्रिकेटच्या विजयाने आर्थिक जखमा भरून येणार नाहीत. पण, कधी कधी अशा औषधांची गरज असते. श्रीलंकेचा विजय हा येणार्‍या ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या आपल्या तयारीसाठी धोक्याची घंटा आहे. पण, या घडीला तरी आपल्या या शेजार्‍याचे कौतुक केले पाहिजे. लंकेत आज सोन्याच्या विटा नाहीत, सोन्याचा धूर निघत नाही. पण, गतवैभवाची अशी एखादी चमक दिसते तेव्हा ती नुसती चमक नसते, तर ती ठिणगी असते. गुणवत्तेने भरलेल्या श्रीलंका संघाला पुन्हा धगधगीत करायला ही एखादी ‘ठिणगी’ही पुरेशी आहे. येणार्‍या विश्वचषकात श्रीलंका संघाच्या या कामगिरीचे पडसाद उमटतील, अशी आशा वाटते.

निमिष वा. पाटगावकर

Back to top button