पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही? | पुढारी

पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?

पाऊस जोरात पडला, की पाणी उताराने धावणे, जास्त पाऊस आला की नदीपात्रे, ओढे दुथडी भरून वाहणे आणि पूर येणे, त्यात आणि पाऊस कमी झाला किंवा थांबला की पूर ओसरणे, या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत. निसर्गातील मानवी हस्तक्षेपाने पाऊस लहरी होणे स्वाभाविक आहे. आज त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. मात्र पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर न ओसरणे अनैसर्गिक आहे आणि त्याची चर्चा होणे आवश्यक आहे.

कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनी 1989 साली पूर अनुभवला होता. त्यानंतर 2005 साली मोठा पूर आला. 2019 चा पूर सर्वात भयंकर, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. पुराचा अभ्यास करणार्‍या वानखेडे समितीच्या अहवालावर अद्याप चर्चा सुरू आहे. अशातच यंदाही हे तीन जिल्हे पुन्हा पुराच्या तडाख्यात सापडले. यावेळच्या पुराची तीव्रता जास्त आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍याची पाणीपातळी 56 फुटांच्या वर गेली तर सांगलीला ती 70 फुटांपेक्षा जास्त होती. त्यातच पूर ओसरण्याचा वेग हा खूप कमी असल्याने होणारे नुकसान वाढले. राधानगरी धरणाचे अधिकारी रोहित बांदिवडेकर आणि विवेक सुतार यांनी टीका सहन करत दूरद‍ृष्टी दाखवली नसती तर आणखी मोठी हानी झाली असती.

यावर्षी 20 जुलैपासून सुरू झालेला पाऊस वाढत गेला आणि पुराच्या पाण्याने 22 तारखेला कोल्हापूरला वेढले. 24 जुलैला शहर परिसर आणि धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला तरीही पुराचे पाणी पूर्वीसारखे कमी झाले नाही आणि हीच चिंतेची गोष्ट आहे. अतिवृष्टीमुळे पूर येणे स्वाभाविक आहे.

मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणे अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूरप्रवण भागात झालेली बांधकामे, खणिकर्म इत्यादी अनेक घटक यामागे आहेत.

राष्ट्रीय महामार्ग : राष्ट्रीय महामार्गाची आजची रचना पूर उतरण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. महामार्ग नदीला छेदून नेताना पूरस्थितीचा अंदाज घेऊन पुलाचे बांधकाम होणे गरजेचे असते. सांगलीजवळ कृष्णा आणि पंचगंगेला ओलांडणारे रस्ते बांधताना नियमित पाऊस लक्षात घेतला आहे. कारण प्रत्यक्ष पूल नियमित पात्रावरच आहे. त्यामुळे पुराचे पाणी पात्राबाहेर पडले की पूर्वीसारखे शेतातून वाहून जात नाही.

कारण पात्राबाहेर पडलेल्या पाण्याला भराव अडवतो. हे पात्राबाहेरील पाणी अडीच किलोमीटरपर्यंत पसरते. पुढे जाण्यासाठी पाण्याला नदीपात्राखेरीज पर्यायी मार्ग नसल्याने ते तुंबते. हमरस्ता क्र. 4 धरणाची भिंत आणि नदीपात्रावरील पूल सांडवा बनतो. त्यामुळे 2019 आणि 2021 च्या पुरात कोल्हापूरची अवस्था धरणात बुडालेले शहर अशी झाली.

2005 च्या पुरावेळी असणार्‍या रस्त्याच्या उंचीपेक्षा आजच्या रस्त्याची उंची 15 ते 20 फूट जास्त आहे. त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेर पडले की तुंबून राहते. नदीपात्रातून पाणी जातेच. पण रस्त्यावरून चार फूट पाणी वाहत होते. हाच रस्ता उंचावरून बांधताना पुराच्या पाण्यासाठी मार्ग ठेवले असते तर पूर लवकर ओसरला असता. लवकरच हायवे सहापदरी होणार आहे. त्यावेळी पाण्याला मार्ग ठेवण्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

शेतातील पीक : नदीपात्राच्या अगदी शेजारी उसासारखी पिके घेणेही पूर ओसरण्यास अडथळा बनते. नदीपात्राच्या शेजारी जास्त उंच न वाढणारी आणि पाण्यास अडथळा न करणारी पिके घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी ‘एक काडी अडवते गाडी’ अशी म्हण वापरत. पाण्याबाबत आजही ती लागू आहे. पाण्याच्या मार्गात अडथळा न करणारी पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांची मानसिक तयारी करावी लागेल.

काही सुज्ञ शेतकरी नदी पात्राशेजारील शेतात उसाच्या पिकाऐवजी गवताची शेती करतात. कोल्हापूरच्या 2005 च्या पुराचा अभ्यास केल्यानंतर आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी पुरासाठी शेतातील पीकपद्धतीही कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. पूररेषेच्या आत अनेक बांधकामे झालेली आहेत. याबाबत वारंवार चर्चा होते. मात्र ती न काढता रोज नवीन अडथळ्यांची भर पडते.

खाणकामामुळे पात्रात येणारी माती : गौण खनिज, मुरूम, खडी, बॉक्साईट इत्यादींसाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांत कायम खोदाई सुरू असते. खोदाई झाल्यानंतर तेथील मातीवर योग्य पद्धतीने वृक्ष लागवड आणि हरित आच्छादन तातडीने तयार करणे गरजेचे असते. मात्र ते होत नाही. माती सुटी आणि उघडी राहते. पर्यायाने पावसाच्या पाण्याबरोबर नदीत येते. नदीपात्रात माती साठत राहते. त्यामुळे नदीपात्र पसरट होते. पाण्याचा मार्ग उथळ होतो.

नदीपात्रात ‘वाळूपेक्षा माती जास्त’ अशी परिस्थिती निर्माण होते. मातीमुळे पाणी भूगर्भात पाझरण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे खाणीतून नदी पात्रात येणारी माती थांबवली पाहिजे. त्यासाठी असणार्‍या शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी.

वृक्षतोड आणि वणवे : कोल्हापूर आणि सातार्‍याच्या पश्‍चिमेस मोठ्या डोंगररांगा आहेत. त्यावर असणार्‍या वृक्षराजीमुळे पाणी जमिनीत मुरत असे. आज या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. तसेच जंगलात लागणार्‍या आगीमुळे झाडांचे आणि वनस्पतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. झाडांची मुळे पाणी जमिनीत नेतात, माती पकडून ठेवतात. ती नष्ट झाल्याने पडणारे सर्व पाणी वाहते. झाडे आणि वनस्पती कमी झाल्याने पावसाचे पाणी न मुरता वाहू लागते. पाणी वाहताना मातीही घेऊन जाते.

मातीचा थर संपला की छोटे दगडगोटेही जोराच्या पावसात वाहू लागतात. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होऊन माती आणि दगडधोंडे पाण्याबरोबर नदीपात्रात येतात. नदीपात्राची खोली कमी होते आणि पाणी अडून राहाते.

मोठी धरणे : कोल्हापूर, सातारा, सांगलीचा पूरप्रवण भाग हा पाण्याबाबत सुखी मानला जातो. वाढत्या बोअरवेलचे प्रमाण पाहाता, आजचे हे वैभव पुढे टिकणार का? हा प्रश्‍न आहे. मात्र या भागातील डोंगररांगातून येणारे जिवंत प्रवाह आणि झर्‍यांमुळे नद्या वाहतात आणि म्हणून हा भाग संपन्‍न आहे.

या भागात कोयना, राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली असे मोठे प्रकल्प आहेत. धरण भरले की, त्यातून विसर्ग सुरू होतो. विसर्गावेळी पाऊस जोरात पडत असेल, तर पुराचे पाणी ओसरण्यास विलंब होतो. राधानगरी धरणाच्या अधिकार्‍यांनी यावर्षी दूरद‍ृष्टीपणा दाखवला. शासकीय निर्देशांचे काटेकोर पालन करत पावसाळ्यापूर्वी राधानगरी धरण रिकामे केले.

त्यामुळे पाऊस जोरात पडूनही राधानगरी धरणाचा विसर्ग सुरू नव्हता. यामुळे कोल्हापूरच्या पुराची तीव्रता कमी झाली. जनभावनेपेक्षा कर्तव्यकठोरपणा दाखवणेही पूर ओसरण्यासाठी महत्त्वाचे असते. पुरापेक्षा पाणी जमिनीत जास्त मुरावे यासाठी पाणलोट क्षेत्रात आणि इतरत्रही छोटे साठे निर्माण करावे लागतील.

भौगोलिक परिस्थिती : कृष्णा आणि पंचगंगेचा संगम जेथे होतो, तेथे या दोन नद्यांची पात्रे जवळजवळ काटकोनात एकत्र येतात. दोन्ही नद्यांचे पाणी सुलभपणे एकत्र येण्यासाठी नदीपात्रे लघुकोनामध्ये एकत्र यायला हवीत. त्यातही कृष्णेचे पात्र मोठे आणि पाण्याचा वेग जास्त आहे. कराडपासूनचे कृष्णेचे पात्र विचारात घेतले तर प्रतिकिलोमीटर 0.29 मीटरचा उतार मिळतो.

तर कोल्हापूरपासूनचे पंचगंगेचे पात्र घेतल्यास हाच उतार निम्म्यापेक्षा कमी म्हणजे केवळ 0.12 मीटर एवढा आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाण्याचा वेग पंचगंगेच्या पाण्यापेक्षा जास्त राहतो. ते पंचगंगेच्या पाण्याला अडवते.

तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या पूर्वेस असणारा प्रदेश हा पूर्णत: सखल, सपाट आहे. या महामार्गामुळे अडलेले पाणी नदीपात्रातून बाहेर आल्यानंतर पुन्हा पात्राबाहेर पसरते. नैसर्गिक उतार कमी असल्याने पुन्हा पाण्याचा वेग कमी होतो. त्यातच उसाची शेती, बांधकामे आणि इतर अडथळे असल्याने पाण्याचा निचरा वेगाने होत नाही. संगम होताना दोन नदीपात्रे लघुकोनात मिळावीत यासाठी अभ्यास होणेही गरजेचे आहे.

अलमट्टी धरण : अलमट्टी धरणाचा परिणाम काहीच नाही, असे नाही. मात्र याची चर्चा केली जाते तेवढा मोठा नाही. अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना पूर आला तर सांगली, कोल्हापूर भागातील पूर ओसरायला आणखी उशीर होऊ शकतो. जितका उतार जास्त, तितके पाणी वेगाने जाते आणि चढावरील पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे अलमट्टी धरणाचा पुराचे पाणी ओसरण्यावर काहीच परिणाम होत नाही, असे म्हणता येत नाही.

मात्र तेच एक कारण नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवे. अनेक वर्षांच्या पर्जन्यप्रमाणाच्या अभ्यासकांच्या मते अतिवृष्टीचा काळ, मध्यम वृष्टीचा काळ, अवर्षण काळ असे आवर्ती टप्पे दिसतात. सध्या जास्त पर्जन्याचा काळ सुरू असल्याचे मागील काही वर्षांतील पर्जन्यमानावरून दिसते. मात्र हे पावसाचे पडणे लहरी आहे. त्यामुळे पुढील काही काळ असाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत राहण्याची शक्यता दिसते.

पाऊस पडला की पाणी वाहू लागणार, ते उतारानेच धावणार. त्यामध्ये अडथळा आणला तर पाणी पर्यायी मार्ग शोधणार. तो मार्गही अडवत गेलो तर ते आणखी मार्ग शोधणार आणि शेवटी आपल्या दाराशी येणार. त्या पाण्याचा त्रास नको असेल, कमी व्हावा असे वाटत असेल, तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देणे मानवाच्या हिताचे आहे. त्यामधील किमान मानवनिर्मित अडथळे दूर करून पूर लवकर कसा ओसरेल, हे पाहायला हवे. अन्यथा भविष्यात पुराची भीषणता आणखी तीव्र होईल.

डॉ. व्ही. एन. शिंदे

Back to top button