Under 19 World Cup : पंचतारांकित विश्‍वविजय | पुढारी

Under 19 World Cup : पंचतारांकित विश्‍वविजय

भारताच्या 19 वर्षांखालील युवा क्रिकेट संघाने गेल्या शनिवारी अंतिम फेरीत इंग्लंडला नमवून पाचव्यांदा युवा विश्‍वचषक (Under 19 World Cup) जिंकला. युवा विश्‍वचषक हा 1988 ला चालू झाला. पण, पहिल्याच विश्‍वचषकानंतर पुढची 10 वर्षे स्पर्धा झालीच नाही. 1998 पासून मात्र दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते आहे. ही निव्वळ युवकांची स्पर्धा नसते तर प्रत्येक देशासाठी भावी क्रिकेटपटू हेरण्याची संधी यामुळे मिळते. आता तर आयपीएलसाठी खेळाडू शोधायलाही या स्पर्धेकडे सर्वांचे बारकाईने लक्ष असते. मोहम्मद कैफ, युवराजसिंग पासून पार्थिव पटेल, विराट कोहली ते गेल्या युवा विश्‍वचषकात चमकलेले पृथ्वी शॉपर्यंत अनेक क्रिकेटपटू आपल्याला या युवा विश्‍वचषक स्पर्धेने दिले आहेत.

भारताने जरी पाच वेळा हे अजिंक्यपद पटकावले असले तरी यंदाचा विजय हा वेगळा होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा होत होती. कोरोनाची तिसरी लाट डोके वर काढत असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नव्हते. सराव कुठे होईल, किती वेळ मिळेल ते स्पर्धा निर्धोकपणे पार पडेल का, या सर्वच बाबींवर एक टांगती तलवार होती. भारताने द. आफ्रिकेला नमवून स्पर्धेची सुरुवात तर झकास केली, पण पुढच्या आयर्लंडच्या सामन्याच्या आधी संघात कोरोनाने शिरकाव केला. कर्णधार, उपकर्णधारासह पाच खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. वेस्ट इंडिजला बदली खेळाडू पाठवणेही एक कठीण काम होते.

एक तर तिथे जायला थेट विमान नाही तेव्हा युरोपातल्या मर्यादित विमानसेवा आणि कोरोना नियम सांभाळत यावर सर्व प्रवास अवलंबून होता. पण, अशावेळी संघाची आपत्कालीन योजना कार्यान्वित होते. यामध्ये पडद्यामागच्या कलाकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. आयर्लंडच्या सामन्याआधी आणीबाणीसद‍ृश परिस्थिती होती. संघाचा मॅनेजर कोरोनामुळे दुसर्‍या ठिकाणी स्थानबद्ध होता. तो फोनवरूनच सर्व सूचना देत होता. संघाचा फिजिओथेरपिस्ट हा संघाचा डॉक्टर बनला तर संघाचा व्हिडीओ अ‍ॅनॅलिस्ट हा मॅनेजर बनला.

संघात दहा खेळाडू फिट होते आणि संघ बनवायला जायबंदी असलेला अकरावा खेळाडू घ्यावा लागला. सामन्याच्या अर्धा तास आधी अष्टपैलू निशांत सिंधूवर कर्णधारपदाची धुरा सोपवली तेव्हा त्याचा प्रथम यावर विश्‍वासच बसला नाही. अशा ऐनवेळी बांधलेल्या संघाने आयर्लंडला 174 धावांनी तर पुढच्या सामन्यात युगांडाला तब्बल 326 धावांनी धूळ चारली आणि आपला विजयाचा वारू पुढे दौडत ठेवला तो अंतिम विजयापर्यंत. (Under 19 World Cup)

या सर्व घडामोडीतून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे बीसीसीआयच्या विविध योजनांचे हे फलित आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही तंत्र, तंदुरुस्ती आणि सराव या प्रमुख त्रिसूत्रींवर भर देते. इथे खेळाडू घडवले जात नाहीत, पण प्रस्थापित किंवा होतकरू खेळाडूंना सर्वांगीण सहाय्यता मिळते. या राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण स्पर्धेच्या सुरुवातीपासून संघाबरोबर होते. जोडीला रणजी क्रिकेट गाजवलेले हृषीकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले सारखे मार्गदर्शक होते. हे युवा खेळाडू मैदानावर पूर्णपणे व्यावसायिकता दाखवत होते. त्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास त्यांच्यात दिसत होता. बीसीसीआयच्या योजना या एका प्रक्रियेत बनवल्या जातात तेव्हा प्रशिक्षक किंवा इतर संबंधित व्यक्‍ती बदलल्या तरी खेळाडूंच्या संस्कारांवर फारसा फरक पडत नाही.

बीसीसीआयच्या पाठबळाबरोबरच दुसरे महत्त्वाचे म्हणजे आज कुठच्या भागातून हे खेळाडू येतात यावरही त्यांच्या यशाची भूक ठरते. एकेकाळी भारतीय संघात मुंबईचे सात-आठ खेळाडू असायचे, पण आता तसे दिसत नाही. संजय मांजरेकरने याच्यामागचे संभाव्य कारण एकदा सांगितले होते. जेव्हा भारतीय संघात मुंबईच्या खेळाडूंचे प्राबल्य होते तेव्हा ते बहुतांशी मुंबईच्या मध्यमवर्गातल्या घरातले खेळाडू होते. मुंबईत जगण्यासाठी धडपड, जीवघेणा लोकलचा प्रवास करून मैदान गाठणे या राहणीमानातून आपोआप त्यांच्यात यशस्वी होण्यासाठीची जिद्द असायची. कुठचीही गोष्ट कष्टाशिवाय न मिळण्याचे ते दिवस होते.

साहजिकच तुम्ही क्रिकेट खेळायला लागता तेव्हा हे कष्ट खेळात दिसायचे आणि तेच यशाकडे घेऊन जायचे. मुंबईच्या मध्यमवर्गाची व्याख्या हळूहळू बदलली गेली आणि मुंबईच्या खेळाडूंचे भारतीय संघातील स्थान घटले. याउलट जिथे जिथे छोट्या शहरात क्रिकेट फोफावले तिथले युवा खेळाडू प्रथम संधीच्या शोधात आणि संधी मिळाल्यावर तिचे परिवर्तन यशात करायला अतोनात कष्ट घ्यायला तयार असतात. युवा विश्‍वचषकातल्या खेळाडूंकडे बघितले तर हेच दिसून येते.

या संघातले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून इथपर्यंत आले आहेत. प्रत्येक खेळाडूची कहाणी ही प्रेरणादायी आहे. कर्णधार यश धूलला सैन्य दलातून निवृत्त झालेल्या त्याच्या आजोबांनी शिस्तीचे धडे दिले आणि या शिस्तीतूनच त्याच्यात कणखरता आली. कोरोनाच्या परिणामांचा त्रास जाणवत असतानाही त्याने उपांत्य सामन्यात शतक ठोकून बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवले. उपकर्णधार रशीदसाठी तर त्याच्या वडिलांनी अपार कष्ट उपसले. जेव्हा त्यांची नोकरी गेली तेव्हा वेळप्रसंगी शहरे बदलत आपल्या वस्तू विकत त्यांनी गुजराण केली, पण मुलाचे क्रिकेट थांबू दिले नाही.

विकी ओटस्वाल हा वेंगसरकर अकादमीचा खेळाडू पण एकेकाळी क्रिकेटसाठी तो रोज वडिलांबरोबर लोणावळा ते मुंबई प्रवास करायचा. त्याचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनी कधी विकी नेटस्वर लवकर येतो तर कधी उशिरा येतो हे बघितल्यावर त्यांनी विकीला कुठून येतोस विचारले तर लोणावळा उत्तर कळल्यावरच जाधव सरांना या मुलाच्या मेहनत घेण्याच्या तयारीची कल्पना आली.

आपल्या महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू म्हणजे राजवर्धन हंगर्गेकर. जून 2020 मध्ये वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्यावर तो नैराश्येत गेला होता, पण पी. के. पेस फाऊंडेशनने त्याला मानसिक स्थैर्य दिले आणि विश्‍वचषकात स्थान मिळवायच्या तयारीने तो पुन्हा मेहनत करायला लागला. राज बावाला तयार करायला त्याचे वडील सुखविंदर बावांनी प्रचंड मेहनत घडवली. अंगरिक्ष रघुवंशीची कहाणी तर वेगळीच आहे. (Under 19 World Cup)

अकराव्या वर्षीच तो क्रिकेटचे धडे गिरवायला मुंबईला आला. त्याचा लहान भाऊ जो आज टेनिसपटू आहे त्याला लहानपणी ब्लड कॅन्सर झाला होता. तब्बल पाच वर्षे त्याचे उपचार बघत अंगरिक्षने रुग्णालयात रात्री काढल्या. त्याच्या आईच्या मते या कालखंडाने अंगरिक्षला अजून कणखर बनवले. या सर्व गोष्टीत एकच सामायिक धागा आहे तो म्हणजे हे सर्व खेळाडू सामान्य कुटुंबातून आले आहेत आणि त्यामुळेच त्यांना परिस्थितीशी झगडून विजयी बनायचे बाळकडू घरातच मिळाले होते. तेच त्यांनी मैदानात उतरवले आणि भारताला विश्‍वचषक मिळवून दिला.

आता प्रश्‍न असा आहे कीया कोवळ्या मुलांचा पुढचा मार्ग कसा आखायचा हे बीसीसीआयने ठरवले पाहिजे. यापूर्वी आपण बघितले की युवा विश्‍वचषकात चमकलेले सर्वच खेळाडू उच्च स्तरावर पोहोचू शकले नाहीत अथवा त्यांना त्यांचे स्थान टिकवता आले नाही. पृथ्वी शॉ हे त्यातले ताजे उदाहरण. प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू जो कुठच्याही गोलंदाजीच्या मार्‍याला सहज सामोरा जाऊ शकला असता आणि आपला सलामीचा प्रश्‍न सुटला असता, पण आज तो निवड समितीच्या रडारवरसुद्धा नाही.

शुभमन गिल अजून तंत्रात चाचपडतोय. यांच्यासाठी आयपीएलचे दरवाजे उघडले आणि तंत्र घोटायला सवडच मिळाली नाही. मी सरसकट आयपीएलला दोष देत नाही, पण ज्या खेळाडूंची परिपक्‍वता कमी असते ते या विविध फॉरमॅटच्या भूलभुलैयात होरपळून निघतात. आज, उद्या होणार्‍या आयपीएलच्या लिलावात यांच्यावर बोली लावली जाईल. कदाचित कुणी कोट्यधीशही होतील.

युवा भारतीय संघातील आठ खेळाडूंना आयपीएलच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले नाही. कारण नियमाप्रमाणे त्यांनी एकही प्रथम दर्जाचा सामना खेळलेला नाही किंवा लिलावाच्या वेळी त्याचे वय एकोणीस वर्षाचे नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे स्थानिक क्रिकेटच्या संधीच न मिळाल्याने त्यांना अपवाद म्हणून या यादीत सामील करून घ्यावे, असा एक युक्‍तिवाद चालू आहे.

युवा खेळाडूंच्या हाती परिपक्‍व होण्याच्या आत पैसा आला आणि त्याला जर ते यश, पैसे, प्रसिद्धी कशी हाताळायची याचे भान नसले तर गुणवत्ता वाया जाण्याची एक भीती असते. 2012 साली पंजाब क्रिकेट असोसिएशन त्यांच्याशी संलग्‍न 21 वर्षांखालील खेळाडूंना आयपीएल सकट कुठचेही टी-20 खेळायला परवानगी देत नसत. (Under 19 World Cup)

आजही तो नियम लागू आहे का माहीत नाही, पण जरा विचार केला तर या नियमात तथ्य आहे. या मर्यादित षटकांच्या क्रिकेटने क्रिकेटपटूंचे लक्ष विचलित होऊ शकते, तंत्रावर परिणाम होऊ शकतो. आयपीएलच्या अनेक फायद्यांबरोबर हा तोटाही आहे. या खेळाडूंना कमीत कमी एक मोसम स्थानिक क्रिकेट खेळायची सक्‍ती केली पाहिजे. अनेक आयपीएल खेळाडू देशाकडून खेळताना निष्प्रभ ठरून एक-दोन संधीनंतर कायमचे बाहेर फेकलेले आपण पाहिले आहेत.

भारतासाठी पाचव्यांदा युवा विश्‍वचषक जिंकल्याबद्दल या युवकांचे पुन्हा मन:पूर्वक अभिनंदन पण ही युवा मंडळी म्हणजे बीसीसीआयच्या हातात आलेले मातीचे घडे आहेत. यातल्या घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे आहे. बीसीसीआय त्यांना क्रिकेटच्या कुठच्या फिरत्या चाकावर बसवून मातीला आकार देतील यावरच कुणा मुखी पडते लोणी कुणा मुखी अंगार पडेल हे काळच ठरवेल.

निमिष वा. पाटगावकर

Back to top button