

Shravan 2026 surya chandra grahan puja rules
पुढारी ऑनलाईन : Shravan 2026 : श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र आणि शुभ मानला जातो. मात्र, यंदाचा श्रावण धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून विशेष ठरणार आहे. पंचांगानुसार, या वर्षी श्रावण महिन्यात एक नव्हे तर दोन ग्रहणे लागणार आहेत – एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण. श्रावणासारख्या पवित्र महिन्यात ग्रहणाचा योग आल्याने अनेक भक्तांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रहणाच्या काळात पूजा-अर्चना करता येईल का? सूतक काळ लागू होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
श्रावण २०२६ : ग्रहणे कधी लागणार?
सूर्यग्रहण (१२ ऑगस्ट २०२६)
पंचांगानुसार, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट २०२६ रोजी लागणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असून ते प्रामुख्याने आर्क्टिक, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांत दिसणार आहे.
चंद्रग्रहण (२८ ऑगस्ट २०२६)
रक्षाबंधनाच्या दिवशी, म्हणजे २८ ऑगस्ट २०२६ रोजी, वर्षातील शेवटचे आंशिक चंद्रग्रहण लागेल. हे ग्रहण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका या भागांत दिसणार आहे.
भारतात सूतक काळ मान्य असेल का?
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण ज्या प्रदेशात दिसते, तेथेच सूतक काळ मान्य केला जातो. यंदाची दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नसल्यामुळे भारतात सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन पूजा, जप, अभिषेक किंवा इतर धार्मिक विधींमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
पूजा-अर्चनेवर काय परिणाम होईल?
दोन्ही ग्रहणे भारतात दृश्यमान नसल्यामुळे मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्याची किंवा पूजा-अर्चनेवर बंदी घालण्याची गरज नाही. त्यामुळे श्रावणातील सोमवार, शिवपूजन, रुद्राभिषेक, जप, उपवास आणि इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे करता येतील.
चुकूनही करू नका या चुका
भारतात सूतक काळ लागू नसला तरी ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक मान्यतांनुसार काही गोष्टींची काळजी घेणे शुभ मानले जाते.
नकारात्मक विचारांपासून दूर राहा : श्रावण हा मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा काळ मानला जातो. त्यामुळे नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका.
पूजेची पवित्रता जपा : ग्रहणाबाबत भीती बाळगू नका. आपल्या इष्टदेवावर श्रद्धा ठेवा आणि भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करून सकारात्मक वातावरण निर्माण करा.
अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडियावर ग्रहणाबाबत अनेक चुकीच्या माहितीचा प्रसार केला जातो. भारतात न दिसणाऱ्या ग्रहणासाठी सूतकाचे नियम लागू होत नाहीत, त्यामुळे विनाकारण दिनचर्या बदलण्याची गरज नाही.
दानधर्म विसरू नका: श्रावण महिन्यात सात्त्विक दानाला विशेष महत्त्व आहे. ग्रहणाच्या दिवशीही आपल्या श्रद्धेनुसार गरजू व्यक्तींना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.