

jyeshtha adhik purnima 2026
मुंबई: ज्येष्ठ अधिक मासातील पौर्णिमा आज असून हिंदू धर्मात या तिथीला खूप महत्व आहे. या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने आरोग्य, सौभाग्य तसेच सुख-समृद्धीची प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. विशेषतः विवाहित महिलांसाठी हा दिवस पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील सुख-समृद्धीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्याने दोन पौर्णिमा येत आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून अधिक मासातील पौर्णिमेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास विशेष पुण्य लाभते, असे मानले जाते. तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे शक्य नसल्यास पवित्र जलाने स्नान करून संध्यावंदन करणेही शुभ मानले जाते. तसेच या दिवशी केलेले दान-पुण्य अत्यंत फलदायी ठरते. ज्येष्ठ पौर्णिमेबाबत अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रद्धा, सेवा, दान आणि पूजा-अर्चना केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतो. त्याचबरोबर कुटुंबातील सुख, आरोग्य आणि सौभाग्य वाढीस लागते.
ज्येष्ठ अधिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या फळांचे दान करणे शुभ मानले जाते. यामध्ये कलिंगड, खरबूज, काकडी किंवा ऊसाच्या रसाचे दान करता येते. तसेच गरजू लोकांना गोड पदार्थ दान करणे किंवा भोजन देणेही पुण्यकारक मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि पुढील पिढ्यांवरही सकारात्मक परिणाम होतो, अशी श्रद्धा आहे.
ब्रह्म मुहूर्त: पहाटे ४.३४ ते ५.१७
अभिजित मुहूर्त: दुपारी १२.१० ते १.०३
विजय मुहूर्त: दुपारी २.४८ ते ३.४१
घरामध्ये वास्तुसंबंधित अडचणी जाणवत असतील तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाचे रोप लावून त्याची पूजा करावी. पारंपरिक मान्यतेनुसार, वर्षभर त्याची सेवा केल्यानंतर ते एखाद्या मंदिराजवळ किंवा जलस्रोताच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी लावावे. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो, अशी धार्मिक धारणा आहे.