

akshaya tritiya 2026 date and shubh muhurat know from panchang
पुढारी ऑनलाईन :
Akshaya Tritiya 2026 Date And Time : अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी स्नान, दान आणि पुण्यकर्म केल्याने उत्तम फळ मिळते. तसेच या तिथीला माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे यावर्षी अक्षय्य तृतीया नेमकी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे, हे जाणून घेऊया.
अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पुण्यकर्म केल्यास त्याचे फळ अक्षय्य म्हणजेच अनंतकाळ टिकणारे असते. शास्त्रांमध्ये या तिथीला युगादी तिथी असेही म्हटले जाते, म्हणजे ज्या दिवशी नवीन युगाची सुरुवात झाली. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता वाहन, मालमत्ता, सोने इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते.
यंदा अक्षय्य तृतीया 19 आणि 20 एप्रिल या दोन तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा सण नेमका कोणत्या दिवशी साजरा करावा, ते पंचांगानुसार जाणून घेऊया.
अक्षय्य तृतीया 2026 कधी आहे?
पंचांगानुसार 19 एप्रिल, रविवारी सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी तृतीया तिथी सुरू होईल आणि 20 एप्रिल, सोमवारी सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होईल.
यावर्षी तृतीया तिथी 19 आणि 20 एप्रिल या दोन्ही दिवशी पूर्वाह्नकाळात येत असली तरी 20 एप्रिलला ती तीन मुहूर्तांपेक्षा कमी कालावधीची आहे. त्यामुळे 19 एप्रिल, रविवारी सकाळी 10:50 नंतर तृतीया तिथी पूर्वाह्न, मध्याह्न आणि अपराह्न व्यापते, म्हणून याच दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाईल.
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीया हा अबूझ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते, कारण हा सर्व दोषांचा नाश करणारा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी दिवसभर शुभकार्ये करता येतात.
या दिवशी जलपात्र, गूळ, वस्त्र इत्यादींचे दान करणे विशेष पुण्यदायी मानले जाते. तसेच पितरांचे तर्पण, स्नान आणि इतर धार्मिक कार्ये केल्यास उत्तम फळ मिळते.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान, स्नान, जप, पूजा आणि सत्कर्मांचे फळ अनंतकाळ टिकणारे असते. शास्त्रांनुसार या दिवशी सुरू केलेल्या नव्या कामांत प्रगती होते.
असेही मानले जाते की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले. या तिथीपासून सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुगाच्या प्रारंभाची गणना केली जाते. याच दिवशी उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला सुरुवात होते आणि गंगोत्री व यमुनोत्रीचे कपाट उघडले जातात.
तसेच या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला, अशीही मान्यता आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.