

Union Budget 2026 Yuva Shakti
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प 'युवा शक्ती'वर आधारित असून गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी समर्पित असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सीतारामन म्हणाल्या की, "आम्ही सत्ता हाती घेतल्यापासून देशाचा आर्थिक प्रवास स्थैर्य, वित्तीय शिस्त, शाश्वत विकास आणि मध्यम महागाई दराने अधोरेखित झाला आहे. जागतिक अनिश्चितता आणि अडथळ्यांच्या काळातही आम्ही जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांचे हे फळ आहे.सार्वजनिक गुंतवणुकीवर भर देतानाच सरकारने वित्तीय शिस्त आणि चलनविषयक स्थैर्य राखत व्यापक रचनात्मक सुधारणा केल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्यावर सरकारने भर दिला आहे. आत्मनिर्भरतेला मार्गदर्शक मानून आम्ही देशांतर्गत उत्पादन क्षेत्र बळकट केले आणि महत्त्वाच्या वस्तूंसाठी असणारे आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. त्याचबरोबर, रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता, सामान्य कुटुंबांची क्रयशक्ती आणि सर्वांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सुधारणा राबवल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या उपाययोजनांमुळे देशाने सुमारे ७% विकास दर गाठला असून, गरिबी निर्मूलन आणि लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यात मोठी प्रगती झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
भविष्यातील वाटचालीचा आराखडा मांडताना अर्थमंत्र्यांनी सहा प्रमुख क्षेत्रांवर सरकारचे विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट केले.
१. सात धोरणात्मक क्षेत्रांमधील उत्पादनात वाढ करणे.
२. जुन्या औद्योगिक क्षेत्रांचे पुनरुज्जीवन करणे.
३. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) जागतिक स्तरावर नेणे.
४. पायाभूत सुविधांना मोठी चालना देणे.
५. दीर्घकालीन सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करणे.
६. शहरांना आर्थिक क्षेत्रांच्या रूपात विकसित करणे.