केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचा अर्थसंकल्प मानला जात आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
गेल्या वर्षी सादर झालेला अर्थसंकल्प हा लोकप्रिय अर्थसंकल्प म्हणून ओळखला गेला. त्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला मोठा दिलासा देण्यात आला होता. उत्पन्नकरात सूट, नोकरदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवणे, स्वस्त औषधे आणि विमा क्षेत्रातील सुधारणा असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारचा मुख्य भर अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर असणार आहे. वाढती महागाई, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढवणे आणि विकासाचा वेग कायम ठेवणे या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशीही भारतीय शेअर बाजार सुरू राहणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार असला तरी, अर्थसंकल्पामुळे NSE आणि BSE या दोन्ही शेअर बाजारांमध्ये नियमित व्यवहार होणार आहेत.
उद्योगजगत, गुंतवणूकदार, व्यापारी, शेतकरी आणि नोकरदार वर्ग अशा सर्व घटकांनी सरकारकडे आपल्या अपेक्षा मांडल्या आहेत. अर्थसंकल्पात या अपेक्षांचा विचार केला जाईल, अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.