

Cradit Card Usage Tips: तुमच्याकडे किती क्रेडिट कार्डे आहेत, यापेक्षा तुम्ही तुमच्या क्रेडिट मर्यादेचा (Credit Limit) किती वापर करता, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अनेकदा लोक कार्ड्सच्या संख्येबद्दल गोंधळलेले असतात, परंतु बँका किंवा लेंडर्स तुमच्या कार्डच्या संख्येपेक्षा तुमच्या 'क्रेडिट युटिलायझेशन'वर (Credit Utilization) अधिक लक्ष देतात, असे मत आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या एकूण क्रेडिट मर्यादेच्या ३० टक्क्यांपेक्षा कमी वापर करणे. झेडईटी (ZET) चे संस्थापक मनीष शारा यांच्या मते, अनेक कार्डे असणे ही समस्या नाही, परंतु क्रेडिटवर जास्त अवलंबून राहणे धोक्याचे आहे. जर तुम्ही तुमच्या मर्यादेच्या ३० टक्क्यांहून अधिक खर्च करत असाल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. जर तुम्ही तुमचा स्कोअर सुधारू इच्छित असाल, तर हा वापर १० टक्क्यांच्या खाली ठेवणे अधिक फायदेशीर ठरते.
एकापेक्षा जास्त कार्डे असण्याचे काही फायदेही आहेत. फिक्स माय स्कोअरचे आनंद अग्रवाल सांगतात की, वेगवेगळ्या गरजांसाठी (उदा. प्रवास, जीवनावश्यक वस्तू, मोठ्या खरेदीसाठी) वेगवेगळी कार्डे वापरल्याने तुमची एकूण क्रेडिट मर्यादा वाढते, ज्यामुळे तुमचा 'युटिलायझेशन रेशो' कमी राहण्यास मदत होते.
मात्र, कार्डे वाढली की जबाबदारीही वाढते. ओलाईव्ह (Olyv) चे संस्थापक विनय सिंग यांच्या मते, जास्त कार्डे म्हणजे:
पेमेन्टच्या अनेक तारखा लक्षात ठेवणे.
ओव्हरस्पेंडिंगवर नियंत्रण ठेवणे.
पूर्ण बिल भरण्याची शिस्त पाळणे.
एक छोटी चूक किंवा उशिरा भरलेले बिल तुमच्या अनेक महिन्यांच्या चांगल्या क्रेडिट प्रोफाईलचे नुकसान करू शकते. त्यामुळेच सिद्धार्थ मौर्य दोन ते तीन पेक्षा जास्त कार्डे न ठेवण्याचा सल्ला देतात.
क्रेडिट कार्ड महाग नाही, पण त्याची थकबाकी (Balance) बाळगणे महाग पडते. बहुतांश कार्डे १८ ते ४५ दिवसांचा व्याजमुक्त कालावधी देतात. जर तुम्ही पूर्ण बिल वेळेत भरले नाही आणि फक्त 'मिनिमम बॅलन्स' भरला, तर वार्षिक ३६ ते ४८ टक्के दराने व्याज आकारले जाते. एकदा का थकबाकी राहिली की, नवीन खरेदीवरही पहिल्या दिवसापासून व्याज लागू होते. यामुळेच बिल पूर्णपणे आणि वेळेवर भरण्यासाठी 'ऑटोमेट पेमेन्ट'चा वापर करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
निष्कर्ष: क्रेडिट कार्ड हे आर्थिक समस्या निर्माण करत नाहीत, तर आर्थिक अज्ञानामुळे समस्या निर्माण होतात. ३० टक्क्यांची मर्यादा न ओलांडणे आणि कधीही थकबाकी न ठेवणे, हीच खरी आर्थिक शिस्त आहे.