गुंतवणूकदारांनी आपल्या एसआयपीत एका फंडमधून दुसर्या फंडमध्ये सतत जाण्याचा किंवा बदल करण्याचा मोह टाळला पाहिजे. यास ‘रिव्हर्सन टू मीन’ संकल्पना कारणीभूत आहे, त्यामुळे दीर्घकाळापासून करण्यात येणार्या गुंतवणुकीवरच्या चांगल्या परताव्यावर पाणी पडू शकते. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या आकडेवारीनुसार, मे 2024 मध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद होण्याचे प्रमाण 0.88 टक्के या विक्रमी पातळीवर पोचले. हा आकडा सामान्य सरासरी 0.51 टक्क्याच्या तुलनेत अधिक आहे. हे प्रमाण एखाद्या महिन्यात सुरू होणारे एसआयपी किती प्रमाणात बंद झाले, हे सांगते.
एसआयपी बंद करण्याचे प्रमाण अनेक कारणांनी वाढले. निवडणूक निकालावरून अनिश्चितता वाटू लागल्याने बाजारात चढउतार राहिला. अनेक गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली कारण मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअरचे मूल्य बरेच वाढले होते. केवायसी प्रक्रियेतील अडथळे हेदेखील एसआयपी बंद होण्याचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. ज्या गुंतवणूकदारांनी आधारशिवाय केवायसी केलेली होती, त्यांना पुन्हा एकदा या प्रक्रियेतून जावे लागले. काही फंडांनी खराब कामगिरी केल्याने आणि आर्थिक ध्येयात बदल झाल्याने नव्याने फंड खरेदी करणे, उत्पन्नात घट किंवा खर्चात वाढ यांसारख्या कारणांमुळेही एसआयपी बंद करण्याचा ट्रेंड राहिला.
एखादा फंड समाधानकारक परतावा देत नसेल, तर ते एसआयपी बंद करण्याचे प्रमुख कारण राहू शकते; परंतु फंडच्या कामगिरीचे आकलन करताना आपली रणनीती ही तात्पुरत्या रूपात अनुकूल आहे की नाही किंवा फंडमध्येच काही उणिवा आहेत, हे पाहिले पाहिजे. फंडमध्येच उणिवा असतील, तर त्या दूर करायला हव्यात. अन्य कारण म्हणजे फंडचे भवितव्य किंवा जोखीम उचलण्याच्या त्याच्या प्रोफाईलमध्ये होणारा बदल होय. कदाचित या बदलामुळे फंड हा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत फिट बसत नसेल. याशिवाय गुंतवणूकदारांची जोखीम उचलण्याच्या क्षमतेत बदल झालेला असेल तरीही फंडच्या उपयुक्ततेवर परिणाम होऊ शकतो. जर उत्पन्नात घट किंवा खर्चात अचानक वाढ होत असेल, तर गुंतवणूकदारांना व्यक्तिगत आर्थिक आव्हानांच्या कारणांमुळे त्यांच्यासाठी वेगळी रक्कम सतत बाजूला काढून ठेवणे कठीण राहू शकते. एसआयपीशी संबंधित आर्थिक ध्येय गाठले असेल, तर त्याला थांबवता येणे शक्य आहे. सेवानिवृत्ती, जागेत बदल, आर्थिक मालमत्तेतून भौतिक मालमत्तेकडे जाणे अन्य कारणदेखील राहू शकते.
दीर्घकाळातील गुंतवणूकदारांनी बाजाराच्या घसरणीत एसआयपी कधीही थांबवू नये. बाजारात घसरणीच्या काळात प्रत्येक प्रकारचा फंड हा जादा युनिट खरेदी करतो, त्यामुळे दीर्घकाळात त्याचा चांगला परतावा मिळतो. वास्तविक, घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवायला हवी.
गुंतवणूकदारांनी आपल्या एसआयपीला एका फंडातून दुसर्या फंडात सतत बदलण्याची सवय थांबविली पाहिजे. त्यास ‘रिव्हर्सन टू मीन’ अशी संकल्पना कारणीभूत आहे. बाजारातील विविध टप्प्यांत वेगवेगळ्या गुंतवणूक पद्धतीला प्राधान्य दिले जाते. उदा. 2019 पासून 2021 पर्यंत एखाद्या फंडने चांगली कामगिरी केली असेल, तर त्याचे मूल्य चांगले राहते. प्रत्येक फंड मॅनेजरची आपली गुंतवणुकीची शैली असते. बाजाराच्या अनुकूल शैली नसेल, तर त्याची कामगिरी खराबच राहील. शेवटी काही जण खराब कामगिरीच्या फंडकडून दुसर्या चांगल्या फंडमध्ये जाण्याची धडपड करतात आणि फंडात आणि एसआयपीत बदलतात. हे धोरण एखादेवेळी फायदेशीर ठरू शकते; मात्र प्रत्येकवेळी अशीच सवय ठेवली, तर नुकसान होऊ शकते. या सवयीतून एखाद्या फंडच्या बाहेर पडलात, तर तेथे कदाचित उसळी येण्याची शक्यता राहते. त्याचबरोबर दमदार कामगिरी करणार्या फंडची निवड करत असाल, तर तेथे कालांतराने घसरीचा माहोल राहू शकतो. यापासून वाचण्यासाठी फंडांत वैविध्यपणा असावा. एका प्रकारचे फंड घेण्यापासून टाळले पाहिजे. प्रत्येक फंडसाठी अनुभवी फंड मॅनेजरची निवड करावी आणि दीर्घकाळांपर्यंत गुंतवणूक करावी.