

AI FASTag Toll System: देशातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. केंद्र सरकार लवकरच अशी अत्याधुनिक टोल सिस्टम आणणार आहे, ज्यामध्ये वाहन न थांबवता थेट टोल रक्कम खात्यातून कापली जाईल. म्हणजेच “नो स्टॉप टोल सिस्टम”मुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की डिसेंबर 2026 पर्यंत देशातील अनेक राष्ट्रीय महामार्गांवर बॅरियर-फ्री टोल प्रणाली लागू करण्याची सरकारची योजना आहे. लॉजिस्टिक्स पॉवर समिट अँड अवॉर्ड्स 2026 कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
या नव्या प्रणालीमध्ये AI आधारित Automatic Number Plate Recognition (ANPR) तंत्रज्ञान आणि RFID आधारित FASTag चा वापर केला जाणार आहे. महामार्गांवर बसवलेले हाय-टेक कॅमेरे वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करतील आणि FASTag च्या मदतीने टोलची रक्कम आपोआप कापली जाईल. त्यामुळे वाहनचालकांना टोल नाक्यावर थांबण्याची गरजच नाही.
सरकारच्या मते, या प्रणालीमुळे टोल प्लाझांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. अनेकदा टोल प्लाझांवरील लांबच लांब रांगा आणि वादामुळे वाहनचालक त्रस्त होतात. नवीन प्रणालीमुळे हा त्रास जवळपास संपणार आहे.
जर एखाद्या वाहनाने नियमांचं पालन केलं नाही किंवा टोल भरणं टाळलं, तर त्या वाहनधारकाला ई-नोटीस पाठवली जाईल. वेळेत पैसे न भरल्यास FASTag सस्पेंड केलं जाऊ शकतं. तसेच VAHAN डेटाबेसशी जोडलेल्या इतर दंडात्मक कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.
गडकरी यांनी यावेळी भारतातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यावरही भर दिला. त्यांच्या मते, देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर लॉजिस्टिक्स खर्च सिंगल डिजिटमध्ये आणणं गरजेचं आहे. सध्या एक्सप्रेसवे आणि आर्थिक कॉरिडॉरमुळे भारताचा लॉजिस्टिक्स खर्च 16 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय त्यांनी ग्रीन फ्यूल आणि पर्यायी इंधनावरही भर दिला. भारत आपल्या तेलाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने बायोफ्यूल आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या पर्यायांचा वापर वाढवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारच्या या नव्या योजनेमुळे भविष्यात भारतातील महामार्ग प्रवास अधिक स्मार्ट, जलद आणि तंत्रज्ञानाधारित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.