केवायसीच्या कागदपत्रांचा चुकीचा वापर रोखा | पुढारी

केवायसीच्या कागदपत्रांचा चुकीचा वापर रोखा

विनायक सरदेसाई

केवायसीच्या कागदपत्रांचा चुकीचा वापर होत असल्याच्या घटना हल्ली वारंवार ऐकायला मिळत आहेत. पुण्याच्या एक महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेली फसवणूक दाखवण्यात आली. एका हातगाड्यावर एका व्यक्तीची पॅनकार्डची झेरॉक्स त्या महिलेस सापडली. त्यानंतर त्या महिलेने स्कॅनर, संगणक आणि प्रिंटरच्या मदतीने त्या पॅनकार्डला आपले कार्ड म्हणून तयार केले. आयडी प्रुफ दाखवून तिने दिल्लीत एक फ्लॅट भाड्यावर घेतला आणि एक गुन्हा घडवून आणला.

परिणामी, मूळ पॅनकार्डधारकास बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. पॅनकार्डच्या नंबरचा गैरवापर करून तिने अनेक उद्योग केले होते. अशा प्रकारची घटना मुंबईतही घडली होती. एका ठकसेनने केवायसीच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून क्रेडिट कार्ड मिळवले. बारकाईने पाहिल्यास, अशा घटना घडण्यामागे आपला निष्काळजीपणा कारणीभूत राहू शकतो.

आपण पुरेशी खबरदारी घेतली नाही; तर आपले पॅनकार्ड, आधारकार्डवर बरेच जण आर्थिक गैरव्यवहार करू शकतात. जीवन विमा, म्युच्युअल फंड, बँक खाते, कर्ज, स्वयंपाकाचा गॅस यासाठी केवायसी म्हणजेच अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असते. सर्व जागरूक नागरिकांना या कागदपत्रांबाबत सजग राहणे आवश्यक असते. परंतु त्याची हाताळणी योग्य रितीने न केल्यास आर्थिक आणि मानसिक फटका बसू शकतो. केवायसीशी निगडित कोणतीही कागदपत्रे आणि त्याच्या सत्यप्रती कोठेही टाकू नयेत किंवा ठेवू नयेत.

केवायसी मागणार्‍या बँकांना सहकार्य करा

केवायसी कागदपत्राशी होणारी छेडछाड रोखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहणे आवश्यक आहे. तसेच वित्तीय कंपन्या आणि संस्थांनादेखील तितकीच काळजी घ्यावी लागणार आहे. ग्राहकांशी संबंधित निर्णय घेताना केवायसी कागदपत्रांची तपासणी संगणकीय पद्धतीने करून घेण्याबाबत बँकांनी सजग राहिले पाहिजे. एवढेच नाही, तर ऑनलाईन केवायसी फॉर्म भरण्याचा मोह टाळावा. आपल्या मेलवर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भातील फसवे मेल येत असतात. परंतु प्रत्यक्षात बँकेकडून मेल पाठवला आहे की नाही, त्याची खातरजमा करून यायला हवी. स्वत: शाखेत जाऊनच केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. मेलवर किंवा एसएमसवर कोणतीही गोपनीय माहिती भरू नये.

केवायसीच्या कागदपत्रांची संगणकीय तपासणी गरजेची

विकसित देशात केवायसीशी निगडित कागदपत्रांची तपासणी संगणकाद्वारे केली जाते. या तंत्राच्या आधारे एखाद्या व्यक्तीकडून संबंधित कागदपत्रांचा गैरवापर तर होत नाही ना? याची खातरजमा केली जाते. भारतात अशा प्रकारच्या तंत्राचा वापर अनेक ठिकाणी सुरू झाला आहे. परंतु या व्यवस्थेला अद्याप पूर्णपणे लागू केलेले नाही. त्यामुळे या वित्तीय संस्था जुन्याच पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे केवायसी फसवणुकीच्या घटना सतत घडताना दिसून येतात.

Back to top button