विमा : अपघातग्रस्तांना पोस्टाचं ‘सुरक्षाकवच’ | पुढारी

विमा : अपघातग्रस्तांना पोस्टाचं ‘सुरक्षाकवच’

सुचित्रा दिवाकर

पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मुलांचा शिक्षणाचा खर्च, दवाखाना तसेच ओपीडी इत्यादींचा खर्च असे अनेक फायदे या योजनेत दिले जातात.

भारतीय डाक विभागाने गतवर्षी टाटा एआयजीसोबत करार करून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अपघात संरक्षण विमा योजना आणली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना वर्षाकाठी 10 लाख रुपयांचा अपघात विमा फक्त 299 आणि 399 रुपयांचा हप्ता भरून काढता येतो. 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना या योजनेत भाग घेता येईल. या विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थीचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. हे खाते नसल्यास ते नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अथवा पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक यांच्या साहाय्याने नवीन खाते काढता येते.

विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व किंवा कायमचे अंशिक अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. याशिवाय या विमाअंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरीच उपचार घेतल्यास 30 हजार, तर रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 हजारांप्रमाणे रोज 1 हजार रुपये दिले जातात. तसेच कुटुंबाला प्रवासखर्च म्हणून 25 हजार रुपयेदेखील दिले जातात. कोणत्याही कारणाने अपघाताने व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये तसेच किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.

399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाख रुपयेपर्यंतची मदत शिक्षणासाठीही मिळू शकते. पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मुलांचा शिक्षणाचा खर्च, दवाखाना तसेच ओपीडी इत्यादींचा खर्च असे अनेक फायदे या योजनेत दिले जातात.
आजारपणात प्रकृती खराब असल्याने दवाखान्यात अ‍ॅडमिट झाल्यास, पॉलिसीधारकाला दहा दिवसांसाठी दररोज हजार रुपयेप्रमाणे दवाखान्याचा खर्च दिला जातो. शहरी तसेच ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय लोकांना या विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तथापि नौदल, हवाई तसेच पोलिस दलातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हेही लक्षात घ्या

  • आरोग्यासंदर्भात गंभीर आजार असणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • तसेच आत्महत्या किंवा मादक पदार्थांचे सेवन केल्याने अपघात झाल्यास या योजनेचा लाभ पॉलिसीधारकाला मिळणार नाही.
  • खाण कामगार, बांधकाम कामगार, ड्रायव्हिंगचा व्यवसाय करणारी व्यक्ती, विषारी अणि स्फोटक औषध तयार करणार्‍या कंपनीमधील कामगार यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा एकूण कालावधी हा एक वर्ष इतका असेल. एक वर्षानंतर विमाधारकास आपल्या विम्याचे नूतनीकरण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करावे लागेल.

Back to top button