आयटीआर रिफंड मिळण्यास विलंब का होतो? जाणून घ्या कारणे | पुढारी

आयटीआर रिफंड मिळण्यास विलंब का होतो? जाणून घ्या कारणे

विनायक सरदेसाई

प्राप्तिकर विवरण हा एक अर्ज असून करदाता त्याचा वापर करत प्राप्तिकर विभागाला उत्पन्न आणि कराची माहिती देतो. कोणत्याही करदात्यावरील कराची आकारणी ही त्याच्या उत्पन्नाच्या गणनेच्या आधारावर करण्यात येते.

आपण 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरलेले असेल आणि आयटीआर भरल्यानंतर रिफंड दाखवत असेल, तर तो नोंदणीकृत खात्यामध्ये निश्चित कालावधीत जमा केला जातो; मात्र काही जणानां बर्‍याच काळानंतरही रिफंड मिळत नाही. अशावेळी काय करावे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आपल्यालाही रिफंड मिळालेला नसेल, तर खालील बाबी लक्षात घ्या.

पहिले म्हणजे रिफंडबाबत चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, आपण आयटीआर दाखल करताना एखादी किरकोळ चूक केली असेल, तर प्राप्तिकर विभाग आयटीआर रिफंड प्रोसेस करत नाही. म्हणून आयटीआर भरताना कोठे चूक झाली असावी, याचा अंदाज असायला हवा. याशिवाय अन्य काही कारणे राहू शकतात की, ज्यामुळे रिफंड मिळण्यास विलंब राहू शकतो.

रिफंड न मिळण्याची कारणे

ई व्हेरिफिकेशन गरजेचे : प्राप्तिकर विवरणपत्र ई-व्हेरिफाईड असणे गरजेचे आहे. आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केलेले नसेल, तर आपल्याला रिफंड मिळू शकत नाही.

थकबाकीची रक्कम : मागील आर्थिक वर्षाची काही थकबाकी, कर भरणा राहिला असेल तर रिफंड मिळण्यात विलंब राहू शकतो. कारण, प्राप्तिकर विभाग हा आपल्यावरील थकबाकी ही रिफंडमध्ये अडजेस्ट करेल.

बँक खाते : आपले बचत खाते, चालू खाते व्हेरिफाईड असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, एकच खाते आणि पॅन कार्ड असायला हवे. बँक खात्याचा आयएफएससी कोडदेखील असायला हवा. यानुसार आयटीआर रिफंड मिळण्यास मदत मिळू शकते आणि प्राप्तिकर रिफंड प्रकिया सहज पार पाडली जाते.

प्राप्तिकर विवरण म्हणजे काय?

प्राप्तिकर विवरण हा एकप्रकारचा अर्ज असून त्यानुसार करदाता वार्षिक उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाला दरवर्षी सादर करत असतो. स्लॅबप्रमाणे कर भरतो. एखाद्या रिटर्नच्या आधारे एका आर्थिक वर्षात अतिरिक्त कर भरल्याचे स्पष्ट होत असेल किंवा अधिक टीडीएस कापला गेलेला असेल, तर प्राप्तिकर विभागाकडून रिफंड दिला जातो.

प्राप्तिकर कायद्यानुसार, नियमितपणे उत्पन्न मिळवणारी व्यक्ती किंवा कंपनीने दरवर्षी आयटीआर दाखल करणे गरजेचे आहे. वेतन, व्यवसायातून नफा, मालमत्तेतून उत्पन्न किंवा लाभांश, भांडवली नफा, व्याज, अन्य स्रोतांतून मिळणारे उत्पन्न या बाबींची माहिती देण्यासाठी आयटीआर भरणे बंधनकारक आहे. कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला एक निश्चित तारखेच्या आत आयटीआर भरणे गरजेचे आहे. एखादा करदाता वेळेत आयटीआर भरत नसेल, तर त्याला दंड भरावा लागतो.

Back to top button