विमा : विमा कंपनीने दावा नाकारल्यास…’हे’ आहेत पर्याय | पुढारी

विमा : विमा कंपनीने दावा नाकारल्यास...'हे' आहेत पर्याय

  • सुभाष वैद्य

विमा कंपन्या अनेकदा वेगवेगळ्या कारणांवरून दावे नामंजूर करते. अशा वेळी पॉलिसीधारक किंवा वारसदार हताश होतात आणि या विम्याचा दावा आपल्याला मिळू शकत नाही, असा विचार करत राहतात. पण निराश होण्याचे आणि त्रास करून घेण्याचे कारण नाही. विमा कंपनीने आपला दावा फेटाळला असला तरी तो मिळवण्यासाठी आणखी काही पर्याय खुले असतात.

तक्रार अधिकार्‍यांकडे अर्ज : एखादा दावा नामंजूर केल्यास पॉलिसीधारक आणि वारसदार यांनी सर्वप्रथम विमा कंपनीच्या ग्रीव्हन्स अधिकारी (तक्रार निवारण अधिकारी) यांच्याकडे जाणे गरजेचे आहे. दावा फेटाळून लावण्यामागचे कारण जाणून घेतले पाहिजे. यासाठी अधिकार्‍याकडे लेखी तक्रार सादर करावी लागेल आणि माहिती मिळवावी लागेल. तक्रार अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार आपण समाधानी असाल तर ठीक आहे, अन्यथा आणखी काही पर्याय आहेत.

इर्डा (irdai) : ग्रीव्हन्स अधिकार्‍याच्या उत्तराने समाधानी नसाल, तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा)कडे तक्रार नोंदवू शकता. ‘आयआरडीएआय’च्या कंझ्युमर एज्युकेशन संकेतस्थळावर किंवा इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टिमवर तक्रार नोंदवू शकता. ‘इर्डा’च्या इंटिग्रेटेड ग्रीव्हेन्स मॅनेजमेंट सिस्टिमच्या मदतीने तक्रारीचे स्टेट्सदेखील तपासू शकता.

विमा लोकपाल : पॉलिसीधारक विमा कंपनीच्या उत्तराने समाधानी नसेल, तर विमा लोकपालाकडे तक्रार करता येऊ शकते. ‘इर्डा’च्या कंझ्युमर एज्युकेशन संकेतस्थळानुसार पॉलिसीधारकाच्या समस्या निकाली काढणे, नि:पक्षपणे चौकशी करून न्यायालयाबाहेर त्याचा निपटारा करणे यासाठी विमा लोकपालची नियुक्त केलेली असते. सध्याच्या काळात देशभरात 17 विमा लोकपाल असून त्यांच्याकडे आपण विमा कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.

Back to top button