रिझर्व्ह बँकेने रेपा दरात ०.३५ टक्के वाढ केल्यामुळे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरातही तेवढीच वाढ होणे अटळ होते. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज व वैयक्तिक कर्जे महागणे अटळ होते. याचा फटका सर्वच कर्जदारांना बसणार आहे. रेपोदरात वर्षभरात अनेकदा वाढ झाली आहे. आता रेपो दर ५.९० टक्क्यांवरून ६. २५ टक्यांवर गेला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मते महागाईची समस्या अजूनही गंभीर राहणार आहे. पुढील १२ महिन्यांत महागाईची दर वाढ ४ टक्क्यांपेक्षा वरच राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून अनेक वस्तूंना मागणी आहे. म्हणजेच अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागांचे नागरीकरण वाढत आहे, असे दिसते.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे शेअर बाजारावर दरवेळी थोडाफार परिणाम होतच असतो. यावेळीही तो तसा झाला. एशियन पेंटस् हिंदुस्थान युनिलिव्हर, एल अँड टी, अॅक्सिस बँक, आयटीसी, महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग वाढले. हे शेअर्स यापुढेही अजून वाढू शकतील. त्यामुळे सध्याच्या भावापेक्षा त्यांचे भाव ५ ते ७ टक्के जेव्हा कमी होतील तेव्हा ते लक्षात ठेवून घेणे फायद्याचे ठरेल. या सर्व कंपन्या मोठ्या उद्योग क्षेत्रातल्या आहेत.
आजच 'सुला वाईन्स' या नाशिकच्या कंपनीची प्राथमिक समभागांची विक्री आजपासून सुरू होत आहे. त्यासाठी ३४० ते ३५७ रुपये ही किंमत पट्टा निश्चित केला गेला आहे. कारण वाईनमध्ये मद्यार्काचे प्रमाण कमी असते. ही वाईन नाशिकच्या द्राक्ष मळ्यातून केली जाते.
भारतीय अर्थव्यवस्था आत सुदृढ झाली असून तिच्यातील द्रवता वाढती आहे. त्यामुळे 'सुला वाईन्स' सारख्या नवीन समभागांत मागणी वाढतच राहील.
नुकतेच जागतिक बँकेने आपले भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे मत नोंदवले आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ६.९ टक्के राहणार आहे, असा सुधारित अंदाज जागतिक बँकेने दिला आहे. अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर यापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येऊ शकेल. बँकेच्या इंडिया डेव्हलपमेंट अपडेट या अहवालात ही बाब ठळकपणे मांडली गेली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे…
१) रिझर्व्ह बँकेकडे आत सोने, डॉलर, डॉईश मार्क यांचा राखीव साठा भरपूर आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
२) भारताच्या वित्तीय धोरणातील लवचिकतेबाबतची पारदर्शकता व विश्वासार्हता वाढली आहे. भारत आता कोणतीही उत्पादने काढू शकत असल्यामुळे आपले परावलंबन कमी झाले आहे.
जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी (Infirmation Technology) कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा धडाका लावला असताना भारतीय कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर करण्याचा पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाची कर्मचारी भरती ४३ टक्क्यांनी वाढली आहे. यापुढेही हेच धोरण अंमलात येणार आहे. इन्श्युरन्स कंपन्यांमध्ये सर्वाधिक नोकरभरती झाली आहे. म्हणजे ४२ टक्के इतकी भरतीतील वाढ आहे. तर बँकिंगमध्ये ती ३४ टक्के आहे. रिअल इस्टेटमध्ये ३१ टक्के भरतीतील वाढ आहे.
देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी टेक महिंद्र आहे. ती येत्या वर्षभरात २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. कर्मचारी भरतीसाठी विज्ञापन तंत्रज्ञान हे ४ थे क्षेत्र उपलब्ध होत आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशाचा जीडीपी- सकल राष्ट्रीय उत्पादन २५६ लाख कोटी रुपयांवर होता. आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत म्हणजेच पुढील १० वर्षांत मोठी हनुमान उडी घेऊन तो ६३९ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतात पुढी १० वर्षांत बेरोजगारीची समस्या असणार नाही. मात्र त्यासाठी काहीतरी कौशल्य असण्याची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी तरुणवर्गाने काहीतरी कौशल्य व कसब आत्मसात करण्याची जरूरी आहे.
जमिनीवरून अंतराळात मारा करणारी स्वदेशी (भारतीय) बनावटीची ही पहिली अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकसन संस्था (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) ही यामध्ये कार्यरत आहे. लष्करी व हवाई दलाकडून या प्रणालीचा वापर होत आहे. दक्षिण पूर्व आशियाई विभागातील अनेक देशांनी या प्रणालीच्या खरेदी मागणी केली आहे. त्यामुळे निर्यातीसाठीही एक नवीन क्षेत्र भारताला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे डॉलर व अन्य विदेशी चलनाचा साठा रिझर्व्ह बँकेकडे वाढत राहील.
डॉ. वसंत पटवर्धन