आपले मानसिक आरोग्य हे शरीराच्या सर्व अवयवांवर प्रभाव टाकत असते. चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. काहीतरी चांगले करण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपले आरोग्य नेहमीच चांगले राहील हे लक्षात ठेवा. कुठलाही आजार आपल्या जवळ फिरकणार नाही. मात्र, कुठल्याही लहान-मोठ्या गोष्टींवर विनाकारण रागावण्याची सवय असेल, तर आपले आरोग्य नेहमीच खराब राहील. राग अथवा क्रोध हा माणसाला आतल्याआत खात असतो. रागामुळे खूप जास्त तणाव निर्माण होतो आणि तणाव हेच अर्ध्या आजारांचे मूळ असते.
रागामुळे शरीरातील अंतर्गत कार्यामध्येदेखील बिघाड होतो आणि वेगवेगळे आजार शरीरात घर करू लागतात. माणसाला ज्यावेळी राग येतो त्यावेळी हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो. सतत चिडचिड करत असाल तर हृदयाचा वेग अधिक वाढून हृदयाचा झटका येऊ शकतो. राग आल्यानंतर स्वतःच्या शरीराचे निरीक्षण केल्यास ते आपल्याला थरथरलेले जाणवते. हृदयाची गतीही वाढलेली दिसते.
अनिद्रा ः ज्यावेळी व्यक्ती रागात असते त्यावेळी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये मोठी उलथापालथ होऊ लागते. त्यांच्या कार्यात अनियमितता आल्याने ज्या व्यक्ती संतापतात त्यांना अनिद्रेची तक्रार निर्माण होते आणि झोप न लागल्याने आणखी अनेक आजार उद्भवू शकतात.
उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाब हा आजार तसे पाहिले तर अनेक कारणांमुळे होतो. मात्र, अधिक रागावल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.
श्वास घ्यायला अडचण : ज्या व्यक्तींना अस्थम्यासारख्या श्वसनाशी संबंधित आजारांचा त्रास आहे, त्यांना संताप केल्यानंतर श्वास घ्यायला अडचण येऊ लागते आणि खूप धाप लागते.
डोकेदुखी : ज्यावेळी आपण रागावतो तेव्हा रक्तवाहिन्या वेगाने काम करू लागतात. त्यामुळे डोक्यात वेदना निर्माण होतात. राग आल्यानंतर जर डोक्यात वेदना सुरू झाल्या, तर अशा वेळी आपण त्वरित शांत झाले पाहिजे.
याव्यतिरिक्त इतरही बरेच त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून योग्य वेळी रागावर नियंत्रण राखणे गरजेचे असते.