आमवात (रूमेटाईड आर्थराईटिस) हा एक प्रकारचा संधिवात आहे. आमवात हा संधिवात असला तरीही याचा परिणाम केवळ सांध्यांवरच नव्हे तर शरीराच्या अन्य अवयवांवरही होत असतो. आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे.
या आजारात सांध्यांमध्ये सूज येणं, तीव्र सांधेदुखी, सांध्याची झीज होणं आणि सांध्याचे वेडेवाकडे होणं, अशी लक्षणे दिसून येतात. म्हणूनच आमवाताकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान व उपचार घेणं गरजेचं आहे.
आमवात म्हणजे आम व वात दोषांमुळे होणारी सांधेदुखी. आम वाढवणारी व वात वाढविणारे कारणे ही आपल्या दिनचर्येशी (दिवसभरातील सर्व क्रिया) संबंधित आहेत. आपण सेवन केलेल्या आहारावर जठराग्नीची प्रक्रिया होऊन प्राकृत आहाररस तयार होतो.
काही कारणास्तव जसे की अग्निमांद्य निर्माण झाले असता हा तयार होणारा आहाररस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतो व आमनिर्मिती होते.
हा आम अशा स्थितीतला असतो की धड त्याचे शक्तीतही रूपांतर होत नाही, तसेच मलमार्गाने विसर्जनही होत नाही. असा जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा आम अनेक आजारांना निमंत्रण देतो. उदा. सांध्यांमध्ये आम पोहोचला तर आमवात (सांधेदुखी) होतो.
आमवाताच्या रुग्णांमध्ये सकाळी सांधे जखडणे ही मुख्य तक्रार असते. यासाठी प्रत्येक सांध्यांचे सूक्ष्म व्यायाम जखडण कमी होण्यास मदत करतात.
याशिवाय रक्तामध्ये साठून राहिला तर रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते, रक्तवाहिन्यांमध्ये गेला तर त्यांच्यात अवरोध निर्माण होतो, हृदयविकार, फुफ्फुसांमध्ये पोहोचला तर फायब्रॉसिससारखे आजार होऊ शकतात. म्हणून आमदोषाची लक्षणे दिसू लागली की लगेच त्यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे.
* अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे)
* विरुद्ध आहार-विहाराचे सेवन
* अभिष्यंदी (दोषप्रकोपक) आहाराचे सेवन. उदा. दही, आंबवलेले पदार्थ इत्यादी
* शिळे अन्नपदार्थ खाणे
* अति लंघन (अति उपवास) करणे
* रात्री अति प्रमाणात जागरण (रात्रपाळी करणार्या व्यक्ती)
* वातप्रकोपक आहारविहार
* दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे
* व्यायामाचा अभाव
* सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नये. तहान असल्यास कमी प्रमाणात कोमट पाणी प्यावे
* पाण्यात सुंठ उकळून काढा तयार करून तो उपाशी पोटी घ्यावा. यामुळे सांध्यातील सूज कमी होण्यात मदत मिळते.
* आमवाताच्या रुग्णांनी भूख लावल्यावरच जेवावे. सकाळी नाश्तात सूप, लाह्यांचा चिवडा, राजगिरा लाडू किंवा फळांचा समावेश करावा.
* दररोज कोमट पाण्यात 1 चमचा सुंठ पावडर मिसळून ते पाणी प्यावे.
* रात्री हलक्या आहाराचे सेवन करावेत. एरंडतेल घातलेली ज्वारी किंवा नाचणीची भाकरी व वेलींच्या भाज्यांचा आहारात समावेश असावा.
* जखडलेल्या सांध्यांना तेलांचा मसाज करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणताही मसाज करावा.
* दिवसा झोपणे आणि रात्रीच्या वेळी जागरण करणे शक्यतो टाळावे.
* आमवात हा ऑटोइम्युन आजार असल्याने आपल्या शरीरात बाधक घटक (अॅण्टिबॉडीज) तयार होतात जे सांध्यांसाठी घातक ठरतात. यासाठी प्राणायाम करणं अतिशय फायदेशीर ठरू शकतं.
* आमवातातील रक्तकणांची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज डाळिंब, अंजीर, काळे मनुके, खजूर, यांचा आहारात समावेश असावा.
* थंडपेय किंवा बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळावे.
* मानसिक ताणामुळे वात वाढून आमवात बळावतो, अशावेळी ध्यान (मेडिटेशन) करावे.
* आमवात प्राथमिक अवस्थेत असल्यास आयुर्वेदिक औषध, योगासने आणि पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास नियंत्रणात ठेवणं शक्य होते.
* गुळवेल, सुंठ, हरितकी, एरंड तेल, गोमूत्र अशी बरीच औषधे आमवातासाठी वापरली जातात. यामुळे पचनशक्ती सुधारून शरिरात आम बनण्याची प्रक्रिया थांबते. सांध्यांकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढतो.
त्यामुळे सूज, वेदना कमी होण्यास मदत मिळते. तीळ, डिंक, मेथी, सुंठ, आद्रक यांचा आहारात वापर केल्यास शरीरातील हाडे मजबूत बनतात आणि पचनशक्ती सुधारते.
* सांध्यांतील दुखणं कमी करण्यासाठी नियमित योगासने करणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. योगामुळे सांध्याच्या ठिकाणी आम जास्त काळ टिकत नाही.
यामुळे हाडांची झीज टाळता येते. प्राणायाम, कपालभाती यांच्यासारख्या व्यायामांमुळे शरीरातील अँटिबॉडीज नियंत्रित होण्यास मदत होते.
* आमवात तीव्र किंवा जुना असल्यास पंचकर्म हा उत्तम उपाय आहे. शरीरातील आम बाहेर काढल्यामुळे सांध्यांची सूज, हाडांची झीज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते.
या प्रक्रियेत सांध्यांच्या ठिकाणी रक्तमोक्षण क्रियेद्वारे रक्त काढून (जळू) शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढविला जातो. त्यामुळे आमवाताच्या रुग्णांसाठी आयुर्वेदातील पंचकर्म हा उपाय अतिशय फायदेशीर ठरत आहे.
डॉ. वैशाली सावंत-चव्हाण