

महाशिवरात्री म्हणजे केवळ निराहार राहणे नव्हे, तर आत्मिक शुद्धीचा आणि देहाच्या विरक्तीचा उत्सव. या पवित्र दिवशी उपवासाला काय खावे? बाजारात साबुदाण्यासारखे आधुनिक उपवासाचे पदार्थ उपलब्ध असूनही, आजही परंपरेला मान देणाऱ्या घरांमध्ये 'वरीचे तांदूळ (भगर) आणि दाण्याची आमटी' हाच मुख्य बेत असतो.
महाशिवरात्री म्हणजे शिवभक्तांसाठी उपवास, जागरण आणि भक्तीचा मोठा उत्सव. या दिवशी घरोघरी उपवासाचे विविध पदार्थ बनवले जातात. मात्र, साबुदाणा खिचडीपेक्षाही 'वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी' या पारंपरिक जेवणाला अधिक महत्त्व दिले जाते. हे केवळ चवीसाठी नसून त्यामागे आयुर्वेद आणि धर्माची सांगड घातलेली पाहायला मिळते.
हिंदू धर्मात उपवासाचा मुख्य उद्देश मनावर ताबा मिळवणे आणि शरीराला विश्रांती देणे हा असतो. महाशिवरात्रीला 'राजस' किंवा 'तामस' आहार टाळून 'सात्विक' आहारावर भर दिला जातो. वरीचे तांदूळ (ज्याला भगर असेही म्हणतात) हे नैसर्गिकरीत्या तृणधान्य असून ते कोणत्याही प्रक्रियेविना शुद्ध स्वरूपात उपलब्ध असते. त्यामुळे पूजेच्या दिवशी याला अत्यंत शुद्ध आणि सात्विक मानले जाते.
उपवासाच्या दिवशी आपण दिवसभर काहीही खात नाही. अशा वेळी एकदम जड अन्न खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
वरीचे तांदूळ पचायला हलके असतात. त्यामध्ये फायबरचे (तंतुमय पदार्थ) प्रमाण भरपूर असल्याने ते पोट साफ ठेवण्यास मदत करतात. साबुदाणा अनेकदा गॅस किंवा पित्ताचा त्रास देऊ शकतो, त्या तुलनेत वरी अत्यंत गुणकारी ठरते.
वरीच्या तांदळात कर्बोदके (Carbohydrates) चांगल्या प्रमाणात असतात. महाशिवरात्रीला अनेक जण रात्रीचे जागरण करतात. हे जागरण करण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. दाण्याच्या आमटीमधील शेंगदाणे हे प्रथिनांचा (Proteins) उत्तम स्त्रोत आहेत. वरी आणि दाण्याची आमटी यांचे मिश्रण शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवते.
महाशिवरात्रीचा काळ हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा (ऋतू संधिकाल) असतो. या काळात शरीरातील पित्त वाढण्याची शक्यता असते. वरीचा गुणधर्म थंड आहे.
ग्लुटेन मुक्त (Gluten-Free): वरी पूर्णपणे ग्लुटेन मुक्त असल्याने आरोग्यासाठी सुरक्षित आहे.
लोहाचे प्रमाण: वरीमध्ये लोह मुबलक असते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
पोटाचे आरोग्य: फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
परंपरा: महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या उपवासाला तृणधान्ये खाण्याची पद्धत आहे, जी निसर्गाशी जवळीक साधते.
"महाशिवरात्रीचा काळ हा ऋतू बदलाचा काळ असतो. या काळात शरीरातील 'कफ' दोष वितळण्यास सुरुवात होते आणि जठराग्नी (पचनशक्ती) काहीशी मंदावलेली असते. साबुदाणा हा पचायला अत्यंत जड आणि चिकट (अभिष्यंदी) असल्याने तो शरीरात आम (विषारी घटक) निर्माण करू शकतो. याउलट, वरीचे तांदूळ हे 'लघू' म्हणजे पचायला हलके आणि 'शीत' म्हणजेच थंड प्रकृतीचे असतात. उपवासाच्या वरी हा आयुर्वेदाच्या दृष्टीने सर्वात उत्तम आणि 'सात्विक' आहार आहे."
-वैद्य अशुतोश जेरे,