

पावसाळा म्हटलं की गरमागरम चहा आणि भजी डोळ्यासमोर येतात. उकाड्यापासून सुटका देणारा हा ऋतू जितका हवाहवासा वाटतो, तितकाच तो आजारपणांचा धोकाही घेऊन येतो. या काळात वातावरणातील वाढलेल्या ओलाव्यामुळे जीवाणू आणि बुरशीची वाढ झपाट्याने होते, ज्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात.
विशेषतः, आपण रोज खात असलेल्या काही भाज्या या काळात आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात आणि फूड पॉइझनिंगला निमंत्रण देऊ शकतात.
अनेकजण या भाज्या 'पौष्टिक' आहेत असा विचार करून खात राहतात, पण पावसाळ्यात त्यांचे सेवन टाळणेच शहाणपणाचे ठरते. प्रसिद्ध पोषणतज्ञ (Nutritionist) किरण कुकरेजा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे. अशा ५ भाज्यांविषयी माहिती दिली आहे, ज्या पावसाळ्यात खाणे टाळले पाहिजे.
१. कोंब आलेले बटाटे बटाटा हा प्रत्येकाच्या घरात वापरला जातो, पण पावसाळ्यात त्याला लवकर कोंब येतात. जर बटाट्याला कोंब फुटले असतील तर ते खाणे टाळावे. कारण कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये 'सोलॅनिन' (Solanine) नावाचे विषारी रसायन तयार होते, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे उलट्या, जुलाब किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
२. पालेभाज्या (पालक, मेथी, इत्यादी) पालेभाज्यांमध्ये पोषक तत्वे भरपूर असली तरी, पावसाळ्यात त्या खाणे टाळावे. कारण त्यांच्या पानांमध्ये ओलावा आणि घाण सहज शोषली जाते. या काळात पानांवर लहान किडे आणि जंतू वाढण्याचा धोका जास्त असतो. तुम्ही या भाज्या कितीही स्वच्छ धुतल्या तरी, काही सूक्ष्मजंतू पानांवर शिल्लक राहू शकतात, जे थेट फूड पॉइझनिंगचे कारण बनतात.
३. कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांच्या पाकळ्या एकमेकांना घट्ट चिकटलेल्या असतात, ज्यामुळे त्यांच्या आतमध्ये ओलावा टिकून राहतो. हे वातावरण किडे आणि जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य असते. अनेकदा हे किडे इतके लहान असतात की ते डोळ्यांना दिसत नाहीत आणि भाजीसोबत शिजवले जाऊन आपल्या पोटात जातात, ज्यामुळे पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात.
४. मशरूम मशरूम दमट वातावरणातच वाढतात, त्यामुळे पावसाळ्यात ते लवकर खराब होतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. बाजारातून आणलेले मशरूम थोडे जरी काळे किंवा मऊ पडले असतील, तर ते खरेदी करणे टाळा. कारण थोडेसे खराब झालेले मशरूम खाल्ल्यानेही तीव्र फूड पॉइझनिंग होऊ शकते.
५. वांगी पावसाळ्यात वांग्याला लवकर कीड लागते, जी बाहेरून सहज दिसत नाही. याशिवाय, काही लोकांना वांग्याची ऍलर्जी असते, ज्यामुळे पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असताना पोटात गॅस, सूज किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढू शकतात.
पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांच्या मते, या भाज्यांऐवजी तुम्ही आहारात इतर सुरक्षित भाज्यांचा समावेश करू शकता.
दुधी, घोसावळे (तोरी), पडवळ आणि गवार यांसारख्या भाज्या पावसाळ्यात खाण्यासाठी उत्तम आहेत.
या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते, त्या लवकर खराब होत नाहीत आणि पचायलाही हलक्या असतात.
त्यामुळे, या पावसाळ्यात चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घ्या. योग्य भाज्यांची निवड करा आणि आजारपणांपासून दूर राहा.