

Summer Food Safety Tips FSSAI fermented food guidelines
बंगळूरू: बंगळूरूमधील देवनहल्ली येथील एका खासगी कंपनीच्या उपाहारगृहात दुपारचे जेवण केल्यानंतर तब्बल ९७ कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इडली, वडा आणि सांबर-भात खाल्ल्यानंतर या कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) उन्हाळ्याच्या दिवसांत आंबवलेल्या पदार्थांच्या वापराबाबत महत्त्वाची मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी आणि दुपारी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता व जेवण केले होते. त्यानंतर काही वेळातच कर्मचाऱ्यांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बाधितांना तातडीने दोन खासगी रुग्णांलयात हलवण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अन्न सुरक्षा विभागाने अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल यायचा आहे.
इडली, डोसा किंवा वडा यांसारखे आंबवलेले पदार्थ पचायला हलके आणि आरोग्यासाठी चांगले मानले जातात. मात्र, कडक उन्हाळ्यात हेच पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या तापमानामुळे या पदार्थांवर जिवाणूंचा प्रादुर्भाव वेगाने होतो, ज्यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो
अन्न सुरक्षा प्राधिकरणाने (FSSAI) २०११ च्या नियमांनुसार आंबवलेल्या पदार्थांसाठी काही निकष निश्चित केले आहेत.
आंबवलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये किमान २.९% प्रथिने आणि ०.४५% लॅक्टिक ॲसिड असणे अनिवार्य आहे.
'शेड्यूल ४' अंतर्गत सर्व खाद्य व्यावसायिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या उत्पादनात 'प्रोबायोटिक' असल्याचा दावा केला असेल, तर त्यात ठराविक प्रमाणात 'सीफ्यू' असणे गरजेचे आहे.
आंबवलेल्या सोयाबीन पेस्टमध्ये 'ट्रिप्सिन इनहिबिटर्स' निष्क्रिय करणे आवश्यक आहे, जेणेकरून ॲलर्जीचा धोका टाळता येईल.
१. उन्हाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेमुळे पीठ लवकर आंबते. जे पीठ आंबायला ८-१० तास लागतात, ते उन्हाळ्यात निम्म्या वेळेतच आंबते. जास्त वेळ असे पीठ बाहेर राहिल्यास ते शरीरासाठी विषारी ठरू शकते.
२. दमट हवामानात हानिकारक जिवाणू आणि बुरशीची वाढ वेगाने होते, ज्यामुळे पदार्थ लवकर खराब होतात.
३. पीठ भिजवण्यासाठी वापरले जाणारे पाणी जर शुद्ध नसेल, तर त्यातून जलजन्य आजार आणि विषबाधा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
४. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात आंबवलेल्या पदार्थांचे 'शेल्फ लाईफ' कमी असते, त्यामुळे त्यांची साठवणूक करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात आंबवलेले पदार्थ बनवताना नेहमी फिल्टर केलेले पाणी वापरा आणि पीठ जास्त वेळ बाहेर न ठेवता योग्य तापमानात साठवा.