‘गॅजेटस्’ चा मोह आणि अनारोग्य | पुढारी

'गॅजेटस्' चा मोह आणि अनारोग्य

डॉ. मनोज कुंभार : कामासाठी नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेटसचा उपयोग दीर्घकाळासाठी वापर करणे अपरिहार्य असू शकते, पण विनाकारण सतत इलेक्ट्रॉनिक गॅजेटला चिटकून राहाणे योग्य नाही.

अनेक जण चित्रपट पाहाणे, व्हिडीओ गेम खेळणे किंवा सोशल मीडिया यासाठी कॉम्प्युटरवर सतत चिकटून राहातात. पण मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामध्ये शारीरिक सक्रियता कमी होणे, झोप अपूर्ण राहाणे किंवा झोपेचे वेळापत्रक बदलणे इत्यादींचा समावेश होतो.

लॅपटॉपवर काम केल्यामुळे मानेमध्ये वेदना होणे ही सध्या मोठी आरोग्य समस्या म्हणून समोर येत आहे. लंडन विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार जे लोक कॉम्प्युटरवर 4 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवत असतात त्यांना इतरांच्या तुलनेत हृदय विकार होण्याची शंका 125 टक्के अधिक असते. संशोधनातून हे स्पष्ट झाले की कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणार्‍या लोकांना मृत्युचा धोका इतर लोकांच्या तुलनेत 45 टक्के जास्त असतो. तसे पाहता टीव्ही पाहाण्याचे वेडही अनेकांना असते. विशेषतः महिलावर्गासाठी टीव्ही पाहणे ही सर्वांत आवडती बाब आहे. त्या तासन् तास टीव्हीसमोर बसलेल्या असतात. जास्त टीव्ही पाहाणेही चुकीचे असते. तासन् तास टीव्ही पाहिल्याने टाईप-2 प्रकारातील मधुमेह होतो आणि हृदय विकाराचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो. हावर्ड विद्यापीठातील संशोधनानुसार वायरलेस उपकरणांमधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे ही कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. स्मार्टफोन ही आज आपली गरज आहे, पण त्याचे व्यसनही आपल्याला लागले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनानुसार कमी वयात अतिप्रमाणात मोबाईल फोन वापरल्यास मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मोबाईलवर खूप मोठ्या आवाजात गाणी ऐकणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे बहिरेपण येऊ शकते.

रोज मोबाईलवर चार तासांहून अधिक वेळ बोलत असाल तर आपला स्वभाव रागीट होण्याची शक्यता असते. एका संशोधनानुसार मोबाईल फोनमध्ये टॉयलेटच्या फ्लश हँडलवर असणार्‍या जीवाणूंपेक्षा साधारणपणे 18 पट हानीकारक जीवाणू असतात. त्यांच्यामुळे पोटात गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ज्याप्रमाणे झोपणे, खाणे पिणे, काम करणे या कोणत्याही गोष्टी अतिप्रमाणात करणे हानीकारक आहे तसेच गरजेपेक्षा जास्त वेळ गॅजेटसचा वापर करणे आरोग्यास गंभीर आहे. तसेच मेंदूचे हानीकारक नुकसानही होते. त्यामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. मेंदूची कार्यक्षमता प्रभावित होते. शरीराचे चक्र बिघडते. यकृतासंबंंधीच्या तक्रारी भेडसावतात. हृदयावर परिणाम होतो. मधुमेह, अशक्तपणा, हाडे कमजोर होणे, डोळे खराब होणे यासारखे त्रास होतात.

Back to top button