

डाॅ. भारत लुणावत
प्रत्येकाने झोपेशिवायची एखादी रात्र तरी अनुभवलेली असेलच. आजारपणामुळे असेल. जेटलॅगमुळे किवा कामाचे व्यग्र वेळापत्रक असेल, किंवा बाळ छोटे असल्यामुळे पण आख्खी रात्र न झोपता प्रत्येकानेच काढली असेल. अर्थात, काही वेळा न झोपणे हे मान्यही करता येईल; परंतु सतत झोप न मिळणे किंवा जागे राहणे यामुळे काही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जागरणामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक इजा पोहोचू शकते.
24 तास जागे राहिल्यास : एखादी व्यक्ती 24 तासांपेक्षा अधिक काळ जागी राहिल्यास त्याचा परिणाम आकलनशक्तीवर होतो. त्यामुळे कार्यक्षमतेने काम करण्याची मनाची क्षमता बाधित होते. खूप जास्त वेळ जागे राहिल्याने एकाग्र होण्याची आणि लक्ष देण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. रक्तात 0.10 टक्के अल्कोहोल असल्यास जसा परिणाम होतो. तसाच परिणाम झोप टाळणे किंवा न घेणे यामुळे होत असतो. आपली स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे कार्य करत असते. विशेष काम, शिकणे, स्मरणशक्ती आणि भाषा यांच्यासाठी जबाबदार असणारे आपले कॉम्प्लेक्स अटेंशन किंवा लक्ष उत्तम प्रकारे कार्य करू शकते. पण, चोवीस तास जागे राहिल्याचा परिणाम हात-डोळे यांच्या संयुक्ती कृतींवर होऊ शकतो तसेच निर्णयक्षमतेच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होतो. आपल्या कार्यक्षमतेत सतत अडथळा येतो आणि कामगिरीवर परिणाम होतो.
36 तास जागे राहिल्यास : जितका अधिक काळ शरीरावर आणि मनावर ताण पडेल तितकी आपली परिस्थिती वाईट होईल आणि 36 तास एखादी व्यक्ती न झोपल्यास मात्र परिस्थिती दयनीय होईल. एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे की 36 तास झोप न घेतल्यास त्याचा दबाव फक्त मेंदूवर होत नाही तर तो हृदयावरही होतो. त्यामुळे हृदयाची धडधड वाढते, शिवाय रक्तदाबही विस्कळीत होतो. आपल्या आकलन कौशल्यावर दुष्परिणाम होऊन लोकांचे चेहरे ओळखण्यात अडचण येईल आणि शब्द आठवणे कमी कमी होईल. थोडक्यात 36 तासांच्या जागरणामुळे सर्वच गुंतगुतीचे कौशल्ये विस्कळीत होतील आणि आपल्या आरोग्याला खूप जास्त धोका पोहोचेल.
48 तासांचे जागरण : 48 तास म्हणजे दोन दिवस इतक्या जागरणामुळे शरीर आणि मन दोन्हींवर सर्वोच्च ताण जाणवतो. सतत 48 तास न झोपल्याने शरीरातील पांढर्या रक्तपेशींचे प्रमाण नाटकीय पद्धतीने कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात केला आहे. तसेच मुत्रातील नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि आपले शरीर अत्त्युच तणावाच्या पातळीशी सामना करत असल्याचे हे चिन्ह आहे. त्यामुळे रोगांशी, संसर्गांशी लढण्याची शरीराची क्षमता नष्ट होते आणि शरीर विविध आजारांना बळी पडते.
72 तास जागरण : 72 तास सलग जागरण म्हणजे आरोग्याशी खेळच आहे. सर्वच गोष्टी गोंधळून जातात. 72 तास सलग न झोपल्यास मानसिक आरोग्य आणि मोटोर स्कील किंवा हातडोळे यांच्या संयुक्त कृती यांना सर्वोच्च धोका पोहोचतो आणि या सर्व गोष्टी अस्थिर होतात. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वरखाली होत राहते आणि व्यक्ती संपूर्ण जागी राहत नाही किंवा झोपलेली असत नाही. 72 तास न झोपलेल्या व्यक्तीला विचित्र अनुभवांना सामोेरे जावे लागते. शिवाय त्यांना विचित्र भास होणे, भ्रम होणे, थरथर होणे किंवा झटके येणे, चुकीच्या आठवणी आणि स्नायूंचे दुखणे असा त्रास होऊ शकतो. 72 तासांपर्यंत जागल्याने एकाग्रतेवर, समजून घेण्याच्या क्षमतेवर
आणि सर्वोच्च मानसिक प्रक्रियांवर परिणाम होतो.
आधुनिक जीवनशैलीत कामाच्या वेळा वाढल्या आहेत; पण त्या वेगवेगळ्याही आहेत. हल्ली रात्रीच्या कामाच्या वेळाही वाढल्या आहेत. रात्रपाळी ही आता कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आयटी क्षेत्रातही करावी लागते. पण काळजी ही घ्यावीच.
हेही वाचा