आकडी येत असल्यास अशी घ्या काळजी? | पुढारी

आकडी येत असल्यास अशी घ्या काळजी?

आकडी येणे हा आजार अगदी लहान वयात झाला तरी मानसिक वाढीवर परिणाम होतो. मध्यम वयात त्रास असेल तर रुग्णावर सामाजिक, वैयक्तिकरीत्या बरीच बंधने येतात, पण यावर अनेक भोंदू लोकांकडून उपचार करून घेणे मात्र टाळावे.

हा रोग मेंदू व चेतनातंतूच्या संदेशवहन यंत्रणेत बिघाड झाल्याने चुकीचे संदेश जातात व चुकीचे कार्य स्नायूंकडून घडवले जाते, अशी क्रिया इपिलेप्सीमध्ये होत असते. इपिलेप्सीला अपस्मार म्हणतात. अनुवंशिकता, गर्भावस्थेत होणारे दुष्परिणाम, डोक्याला चढणारा ताप, विलक्षण मानसिक व शारीरिक ताण, पचनाच्या तीव्र तक्रारी यामुळे अपस्मार हा आजार उद्भवतो.

आकडी येणे यावर प्रत्येक उपचार शास्त्रांमध्ये बरेच संशोधन झाले आहे.चेतनसंस्थेचा हा विकार असून मेंदू व मज्जारज्जूच्या कार्यावर यांचे प्राबल्य आढळून येते. लहान मुलांच्यात हा विकार जास्त आढळतो. तसे असले तरी सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष या आजाराने त्रस्त दिसतात.

अपस्माराचे ग्रँडमाल आणि पेटेमाल असे दोन प्रकार आहेत. ग्रँडमाल या प्रकारात प्रथम रुग्णाला अस्वस्थ वाटते. काही विचित्र भावना होतात. पोटात काहीतरी गोल फिरत आहे, असे वाटते. काही स्नायू उगाचच थरथरत राहतात. मान वाकडी होते. दातखीळ बसते, तोंडातून फेस येतो.

पेटमाल या प्रकारात अपस्माराचा झटका अगदी नाममात्र असतो. रुग्णाला स्नायूंच्या होणार्‍या विशिष्ट हालचाली अनुभवता येतात. डोळे, डोके, अंग, हात, पाय यांच्या विचित्र हालचाली होतात, पण क्षणार्धात पूर्ववत होतात, पण असा प्रकार कधीही अचानकपणे होऊ शकतो. या प्रकारात विस्तवाकडे पाहिल्याने, किंचाळल्याने आणि काही विशिष्ट औषधांनी फिट्स येऊ शकतात.

घरच्या घरी औषधोपचार करणे काही किरकोळ आजारासाठी फायदेशीर ठरते; परंतु या आजाराचा उपचार घरगुती करू नये. वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपचार करावा. नाही तर रुग्णाच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. काही भोंदूगिरी करणारी माणसे जडीबुटी देऊन आकडी येणे हा रोग बरी करण्याचा दावा करतात. मात्र याकडे फारसे न वळता डॉक्टरांकडेच नेऊन उपचार केलेला उपाय उत्तम ठरतो.

– डॉ. महेश बरामदे

Back to top button