Lok Sabha polls 2024 : तुमचा ‘कौल’ कोणाला? : ओपोनियन पोलसाठी काेणते घटक ठरतात महत्त्‍वपूर्ण? | पुढारी

Lok Sabha polls 2024 : तुमचा 'कौल' कोणाला? : ओपोनियन पोलसाठी काेणते घटक ठरतात महत्त्‍वपूर्ण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “तुमच्‍याकडे यंदा कोणाची हवा आहे?, तुमचा कौल कोणाला?, यंदा तुमचं काय ठरलंय?, कोणाला निवडून आणणार?, असे काहीसे सांकेतिक वाटणार्‍या प्रश्‍नांची चर्चा आता आपल्‍याकडे जोर धरु लागली आहे. कोणत्‍याही निवडणुका जशा जवळ येतील तसे राजकारणावरील चर्चा ही आपल्‍या जगण्‍यातील एक भाग हाेताे. निवडणूक ‘फिव्‍हर’ने वातावरण तापते. कोण लढणार पासून कोण जिंकणार? पर्यंतच्‍या प्रश्‍नांमधून निर्माण होणार्‍या उपप्रश्‍नांवर आपल्‍याकडे चर्चा रंगते. मात्र राजकारणवरील केवळ चर्चा वेगळी असते. तर निवडणूक कोण जिंकणार याचे ठोकताळे मांडणारे ओपोनियन पोल आणि एग्‍झिट पोलचे अंदाज वेगळे असतात. त्‍यामुळेच मागील काही दशकांमध्‍ये ओपोनियन पोल आणि एग्‍झिट पोलची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मागील काही वर्षांमध्‍ये एग्‍झिट पोलचे अंदाज अचूक येत आहेत. मात्र  काही विधानसभा निवडणुकीत ही अंदाज सपशेल चुकलेही आहेत. ( Lok Sabha polls 2024 : know about opinion polls and Exit polls Which factors are important?) जाणून घेवूया ओपोनियन पोल आणि एग्‍झिट पोलसाठी ठरणारे महत्त्‍वपूर्ण घटकांविषयी…..

ओपोनियन पोल आणि एक्‍झिट पोलची सुरुवात अमेरिकेत झाली, असे काही जण मानतात तर काहींच्‍या मते याची सुरुवात युरोपमध्‍ये झाली. देशात टीव्‍हीचा प्रसार झाल्‍यानंतर खर्‍या अर्थाने आपल्‍याकडेही असे अंदाज वर्तविण्‍यात येवू लागले. ८० आणि ९० च्‍या दशकांमध्‍ये भारतीय मतदारांनी दाखवलेल्‍या प्रगल्‍भतेमुळे लोकसभेसाठी एका पक्षाला मतदान करणारा मतदार हा विधानसभेच्‍या मतदानावेळी वेगळा विचार करतो, हेही अनेकवेळा दिसून आले आहे. ( Lok Sabha polls 2024 : know about opinion polls and Exit polls Which factors are important?)

कोणते घटक ठरतात महत्त्‍वपूर्ण ?

ओपोनियन पोलसाठी भारतात परदेशात वापरली जाणारी पद्धत चालत नाही. भारतात निवडणूक पूर्व अंदाज बांधताना सर्वप्रथम मतदारसंघातील कोणाचा प्रभाव आहे? मतदार कोणाला ‘कौल’ देतील? अशा प्रकारचे प्रश्न विचारून मतदारांशी संवाद साधला जातो.  निवडणूकपूर्व किंवा मतदानोत्तर चाचणी घेताना संबंधित राज्‍यातील मतदारांचे शिक्षण, जात, धर्म, आर्थिक उत्‍पन्‍न, कुटुंबाची रचना ( संयुक्‍त व केंद्र), प्रादेशिक अस्‍मिता, स्‍थानिक प्रश्‍न, लोकसंख्‍या आदी मुख्‍य घटकांचा विचार होतो.

‘ओपनियन’पेक्षा एक्‍झिट पोलचे अंदाज ठरतात अचूक

एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला अंदाज असा आहे. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. निवडणूक पूर्व अंदाज हे काही हवामान अंदाजासारखेच शास्‍त्रीय नसतात. अशा प्रकारच्‍या अंदाज हे ठोकताळे असतात. त्‍यामुळे निवडणूकपूर्व अंदाज आणि मतदारानंतरचे अंदाज यामध्‍ये फरक असण्‍याची शक्‍यता असते. एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने मागील काही वर्षांमध्‍ये भारतात हे अंदाज अचूक ठरत असल्‍याचे चित्र आहे, असे The Verdict Decoding India’s Elections या पुस्‍तकातील लेखात म्‍हटलं आहे.

मतदारांचे ‘गूढ हास्‍य’ बरेच काही सांगून जाते…

जगातील सर्वात प्रगल्‍भ मतदार अशी भारतीय मतदारांची ओळख आहे. त्‍यामुळे मतदानापूर्वी (ओपोनियन पोल) आणि मतदान झाल्‍यानंतर (एक्झिट पोल) मतदारांचे जाणून घेतलेला कल बहुतांश वेळा बरोबर तर काहीवेळा चुकीचे ठरतात. भारतात एक्झिट पोल हा मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी सायंकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो. एक्झिट पोलवेळी कोणाला मतदान केले? या प्रश्‍नाचे उत्तर बहुतांशवेळा मतदारच्‍या ‘गूढ हास्‍या’तूनच दिले जाते, या ‘गूढ हास्‍या’मुळे मतदाराने कोणात्‍या पक्षाला मतदान केले आहे, याचे त्‍याने दिलेले उत्तर अचूक असेल असे नाही. त्‍यामुळेच निवडणुकीचे अंदाज कोणी कितीही लावले तरी भारतीय मतदार हा आपला अंदाज कोणत्‍याच राजकीय पक्षाला लागू देत नाही, हे वास्‍तव सर्वांनाच स्‍वीकारावे लागते.

कोणत्‍या राज्‍यातील अंदाज ठरतात अचूक?

मागील तीन दशकांमध्‍ये देशभरात ओपोनियन पोल आणि एग्‍झिट पोलचा बोलबाला वाढला आहे. भारतातील विषमता आणि विविधतेमुळे राज्‍यनिहाय यामध्‍ये बदल होतो. कारण केरळसारखे साक्षर राज्‍य आणि पश्‍चिम बंगालसारखे बहुविचारी पक्षांचे प्राबल्‍य असणार्‍या राज्‍यातील वास्‍तवाचा विचार करावा लागतो. त्‍यामुळेच राजस्‍थान, महाराष्‍ट्र, केरळ आणि हरियाणा या राज्‍यांमध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या ओपोनियन पोलचे अंदाज अचूक ठरतात तर आंध्र प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अंदाज चूकतात असे आजवर दिसले आहे.

एक्‍झिट पोलमध्‍ये महाराष्‍ट्र, ओडिशा, झारखंड आणि कर्नाटकमध्‍ये अंदाज खरे ठरतात तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्‍यातील अंदाज बांधणे कठीण असल्‍याचे वारंवार दिसले आहे.

( हा लेख प्रणोय रॉय आणि दोराब आर सोपारीवाला यांच्‍या The Verdict Decoding Indias Elections या पुस्‍तकातील माहितीवर आधारित आहे. )

हेही वाचा :

 

 

Back to top button