Sarvapitri Amavasya | सर्वपित्री अमावस्येला श्राद्धकार्य कसे करावे? जाणून घ्या महत्व आणि विधी | पुढारी

Sarvapitri Amavasya | सर्वपित्री अमावस्येला श्राद्धकार्य कसे करावे? जाणून घ्या महत्व आणि विधी

पुढारी ऑनलाईन : हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. पितृपंधरवड्यामध्ये या ‘सर्वपित्री अमावस्या’ (Sarvapitri Amavasya) या दिवशी हे विशेष पाळले जाते. कारण या पंधरा दिवसांच्या काळात यमलोकांतून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते. त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो.

पितृपक्षात प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत वाडवडिलांच्या तिथीनुसार महालय श्राद्ध केले जाते, मात्र तिथी माहिती नसल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव महालय श्राद्ध राहून गेल्यास किंवा ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलेले नाही. त्याने केवळ सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले तरी पितर तृप्त होतात. गावागावात सर्वपित्री अमावस्या दिवशी आपल्या अंतर्मनात ज्यांना स्थान आहे अशा व्यक्तींना सपत्नीक घरी बोलावून त्यांचे पूजन करून आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ यथोचित खाऊ घालून यथाशक्ती मानपान दक्षिणा देऊन सर्वपित्री अमावस्ये दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला या दिवशी श्राद्ध करण्यासाठी शक्य नसल्यास निदान घरात केलेले जेवण केळीच्या पानावर वाढून एक पान गाईसाठी व एक कावळ्यासाठी ठेवले जाते.

सर्वपित्री अमावस्येला करण्यात येणारे श्राद्धकार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही भगवद् गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला केलेले श्राद्धकार्य अत्यंत शुभ मानले जाते.

आपण जसे सर्व धार्मिक कृत्य करावीत हा एक संकेत आहे, तसेच दिवंगत व्यक्तींची आठवण म्हणून तसेच त्यांचे आपल्यावर व आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद असावेत म्हणून श्राद्ध /पक्षही प्रत्येक घरांमधून करावेत हा संकेत आहे.

श्राद्ध व पक्ष हे दोन्ही शब्द बहुतेकांना ज्ञात असतात. ज्या तिथीस व्यक्ती दिवंगत झाली असेल त्या तिथीस दरवर्षी केल्या जाणाऱ्या विधीस श्राद्ध असे म्हणतात. तर पितृपंधरवड्यातील तिथिला केल्या जाणाऱ्या विधीस पक्ष असे म्हणतात.

महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नोकरण, पिंडदान, विकीरदान स्वधावचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे शक्य न झाल्यास पुढे महालय श्राद्ध करता येते.

मातामह श्राद्ध.….(दौहित्र) 

पिता जिवंत असताना मुलाने आईच्या वडिलांचे श्राद्ध करावयाचे असते. श्राद्धकर्ता तीन वर्षांच्या पुढील वयाचा झाल्यावर मुंज झालेली नसली तरीही त्यास हे श्राद्ध करता येते. मातामहिंच्या (आजोबांच्या) वर्षश्राद्धापूर्वी मात्र हे श्राद्ध करता येत नाही. मातामहींसाठी (आजोबांसाठी) म्हणजे नातवाने मुलीच्या मुलाने या दिवशी ब्राह्मणाला देण्याकरिता देवापुढे दक्षिणा काढून ठेवायची पद्धत आहे. काही ठिकाणी या दिवशी यानिमित्त ब्राह्मणाला बोलावून दूध, केळे व दक्षिणा देतात. हे फक्त अश्विन शुद्ध प्रतिपदेला करता येते. म्हणजेच यावर्षी सोमवार दि. 26 सप्टेंबर. घटस्थापने दिवशी मातामह श्राद्ध होणार आहे. (Sarvapitri Amavasya)

पक्ष पंधरवडा म्हणजेच महालाचा महिना 

या महिन्यात सूर्य कन्याराशीत प्रवेश करत असून, या वेळेला आपल्या गेलेल्या पितरांना उर्जित अवस्था प्राप्त होत असते. याच वेळेला आपण त्यांच्यासाठी दानधर्म म्हणजेच ब्राह्मण भोजन, अन्नदान, वस्त्रदान अशा प्रकारची जी दाणे आहेत ही दाणे केले असता आपल्या कुलाची वृद्धी होत असते. त्याचप्रमाणे भाद्रपद कृष्ण अमावस्या म्हणजेच याला आपण सर्वपित्री अमावस्या असे म्हणतो.

वेदमूर्ती अमृत वसंत गुळवणी गुरुजी

हेही वाचा :  

Back to top button