बेळगाव : तारीहाळ आग; जखमींपैकी तिघांचा मृत्यू
हुबळी; पुढारी वृत्तसेवा : तारीहाळ येथील मेणबत्ती कारखान्यात आग लागून जखमी झालेल्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
शनिवारी सायंकाळी धारवाड जिल्ह्यातील तारिहाळ येथील मेणबत्ती व स्पार्कर उत्पादन होणार्या कारखान्यात भीषण आग लागली होती. या आगीत 8 जण भाजून जखमी झाले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. विजयलक्ष्मी वीरभद्र यच्चण्णावर (वय 34), गौरम्मा वीरभद्रय्या हिरेमठ (वय 45 दोघीही रा. तारिहाळ) व मालेश बसाप्पा हदेनवर (वय 27, रा. लिंगनकोप्प) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेत मलिक कोप्पद (वय 18), निर्मला हुचण्णावर (वय 29), चन्नव्वा अरिमाळ (वय 42), प्रेमा अरिमाळ (वय 20), नाणम्मा पडदाळ (वय 35) हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर किम्स्मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे किम्स्चे सचिव डॉ. रामलिंगप्पा यांनी सांगितले.
5 लाखांची भरपाई
महिला व बालकल्याण मंत्री तथा हुबळी-धारवाडचे पालकमंत्री हालप्पा आचार्य यांनी शनिवारी घटनास्थळी पाहणी केली. किम्स्ला भेट देऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रु. भरपाई देण्यात येईल. जखमींवर योग्य ते उपचार करण्याची सूचना त्यांनी दिली.