

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे व विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातून कल्लोळ – येडूर बंधार्यानजीक चिकोडी तालुक्यास 2 लाखांहून अधिक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीला होत आहे. यामुळे चिकोडी उपविभागास पुराचा धोका निश्चित झाला असून नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवडाभरापासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यात कृष्णा दूधगंगा, वेदगंगा नद्यांना पाणी येत आहे.चिकोडी तालुक्यातील कल्लोळ-येडूर बंधार्यानजीक 1 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता. तो एका रात्रीत शुक्रवारी सकाळी 2 लाख 6 हजार क्युसेक्स इतका वाढला आहे. यामुळे कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्याचे पाणी पात्राबाहेर आल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाण्याची पातळी शुक्रवारी वाढली आहे.
चिकोडी उपविभागातील चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड, निपाणी तालुक्यातील 11 पूल वजा बंधारे पाण्याखाली आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नदीकाठावरील नागरिकांना व जनावरांना नदी काठी न जाण्याचे आवाहन चिकोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांनी केले आहे .
शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्यातून 1 लाख 74 हजार 500 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग तर दुधगंगा नदीला 32 हजार 32 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे . कृष्णा नदीवरील अंकली- मांजरी पुलानजीक 533.81 मीटर, दूधगंगा व वेदगंगा नदीवरील सदलगा पुलावर 535.93 मीटर, कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधार्यानजीक 524.87 मीटर इतकी पाण्याची पातळी आहे.
11 बंधारे पाण्याखाली
कृष्णा नदीवरील कल्लोळ – येडूर, दुधगंगा नदीवरील मलीकवाड – दत्तवाड,कारदगा – भोज, अकोळ – सिदनाळ, भोजवाडी – कुनूर, जत्राट – भिवशी, ममदापूर – हुन्नरगी, कुनूर – बारवाड, कुडची – उगार, चिंचली – रायबाग, चिंचली – भिरडी आदी पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.