कर्नाटक : पॅसेंजर गाड्या बंद, रोजगार थंड!
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कर्मचारी, हमाल, कामगार भाजी विक्रेते आदींना अत्यंत उपयुक्त असणारी पॅसेंजर रेल्वे गेल्या दोन वर्षापासून बंद असल्यामुळे सुमारे दोन हजार लोकांच्या रोजगारावर गंडातर आले आहे. दुसर्या बाजूला एसटीचे प्रवासी भाडेही अनेकाना परवडणारे नसल्यामुळे त्यांना स्थानिक परिसरातच काम शोधण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात पॅसेंजर गाड्या 15 एप्रिलपासून सुरु करण्यात आल्या असताना कर्नाटकमध्ये या गाड्या कधी सुरु करणार असा सवाल केला जात आहे.
हुबळी-मिरज, बेळगाव-मिरज, लोंढा मिरज अशा पाच पॅसेंजर गाड्या रोज सुरु होत्या. सद्या फक्त बेळगाव-शेडबाळ ही पॅसेंजर सुरु असली तरी काहीच प्रवाशांना उपयोग नाही. बहुतांशी कामकार, भाजी विक्रेते मिरजेला जातात किंवा बेळगावला येतात. शिवाय अथणी तालुक्यातील सुमारे दीड हजार कामगार मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये जातात. बसचा पर्याय असला तरी त्यासाठी मासिक पासची सोय नाही, त्याचबरोबर तिकीटाचा दरही दीडशे रुपयांच्या घरात परवडत नाही. यामुळे कामगाराना स्थानीक परिसरातच काम शोधण्याची वेळ आली आहे. पॅसेंजर गाड्या सुरु करण्यात याव्यात अशी मागणी स्वत: बेळगावच्या खा. मंगला अंगडी यांनी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे.
वेळ, पैसा आणि पासची सोय
बेळगाव-मिरज पॅसेंजर गाडीसाठी तीस रुपये प्रवाशी भाडे आहे. त्याचबरोबर महिना रेल्वे पासचा दर हा पाचशे रुपयांच्या घरात आहे. ही गाडीही सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळीही कामाला जाणार्यासाठी खूप उपयुक्त आहे. सकाळी बेळगावहून मिरजेला ही गाडी 9 वा. पोहचते. तर सायंकाळी 6 वा. सुटते. यामुळे कामगार, भाजी विक्रेते, रुग्णासाठी खूप उपयुक्त आहे.
पॅसेंजर गाडी ही पुणे विभागाकडून सोडली जाते. ही गाडी सोडावी म्हणून हुबळी विभागाकडून पत्रव्यावहारही झाला आहे. त्याचबरोबर सद्या खानापूर-सुलधाळमध्ये ट्रॅकचे दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे किमान अणखी एक महिना पॅसेंजर गाडी सुरु होण्याची शक्यता कमी आहे.
– अनिस हेगडे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, हुबळी