उचगाव; पुढारी वृत्तसेवा : बाची ते शिनोळी रस्त्याची पुन्हा दुर्दशा झाल्याने प्रवासी त्रस्त बनले आहेत. आंदोलनाचा इशारा देताच केवळ तात्पुरती दुरुस्ती करून धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी प्रवासी संतप्त बनले असून परिसरातील नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हिंडलगा ते बाची शिनोळी पर्यंतच्या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून यातून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक अपघात घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे. वाहने दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची आवश्यकता आहे. यावर्षी रस्त्याची दोनदा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. रस्त्यावर डांबरीकरण करण्याऐवजी केवळ खडी आणि माती टाकण्याचा प्रकार करण्यात आला. ही दुरुस्ती केवळ दोन दिवसात निरुपयोगी ठरली. खडी बाहेर पडून खड्डे 'जैसे थे' अवस्थेत राहत आहेत. यामुळे दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यातून पावसाळ्यात वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्याची गरज आहे.
– जोतिबा पाटील, प्रवासी