बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
नणदी येथील चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या 2024-25 गळीत हंगामात 12 लाख टन उसाचे गाळप करून 12 कोटी युनिट वीजनिर्मिती आणि अडीच कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व शेतकरी सभासदांनी ऊस आपल्या कारखान्याला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी केले.शुक्रवारी कारखान्याचे बॉयलर पूजन व गळीत हंगाम मुहूर्त करून ते बोलत होते.मल्लिकार्जुन कोरे म्हणाले, कारखान्याचे मार्गदर्शक व केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे व अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या योग्य निर्णयाने कारखाना सातत्याने प्रगती साधत आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे.
प्रारंभी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीत निडसोशी मठाचे पंचमशिवलिंगेश्वर स्वामी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. संचालक मल्लप्पा म्हैशाळे दांपत्याच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले. गवाणीत ऊस टाकून हंगामाचा मुहूर्त करण्यात आला. कार्यक्रमास माजी आमदार व कारखान्याचे संचालक महांतेश कवटगीमठ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महामंडळाचे संचालक अमित कोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक अजित देसाई, भरतेश बनवणे, पारसगौडा पाटील, संदीप पाटील, महावीर मिर्जी, मल्लाप्पा म्हैशाळे, चेतन पाटील, भीमागौडा पाटील, महावीर कात्राळे, अण्णासाहेब इंगळे, नंदकुमार नाशिपुडी, व्यवस्थापकीय संचालक वाय. एन. गोळभावी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.