

Research needs new thinking and independent analysis
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटवर केवळ माहिती मिळवणे पुरेसे नसून स्वतःकडील ज्ञान जगाला देणे हे डिजिटल समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे. संशोधनामध्ये नवीन विचार आणि स्वतःचे स्वतंत्र विश्लेषण असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कॉपी केलेल्या माहितीपेक्षा मूळ संशोधनाचे मूल्य नेहमीच जास्त असते, असे प्रतिपादन पद्मश्री आयआयएम अहमदाबादचे प्रा. अनिल गुप्ता यांनी केले.
येथील केएलएस आयएमईआर महाविद्यालयाचा चौथा पदवी प्रदान समारंभ शनिवारी (दि. २४) उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्यात ११६ विद्यार्थ्यांना एमबीए पदवीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर गुणवंत १० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शैक्षणिक मिरवणुकीने झाली. नियामक मंडळाचे अध्यक्ष यू. एन. कालकुंद्रीकर यांनी स्वागत केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. आरिफ शेख यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
यावर्षीच्या परीक्षेत पार्वती मुरागौड हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला सुवर्णपदक आणि १० हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. श्रावणी यरंदोले रौप्यपदक मिळवल्याबद्दल सात हजार रुपये तर प्रगती कोळवेकर हिला कांस्यपदक व पाच हजार रुपये देण्यात आले.
आरसीयू बेळगावचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिकपणा जपत कामाच्या ठिकाणी व्यावसायिक वृत्ती ठेवणे आवश्यक आहे. संकल्पनांचे सखोल ज्ञान आणि त्यांचे तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलेले समीकरण हाच यशाचा मंत्र आहे, असे सांगितले.
केएलएसचे अध्यक्ष प्रदीप सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेशी नाते जपण्याचे आणि व्यावसायिक नीतीमत्तेने प्रगती करण्याचे आवाहन केले. केएलएसचे चेअरमन ए. के. टागरे यांनी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.
याप्रसंगी केएलएस बोर्डाचे सदस्य आर. एस. मुतालिक, पी. जी. बदकुंद्री, प्रशांत कुलकर्णी, राजेंद्र बेळगावकर, एस. व्ही. गणचारी, व्ही. एम. देशपांडे, शैक्षणिक परिषदेचे सदस्य, पालक आणि कर्मचारी उपस्थित होते.