

विजापूर : जिल्ह्यातील निडगुंदी जवळच्या गोळसंगी गावातील एका युवकाचा कुत्र्याने चावल्यानंतर रेबीजची लस न घेतल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील प्रदीप चंद्रशेखर हळेरोळी हा मृत युवक आहे. तीन महिन्यांपूर्वी तो बिळगी तालुक्यातील मन्निकेरी गावातील यात्रेला गेला असताना त्याला कुत्र्याने चावल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याने रेबीज प्रतिबंधक लस घेतली नव्हती.
अलीकडे त्याच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने त्याला बागलकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करूनही फायदा झाला नाही आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
या घटनेमुळे कुत्रा चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार आणि रेबीज लस घेण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. आरोग्य विभागानेही कुत्रा चावल्यास दुर्लक्ष न करता त्वरित रुग्णालयात जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.