

बेळगाव : सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात जाण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत आहे. कर्नाटक सरकारचे अत्याचार वाढत आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार नेहमीच सीमाबांधवांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत असते. परंतु, आता पाठिशी राहण्याऐवजी सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
कल्लेहोळमधील (ता. बेळगाव) छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळातर्फे सोमवारी (दि. 20) रात्री शिवजयंतीनिमित्त गारगोटीतील गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. सुभाष मरुचे अध्यक्षस्थानी होते.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राने पुढाकार घेतल्यास सीमाप्रश्नाला चालना मिळेल. सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्राने त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सीमाभागातील मराठी बांधवांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहावे, असे त्यांनी सांगितले.
रमाकांत कोंडूसकर म्हणाले, मराठी माणसांने स्वाभिमानाने जगावे. मराठी भाषा, संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय पक्षांची लाचारी पत्करु नये. युवकांनी मराठी टिकविण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन केले. यावेळी तालुका म. ए. समिती कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, अध्यक्ष मरुचे यांनी मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी, मोनाप्पा पाटील, आर. के. पाटील, मदन बामणे, चंदगड पंचायत समिती सदस्य रवी बांदिवडेकर, लक्ष्मण मेणसे यांनी विविध प्रतिमांचे पूजन केले. संजय मोरे यांनी श्रीफळ वाढविले. त्यानंतर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, रवी बांदिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. एम. जी. पाटील, राजेंद्र मुतगेकर, सुरेश राजूकर, डी. बी. पाटील, दिलीप कांबळे, निंगाप्पा मोरे, एम. बी. गुरव, यल्लाप्पा कणबकर, किरण मोटणकर, सुनील झंगरुचे, अनिल पाटील, महादेव बिर्जे आदी उपस्थित होते. पुंडलिक देवरमणी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी आभार मानले.