निपाणी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या 4 जुलैपासून निपाणी व परिसरात पावसाला सुरुवात झाल्यावर गेल्या बारा दिवसांत शहरास पिण्याचे पाणीपुरवठा करणार्या जवाहरलाल तलावाच्या पाणी पातळीत तब्बल पाच फूट वाढ झाली आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरगुप्पी ओढ्याद्वारे येणार्या पाण्याचा फ्लो वाढू लागला आहे. त्यामुळे जवाहरलाल तलावाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सततच्या पावसामुळे शनिवारी पाणीपातळी 38 फूट 1 इंच झाली आहे. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पाणी पातळी 33 फूट 3 इंच होती. यामध्ये केवळ 5 फुटांपर्यंत वाढ झाली आहे.
गतवर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने 22 जुलै रोजी जवाहरलाल तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदा तलावातील पाणी पातळी कमी असल्याने गेल्या महिन्यापासून निपाणी पालिकेकडून शहर व उपनगराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. रोज 24 तास पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करण्यासाठी तलावातील पाणी पातळीत वाढ होणे अपेक्षित आहे.
40 फुटांपेक्षा अधिक वाढ झाल्यावर दोन दिवसाआड पाणीपुरवठा
यमगर्णी येथील वेदगंगा नदीच्या पाण्याचा उपसा जॅकवेलमधील 275 अश्वशक्तीच्या मोटारीद्वारे जवाहरलाल तलावाच्या जलशुद्धीकरण घटकात घेऊन पाणी फिल्टर केले जात आहे. पाणी पातळीत चाळीस फुटांपेक्षा अधिक वाढ झाल्यावरच तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली.