बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
हवामानातील बदलामुळे विषाणूजन्य तापाची लक्षणे वाढू लागली आहेत. अशा रुग्णांमध्ये तीव्र कोरडा खोकला दिसून येत असून तो 10 ते 15 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत आहे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे.
खबरदारीचे उपाय
कोरडा खोकला असलेल्यांना घरीच वेगळे ठेवावे
खोकला कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा.
गर्दी व वायू प्रदूषण असलेल्या ठिकाणी मास्क वापरावा
तेलकट पदार्थ, आईस्क्रीम, शीतपेयांचे सेवन करु नये
पाणी उकळून प्यावे
घरी शिजवलेले ताजे अन्न खावे
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अशा लक्षणांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. कोरडा खोकला 15 ते 20 दिवसांपर्यत राहत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे होणार्या या कोरड्या खोकल्यामुळे घसा आणि कान दुखत आहेत. परिणामी ईएनटी विभागात उपचार घेणार्यांची संख्याही वाढली आहे. कोरडा खोकला हा एक संसर्गजन्य रोग आहे. रुग्णाच्या खोकल्यातून हवेद्वारे इतरांना त्याची लागण होते. हा खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ किंवा काहींमध्ये महिनाभर देखील टिकतो. औषधोपचार घेतल्यानंतरही काहीवेळा तो कमी होत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरडा खोकला मुलांसह सर्व वयोगटांमध्ये आढळून येत असून त्याची तीव्रता रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या खोकल्याकडे दुर्लक्ष करु नये. खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असेल आणि औषधांनी लवकर बरा होत नसेल तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.अॅलर्जी असलेल्यांनी ईएनटी तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत. टीबी, दमा आदी चाचण्या केल्यानंतर योग्य उपचार घ्यावेत, असा सल्ला बिम्सचे प्रा. डॉ. आर. जी. विवेकी यांनी दिला आहे.