सातारा : पुढारी वृत्तसेवा कोरोना आटोक्यात आला असताना आता जिल्ह्यात स्वाईन फ्लू, डेंग्यू, हिवताप, चिकनगुनियासारखे आजार बळावले आहेत. त्यातच अचानक गायब झालेला पाऊस, कधीतरी डोकावणार्या तुरळक सरी, दिवसा कडक ऊन, रात्रीचा उकाडा अशा विचित्र हवामानाचा फटका बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्याने सातारकर बेजार झाले आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत.
आठवडाभरापासून हवामान पूर्णत: बदलले असून ते विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. यामध्ये सर्वाधिक धोका डेंग्यूचा आहे. सध्या लहान मुलांसोबतच मोठ्यांची ही दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे.
कोरोनानंतर हळूहळू साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. एकीकडे साथीचे आजार वाढत आहेत. साथीच्या 16 आजारांच्या प्रकाराकडे पाहिल्यास डेंगी, कावीळ, विषमज्वर आणि अतिसार याचे रुग्ण अधिक आहेत.
विनाकारण केल्या जातायेत तपासण्या
काही डॉक्टर विनाकारण आजाराच्या नावाखाली विविध चाचण्या करून घेत रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसण्यास भाग पाडत आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस तर कधी जोरदार पाऊस पडत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे साथीचे आजार वेगाने पसरत असून अंगदुखी, खोकला, ताप आदी आजाराचे प्रमाण वाढत आहे. व्हायरल फिवरमध्ये अनेक रुग्णांना 5-6 दिवस औषध, गोळ्या घेऊनही ताप उतरत नसल्याचे दिसत आहे.
ताप, डोकेदुखी, खोकला, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे अनेक रुग्णांमध्ये आहेत. त्यांना गोळ्या, औषधे गरज वाटल्यास इंजेक्शन दिली जात आहेत. मात्र, काही डॉक्टरांकडून कोरोनाच्या भीतीमुळे अंगदुखी खोकला, तापाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांना विविध तपासण्या करण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
साथीचे आजार वाढत असताना विषाणूजन्य आजारांचेही रुग्ण वाढले असल्याचे दिसत आहे. हवामान बदलामुळे डोकेदुखी, ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये वृद्ध व लहान मुलांना अधिक लागण होत असल्याचेही समोर आले आहे. केवळ शासकीय, पालिका रुग्णालयेच नव्हे तर खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
पावसाळ्याच्या काळात जलजन्य आजाराबरोबरच साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे व उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे, पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. तसेच डेंग्यू वाढू नये, यासाठी नागरिकांनी कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा