

धारवाड : हंपीच्या प्राचीन मंदिरांमध्ये पिढ्यानपिढ्या विवाहाच्या मंत्रोच्चारांचा नाद घुमत असे. बसव जयंतीसारख्या शुभप्रसंगी एकेकाळी एकाच दिवसात 20 ते 30 विवाह संपन्न होत असत. हंपी हिंदू कुटुंबांसाठी अत्यंत आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. येथे होणारे विवाह दैवी आशीर्वादयुक्त असतात असा त्यांचा विश्वास होता. मात्र, गेल्या काही वर्षांत दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरेत मोठी घट झाली आहे.
पूर्वी, मंदिराच्या आवारात विवाहसोहळे पार पाडण्यासाठी कुटुंबांना केवळ धार्मिक धर्मादाय खात्याकडून जारी केलेले 1,000 रुपये किमतीचे विशेष दर्शन तिकीट पुरेसे होते. सोहळ्याचा साधेपणा, पवित्र वातावरण आणि त्याचे भावनिक व आध्यात्मिक मूल्य याचेच आकर्षण होते. मात्र, आता केंद्र आणि राज्य पुरातत्व विभाग तसेच धार्मिक धर्मादाय खात्याने लादलेले कडक नियम आणि त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हंपीच्या ऐतिहासिक मंदिरांमधील विवाहसोहळे दुर्मिळ झाले आहेत.
मंदिराच्या आवारात स्वयंपाक आणि छायाचित्रणावरील निर्बंध हे प्रमुख अडथळे ठरले आहेत. भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सामुदायिक जेवण हा उत्सवाचा एक अविभाज्य भाग असतो तर आठवणी जपण्यासाठी छायाचित्रण आवश्यक असते. या घटकांच्या अभावामुळे अनेक कुटुंबांना मंदिरातील विवाहसोहळे अपूर्ण वाटू लागले आहेत. त्यातच धार्मिक धर्मादाय खात्याने पुरातत्व विभागाची परवानगी अनिवार्य केल्याचाही फटका बसला आहे.
विवाहसोहळ्यांना परवानगी देणे किंवा नाकारणे हे आपल्या अखत्यारीत येत नाही. आमची भूमिका केवळ स्मारकांचे संरक्षण करण्यापुरती मर्यादित आहे, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी सांगतात. पण, या परस्परविरोधी भूमिकांमुळे हंपीमध्ये मंदिरात विवाहसोहळा करण्याची इच्छा असूनही अनेक कुटुंबे आता खासगी कार्यालयांचा पर्याय निवडत आहेत. तथापि, मंदिरांच्या आवारात साधे विवाहसोहळे सुरुच आहेत. मेजवानी, छायाचित्रण किंवा मोठी गर्दी यांचा समावेश नसेल, तर स्थानिक पुजारी जोडप्यांसाठी विवाहविधी पार पाडतात. मात्र, निर्बंधांचा परिणाम इतर पारंपरिक प्रथांवरही झाला आहे.