खानापूर : पुढारी वृत्तसेवा
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार (Heavy Rainfall in Khanapur) वाढल्याने मलप्रभा नदीने (Malaprabha River Flood) धोकादायक रूप धारण केले आहे. हेमाडगा शिरोली भागातील ३० गावांचा संपर्क तुटला आहे. आता खानापूर-निलावडे मार्गावरील आंबोळी नजीकचा मलप्रभेचा पूल पाण्याखाली गेल्याने निलावडे भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. (Khanapur Flood Updates)
शुक्रवारी मध्यरात्रीपासून या पुलावर पाणी आले. आज शनिवारी पहाटे सातच्या सुमारास पुलावर तीन फुटांहून अधिक पाण्याचा प्रवाह वाहत होता. परिणामी, निलावडे, आंबोळी, बांदेकरवाडा, कोकणवाडा, मुघवडे, कबनाळी या गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नाही. काही सामाजिक कार्यकर्तेच दोन्ही बाजूला पहारा देऊन वाहतूक बंद ठेवून नागरिकांना धोक्याची पूर्व सूचना देत आहेत.