

खानापूर : चापगाव (ता. खानापूर) येथे धनगराच्या कळपावर वीज कोसळून ११ बकरी जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी (दि.१२) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत उमेश यल्लाप्पा चिचडी (होन्नूर ता. बैलहोंगल) या धनगराचे मोठे नुकसान झाले आहे.
चापगाव येथील माणीतील तलाव परिसरात हपंन्नावर यांच्या शेतात उमेश चिचडी व अन्य धनगरांनी दोन दिवसांपासून मुक्काम ठोकले होते. बकरी शिवारात चरत असताना सायंकाळी चारच्या सुमारास चापगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज कोसळून ११ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. धनगराचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. येथून जवळच असणाऱ्या ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मारुती चोपडे यांच्या शेडू खाणीवरील बंगल्यावर या विजेचा प्रभाव पडून घरातील इन्व्हर्टर, फॅन व संपूर्ण लाइटिंग जळून गेले आहे. त्यामुळे त्यांचेही लाखोचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस ठाण्याचे हवालदार श्रीनिवासन, पोलिस कॉन्स्टेबल महेश यानी याबाबत पंचनामा केला आहे.